मे १९९९ च्या अंकात श्री. र. वि. पांढरे यांचा स्वदेशीची चळवळ हा लेख वाचण्यात आला. स्वदेशीच्या चळवळी बद्दल मतभेद असू शकतात. पण श्री. पांढरे या चळवळीचा विचार ज्या पद्धतीने मांडतात ती पद्धत वैचारिक लेखाला अंशोभनीय आहे. लेखकाचा रोष राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर असल्याचे दिसून येते. वास्तविक संघाचा हिंदुत्ववाद कधीच आक्रमक नव्हता. त्याला एवढेच अभिप्रेत होते आणि आहे की, संपूर्ण हिंदू समाज संघटित झाल्याशिवाय आक्रमक शक्तींचा प्रतिकार करणे शक्य नाही. पूर्वीच अस्तित्वात आलेली हिंदु-महासभा ही हिंदुत्ववादी राजकीय संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांत हेतुतः साम्य असल्याने राजकारणाचे आकर्षण व अगत्य असणारी संघाची काही माणसे हिंदु-महासभेत गेली.
विक्रम आणि वेताळ : गर्वाच्या खुट्या
राजाच्या खांद्यावरून वेताळ बोलू लागला. त्याचा स्वर नेहमीपेक्षा खिन्न होता. “राजा, आज अकरा में एकोणीसशे नव्याण्णऊ”. आपण गेल्या वर्षी याच दिवशी पोखरण – २ अणुचाचण्या केल्या, हे तुला आठवतच असेल.” राजाने मान डोलावून होकार भरला.
“काही लोकांना ह्या चाचण्यांमुळे बुद्ध हसला असे वाटले, आणि एकूणच या घटनेमुळे जगातील इतर देशांमध्ये आपली पत वाढली असे वाटले”. हा हर्षोन्मादाचा काळ तुला आठवत असेल, होय ना?” राजाच्याने राहवेना, तो भडाभडा बोलू लागला. “लोक फार विघ्नसंतोषी असतात, वेताळा. आपण आपल्या तंत्रशक्तीचे प्रदर्शन केले रे केले, आणि त्या बाकी लोकांनीही दोनचार बाँवस्फोट करून सारा मजा किरकिरा केला.
समस्त मराठीभाषाप्रेमींना अनावृत पत्र
सप्रेम नमस्कार,
मुद्रित मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंताग्रस्त होऊन मी हे प्रकट पत्र आपणास लिहीत आहे. आयुष्यभर मुद्रणाचा व्यवसाय केल्यामुळे मराठीची जी अवनती आज झालेली आहे तिचा मी साक्षी आहे; किंवा असे म्हणा की ती अवनती पाहण्याचे दुर्भाग्य मला लाभले आहे. आपल्या लिखित वो मुद्रित मराठी भाषेविषयी आपण नेटाने काही प्रयत्न आताच केले नाहीत तर आपल्या भाषेचे हाल कुत्रा खाणार नाही किंवा ती मरेल अशी भीती मला सध्या वाटत आहे. मराठी मरेल म्हणजे ती पूर्णपणे. नष्ट होईल असे नाही; पण तिचे विदग्ध, अभिजात, परिष्कृत स्वरूप मात्र नष्ट होईल.
भाषेच्या रचनेस यत्किंचितही अपाय नको
इंग्लिश भाषेचा आम्ही द्वेष करीत नाहीं. हे तर काय पण आपल्या मराठीच्या उत्कर्षास ती मोठेच साधन होईल अशी आमची खात्री आहे. सर्व जगांतील ज्ञानभांडार तींत साठवले असल्यामुळे तिचे साहाय्य मराठीसारख्या परिपक्व होऊ पहाणा-या भाषेस जितकें होईल तितकें थोडे आहे! इतकेच मात्र कीं, ते ज्ञानभांडार खुद्द आपलेसे करून घेण्यास आपल्या भाषेचें सत्त्व म्हणजे निराळेपण कायम राखलें पाहिजे. ज्याप्रमाणे तेच रस शरीरास हितावह होत, की जे शरीर प्रकृतीस मानवून जीवतत्त्वास ढका लावणार नाहींत; त्याचप्रमाणे जे भाषांतरादि ग्रंथ भाषेच्या सरणीस अगदी बरोबर उतरून तिच्या रचनेस यत्किंचितही अपाय न करतील तेच मात्र तीस वर्धक होतील.
संपादकीय
देशनिष्ठा म्हणजे शेजारधर्म
आमचे आजचा सुधारक हे मासिक विवेकवादाचा प्रसार करण्यासाठी जन्माला आलेले आहे हे आपण जाणताच. ते कोणत्याही विषयाचा किंवा मताचा प्रचार करीत नाही. प्रचारक मोठमोठ्याने ओरडतो आणि दुसरी बाजू, विरुद्ध मताचा आवाज, श्रोत्यांपर्यंत पोहचणार नाही असा यत्न करीत असतो आणि प्रसारक शांतपणे आपली बाजू मांडतो, दुसरी बाजू ऐकून घेतो, लोकांना ऐकू देतो. असो.
विवेकवाद म्हणजे काय हे स्पष्ट करण्याची प्रत्येक संधी घेण्याचे आणि त्या निमित्ताने आमच्या प्रतिपादनात पुनरुक्तीचा दोष आला तरी तो स्वीकारण्याचे आम्ही ठरविले आहे. ते करण्यासाठी काही टोकाची अतिरेकी मते मांडून लोकांना डिचवण्याचाही क्रम आम्ही चालविला आहे.
धर्मान्तरणाने राष्ट्रनिष्ठा बदलेल कशी?
