विज्ञानाच्या प्रगतीबरोबर शास्त्रज्ञांना असे वाटू लागले की विश्वातील प्रत्येक बाबीची माहिती करून घेणे शक्य होईल, इतकेच नव्हे तर, घडणाऱ्या प्रत्येक घटनेची कारणपरंपरा आपण सांगू शकू. ह्याचाच पुढचा भाग म्हणजे एकदा का आपल्याला विज्ञानाचे नियम माहीत झाले तर पुढे काय होणार आहे ह्याचे भाकीतपण आपण करू शकू. जर आपण बरोबर भाकीत करू शकलो, तर पुढे काय होणार आहे, ते पूर्वनिश्चित आहे, असे म्हणावयास प्रत्यवाय नसावा. ह्यालाच वैज्ञानिक पूर्वनियतवाद असे म्हटले गेले. 1930 च्या सुमारास वैज्ञानिक पूर्वनियतवादाची चर्चा होती. पुढे कालांतराने वैज्ञानिक पूर्वनियतवादाबद्दलचा उत्साह कमी झाला.
नास्तिकसाधना
साधना अथवा तपस्या यांना कोणत्याही क्षेत्रात खूप महत्त्व आहे. एखादे ज्ञान अथवा कौशल्य स्वतःमध्ये मुरवण्यासाठी वर्षानुवर्षे झपाटून जाऊन आणि सातत्याने प्रयत्न करीत राहणे म्हणजे साधना, तपस्या हा याच अर्थाचा शब्द. विज्ञान, कला, क्रीडा यांसारख्या कुठल्याही क्षेत्रात कठोर साधनेशिवाय काही साधण्याची शक्यता नाही. पण मुळात हे दोन्ही शब्द आध्यात्मिक साधनेसाठी वापरले गेले आहेत आणि आजही त्या क्षेत्रातच त्यांचा वापर मुख्यतः होतो. आध्यात्मिक साधना कशासाठी करतात? तर साक्षात्कारी, ज्ञानी, योगी, संत असे काहीतरी होण्यासाठी. या प्रकरणात मला काही अंशी धक्कादायक वाटेल असे एक विधान करायचे आहे; ते म्हणजे भक्तियुक्त अंतःकरणाने आध्यात्मिक साधना करणाऱ्या साधकापेक्षा नास्तिक माणसाला संतपदाला जाणे जास्त सहज आणि सोपे आहे.
संपादकीय
टेलिव्हिजनच्या वृत्तवाहिन्या भारतीयांच्या रोजमर्रा वापरातल्या शब्द- भांडाराला सूज आणत आहेत. अनेक नव्या संकल्पना आणि त्यांच्यासाठी वापरले जाणारे नवे शब्दप्रयोग यांच्यातून हा ‘फुगारा’ आणला जातो आहे. तसे हे नेहमीच घडत असते, पण निवडणुकींच्या काळात याला ऊत येतो. मे 2004 च्या निवडणूक काळातही हा सुजवटा-फुगवटा प्रकार भरपूर प्रमाणात दिसला. काही उदाहरणे तपासण्याजोगी आहेत.
जसे, कोणतेही सरकार नव्याने सत्तेवर आले की सुरुवातीचे काही दिवस मतदार व माध्यमे सरकारवर टीका करत नाहीत. “त्यांना काय करायचे आहे ते पाहू तर! पापपुण्याचा हिशोब उलटीकडे गेला तर मग हल्ले करू!”
