रमाबाईंनी हिंदू धर्म सोडला, पण हिंदुस्थानची नाळ तोडली नाही, बाईंनी हिंदुसंस्कृतीचा त्याग केला नाही याची विपुल उदाहरणे त्यांच्या चरित्रात आहेत.
‘तुमचे आईवडील सद्धर्माने (ख्रिस्ती धर्माने) देऊ केलेल्या तारणाला वंचित झाले’, असे कुणीसे म्हणाले. त्यावर ताड्कन त्या उत्तरल्या : ‘माझे आई-वडील इतके परमेश्वरभक्त, कनवाळू व सच्चरित्र होते की, त्यांच्या बाबतीत असा संशय व्यक्त केला तरी मला सहन होणार नाही. अमेरिकेत अल्पावधीत लोकप्रियता पावलेले त्यांचे पुस्तक The High-Caste Hindu Woman आईला अर्पण करताना त्या लिहितात, ‘जिचा मधुर संस्कार व समर्थ शिकवण माझ्या जीवनाला सतत मार्गदर्शक ठरली व माझ्या जीवनाला प्रकाशित करीत राहिली त्या माझ्या प्रियतम आईस – आदरपूर्वक समर्पण.’