संपादक आजचा सुधारक यांस
गेली चार वर्षे मी आपल्या मासिकाची वर्गणीदार आहे. पुणे मुंबई प्रवासात विद्या बाळ यांच्याकडे हे मासिक मी पाहिले अन् लगेच वर्गणीदार झाले.
आपल्या मासिकात सद्य:परिस्थितीवरील लेख वाचायला मिळतात, विचारमंथन होते आणि मतांना बहुधा योग्य दिशा मिळते असा माझा अनुभव आहे.
ओरिसातल्या एका मिशन-याची दोन मुलांसमवेत केलेली निघृण हत्या ह्या विषयाच्या अनुषंगाने मार्चच्या अंकातील ‘धर्मान्तर व राष्ट्रनिष्ठा’ हे स्फुट–स्पष्ट आणि परखडपणे लिहिलेले असून मनाला अंतर्मुख करणारे ठरले. या हत्येच्या बातमीने संपूर्ण जग हादरून गेले. त्यानंतर काही आठवड्यांनीच इंडोनेशिया येथे धार्मिक प्रश्नावरून निर्माण झालेले दंगे आणि अत्याचार याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.
अर्थव्यवस्थेच्या सुसूत्रीकरणासाठी बाजारपेठ उपयोगी नाही
बाजारपेठ म्हणजे मागणी आणि पुरवठा यांच्यात मेळ घालून सर्व वस्तूंच्या योग्य किमती ठरून त्याप्रमाणे वस्तू आणि श्रम यांचा विनिमय होणे. या क्रियेला काही जण अर्थव्यवहाराचे सुसूत्रीकरण मानतात. श्री. स.ह. देशपांडे (एप्रिल ९९) हे या बाजारपेठेचे दोन प्रकार सांगतात. खाजगी मालकीच्या आधारे उभी राहणारी (म्हणजे भांडवलशाही किंवा ‘मुक्त) बाजारपेठ; आणि सामुदायिक मालकीच्या आधारावर (संकुचित) उभी असलेली ‘सोशलिस्ट मार्केट इकॉनमी’ उर्फ समाजवादी बाजारपेठ.
देशपांडे असेही सांगतात की सो.मा.इ. मध्ये केवळ आर्थिक यंत्रणा अभिप्रेत आहे, तर भांडवलशाही बाजारपेठेत लोकशाहीचा आत्माही आहे. सोईसाठी आपण ‘जुनी’ भांडवलशाही ती बाजारपेठ आणि नवे कृत्रिम समाजवादी ते ‘मार्केट’ असे शब्द वापरू.
चर्चा – धर्मान्तर आणि राष्ट्रान्तर
धर्मान्तर आणि राष्ट्रान्तर त्या विषयावरचा वाद फलदायी व्हायला हवा असेल तर त्यातला मुळातला मुद्दा काय आहे हे पाहिले पाहिजे.
‘धर्मान्तर म्हणजे राष्ट्रान्तर’ हे विधान मला वाटते प्रथम सावरकरांनी केले. त्याचा नेमका अर्थ काय?
हे विधान करताना सावरकर एक त्रिकालाबाधित समाजशास्त्रीय नियम सांगत नव्हते. म्हणजे कोणत्याही काळी, कोणत्याही राष्ट्रातील लोकांनी आपला धर्म बदलला तर त्यांची राष्ट्रनिष्ठा ढळते असे त्यांना सांगायचे नव्हते. असे विधान कुणी केले तर ते असिद्ध ठरवणे
अगदीच सोपे आहे. पण प्रचलित प्रश्नांवर प्रकाश पाडण्याच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग नाही.
वाचक मेळाव्याचा वृत्तान्त
आजचा सुधारक या मासिकाच्या वाचकांचा मेळावा रविवारी दिनांक २४ एप्रिलला भरला. निमित्त होते, मासिकाचे दहाव्या वर्षात पाऊल टाकण्याचे. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेने आपले दालन या मेळाव्यासाठी उपलब्ध करून दिले, ज्याबद्दल आजचा सुधारक परिवार त्यांचा अपार आभारी आहे.
हा या मासिकाच्या वाचकांचा तिसरा मेळावा. आधीच्या दोन मेळाव्यांपेक्षा हा काही बाबतींत वेगळा होता. मुख्य म्हणजे मासिकाचे संस्थापक संपादक श्री. दि. य. देशपांडे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे हजर राहू शकले नाहीत त्यांच्या अनुपस्थितीतले हे मासिकाचे पहिलेच ‘कार्य’! दुसरे म्हणजे हा वाचक-मेळावा पूर्णपणे अनौपचारिक होता – ना अध्यक्ष, ना प्रमुख पाहुणे.
स्वदेशीची चळवळ
अलीकडे विदेशी आणि स्वदेशी यांमधील द्वंद्व फार प्रकर्षाने खेळले जाऊ लागले आहे. आन्तर्राष्ट्रीय दबावामुळे जागतिकीकरणाचा १९९० च्या दशकात सर्वत्र बोलबाला होऊ लागला त्यामुळे भारतात काहीशा सुस्त पडलेल्या स्वदेशीच्या चळवळ्यांना चेव आला. स्वदेशीची चळवळ ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामधील एक महत्त्वाचा घटक होती आणि स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय विकास धोरणाच्या पायातील एक वीट (plank in the platform) म्हणून काँग्रेस सरकारने या ना त्या प्रकारे स्वदेशीचे तत्त्व मान्य केले. भारतीयांना खरोखरच स्वातंत्र्य मिळाल्याची जाणीव व्हावी म्हणून जवाहरलाल नेहरूंनी स्वदेशीला महत्त्वाचे स्थान दिले. म्हणूनच पोलादाचे, खतांचे, अवजड यंत्रसामुग्रीचे व अणुऊर्जेचे प्रचंड प्रकल्प सरकारने राबविले.