उलटे नियोजन
पाणी हवे आणि वीजही हवी; पण वीजनिर्मितीला पाणी देण्याची आमची तयारी नाही. पाणी संपले, तर औरंगाबादची तडफड बघवणार नाही, अशी भीती सर्वांना वाटते, ती अनाठायी नाही. परळी विद्युत केंद्रातील तीन संच आधीच बंद पडले आहेत. एक संच चालू आहे; पण त्याला पाणी कमी पडते. नाथसागराचे दरवाजे उघडले, परंतु तहानलेल्या औरंगाबादकरांच्या रेट्यापुढे ते बंद करावे लागले. नियोजनाचा अभाव असल्यामुळेच टँकरमुक्तीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्र दिवसेंदिवस टँकरग्रस्त होत चालला आहे. कोट्यवधी रुपये उधळून अनेक सिंचनप्रकल्प उभारले. 80 टक्के शेतीला आजही ओलितांची सोय नाही. जायकवाडी, खडकवासला किंवा आता कोरडीठाक पडलेली बिंदुसरा-मांजरासारखी धरणे खास शेतीसाठीच बांधली; पण ना शेती भिजली, ना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.
पत्रव्यवहार
निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, माथेरान रोडजवळ, नेरळ, रायगड – 410101 वादविवाद ज्ञानसंवर्धनासाठी आवश्यक आहेत. आ. सु.मध्ये अनेक विषयांवर वादविवाद झाले. परंतु त्यात खेळाचे नियम मोडणारी पत्रे कमी असत. एप्रिल 2004 च्या अंकातील वसंत त्रिंबक जुमडे यांचे पत्र त्यांपैकी आहे. बहुतेक वादांमध्ये काही मूलभूत गृहीतकांना दोन्ही पक्षांची मान्यता असते. जुमडे यांच्या “… चर्चा व त्यातून दोषारोप हे ज्ञानवृद्धीच्या दृष्टीने उपयोगी पडत नाहीत”, या दाव्यालाच बुद्धिप्रामाण्यवादाचा विरोध आहे, कारण “चर्चा हवी की नको”, या प्रश्नाचे उत्तर चर्चेने शोधले तर होकारार्थीच येईल. चर्चा नको अशी मागणी करणाऱ्या जुमडे यांना युक्तिवाद करण्याचाही हक्क नाही.
बॅक्टीरियांचे वंशज
एक जीवजात म्हणून पाहता आपण अजूनही स्वतःबद्दलच्या धारणांमध्ये जे विक्षिप्त वाटते त्याला घाबरतो. डार्विन होऊन गेल्यावरही किंवा डार्विनमुळेही, एक संस्कृती म्हणून आपल्याला आजही उत्क्रांतीमागचे विज्ञान समजत नाही. विज्ञान आणि संस्कृति यांच्यात संघर्ष झाला तर नेहमीच संस्कृतीचा विजय होतो. (पण) उत्क्रांतीच्या शास्त्रांची जास्त समजून घेण्याची पात्रता आहे – हो, माणसे उत्क्रांत झाली आहेत, पण कपी किंवा इतर सस्तन प्राण्यांपासूनच नव्हे. आपल्या पूर्वजांमध्ये एक लांबलचक बॅक्टीरियांची यादी आहे, अंतिमतः अगदी पहिला बक्टीरियाही त्यात येतो. [लिन मार्गुलिसच्या ‘सिंबायॉटिक प्लॅनेट’ (बेसिक बुक्स, 1998) च्या पुस्तकाच्या उपोद्घातातून]
मनकवडे- ‘मनांधळे’
माणसे स्वभावतःच मनकवडी असतात. इतरांचे मनोव्यापार कल्पनेने तपासण्याचे माणसांचे कौशल्य हे भाषेचा वापर किंवा बोटांपुढे आणता येणाऱ्या अंगठ्याच्या दर्जाचे मानवी वैशिष्ट्य आहे. ते इतक्या सहजपणे आपण वापरत असतो की तसले काही कौशल्य आहे हेच आपल्याला सुचत नाही. पण चार वर्षांच्या मुलाचे या क्षेत्रातले कौशल्य बहुतांश प्राण्यांमध्ये आढळत नाही. आपण जगात येतो तेच ‘इतर मनांचे आराखडे’ घडवत आणि सामाजिक प्रतिसादांप्रमाणे आराखडे बदलून घेत.
1980-90 च्या दशकाच्या मध्याजवळ सायमन बॅरन कोहेन या ब्रिटिश मानसशास्त्रज्ञाने काही सहकाऱ्यांसोबत लहान मुलांच्या मनकवडेपणाबद्दल एक महत्त्वाचा प्रयोग केला.
नको तिथले खाजगीकरण
चीनच्या हुनान प्रांतातले क्षिनमिन हे हजारभर वस्तीचे खेडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गोड्या पाण्यातल्या गोगलगाईंमुळे पसरणाऱ्या शिस्टोसोमिॲसिस या रोगाने गावातील सारे ग्रस्त आहेत. गोगलगाईंमधून एक परजीवी कृमी शरीरांत शिरते, यकृतात आणि मूत्राशयात अंडी देते आणि रक्ताबरोबर मेंदू आणि मज्जारज्जूत जाऊन स्थिरावते. मूत्रपिंडे निकामी होतात, अर्धांगवायू होतो आणि अखेर वेदनामय अकाली मृत्यू ओढवतो. वांग झिंकुनला तीन वर्षांपूर्वी लागण झाली. त्याने 4,830 डॉलर्सची (सुमारे सव्वा दोन लाख रुपये) आपली पुंजी औषधोपचार आणि शस्त्रक्रियेने अंडी व कलिका काढून टाकण्यात खर्च केली. आता पुन्हा शस्त्रकियेची गरज आहे, पण 45 वर्षांच्या वांगकडे पैसे नाहीत.
मनुष्यस्वभाव : एकीतली विविधता
आपण आपल्या भूतकाळाने घडवलेले असतो-डार्विनच्या उत्क्रांतीबाबतच्या मांडणीत ही एक कळीची संकल्पना आहे. आपण देवाने आपल्याला घडवले असे न मानताही आपण घडवले गेलेलो आहोत असे मानू शकतो. आपल्या पूर्वजांच्या पुनरुत्पादनाच्या (प्रजननाच्या) निवडीतून आपण अजाणताच काही विशिष्ट जीवनशैलीसाठी घडवले जातो. एका सामाजिक, द्विपाद, मूळच्या आफ्रिकन कपीच्या आयुष्यक्रमासाठी मानवी स्वभाव घडलेला आहे. अशीच माणसाची पचनसंस्थाही एका सर्वाहारी, मांसाहाराची चटक असलेल्या आफ्रिकन कपीसाठी घडलेली आहे.
या माझ्या सुरुवातीने दोन प्रकारची माणसे चिडली असणार. ज्यांना एका दाढीवाल्या माणसाने सांत दिवसांत हे जग घडवले असे वाटते, आणि याचे उपप्रमेय म्हणून मनुष्य- स्वभाव निवडीतून नव्हे, तर त्या दाढीवाल्याच्या बुद्धीने घडला असे वाटते, त्यांना माझे अभिवादन.
कितपत तेजस्वी भारत
निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करून महिना-दीड महिना केंद्र सरकारतर्फे रेडिओ, दूरदर्शन, प्रसारमाध्यमांतर्फे होणारा प्रचार थांबला आहे. हा प्रचार ‘अवास्तव, अतिरेकी, आक्रमक होता.
खरे पाहता नव्या आर्थिक सुधारणांचा पाया 1980-90 च्या दशकात आणि नंतर राजीव गांधी आणि नरसिंह राव शासनाने घातला. संगणकतज्ज्ञ सॅम पित्रोडा यांचे व इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सल्ला यानुसार साक्षरता मोहीम, दूरसंचार मोहीम आदी पाच मोहिमा सुरू करून कामास गती आणि दिशा दिली गेली. 1984-89 व नंतर 1991-96 या दहा वर्षांत आजच्या ‘भारत उदया’ची पायाभरणी झाली, सातत्याने प्रयत्न झाले आणि 1998-99 मध्ये असा ‘भारत उदय’ विकसित झालेला देश भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या शासनाखाली आला.