आजचा सुधारकच्या नोव्हेंबर-डिसेंबर १९९२ च्या अंकातील दोन्ही संपादकीयांविषयी काही प्रतिक्रिया येथे नोंदवू इच्छितो.
(१) डॉ. रूपा कुळकर्णी यांच्या संदर्भातील संपादकीय
आजचा सुधारक हे विवेकवादाला वाहिलेले मासिक आहे याचा अर्थ धर्म स्वीकारणाच्या व्यक्ती संपादक वा सल्लागार राहू शकत नाहीत असा करणे अविवेकी आहे. अंतिमतः ईश्वराच्या एक ना एक स्वरूपाच्या अस्तित्वाच्या स्वीकारावर धर्माची उभारणी होते असे मानले तरी, निरपवादपणे असा स्वीकार ऐहिक जीवनात विवेकनिष्ठा नाकारण्यात परिणत होतो असे मला दिसत नाही. आधुनिक विज्ञानाच्या चौकटीत ईश्वराचे अस्तित्व नाकारणे बंधनकारक नाही. बौद्धिक तर्काच्या आधारे ईश्वराचे आस्तित्व सिद्ध करता येत नसले तर ईश्वर नावाची शक्ती नाहीच असेही ‘सिद्ध करता येत नाही.
चर्चा – निसर्ग आणि मानव
प्रा. दि. य. देशपांडे यांच्या निसर्ग आणि मानव (आजचा सुधारक नोव्हें.डिसें. ९३) या लेखात त्यांना म्हणावयाचे आहे ते असे :
-१.-
चेतन-अचेतन असा फरक करण्याची कसोटी कोणती?माणसाला त्याच्या ठायीच्या चेतनेचा जसा स्वानुभव येतो, तिचे ज्या स्वरूपाचे आत्मभान त्याला असते तसा स्वानुभव येणे व आत्मभान भाषेद्वारा प्रकट करता येणे ही कसोटी मानली तर, प्रा. देशपांडे यांचे म्हणणे मान्य करण्यात कोणतीच अडचण नाही. पण ही कसोटी मानवकेंद्री (anthropocentric) आहे. भौतिक निर्जीव सृष्टीत चेतना कार्य करीत असते की नाही हे केवळ या स्वयंकेद्री कसोटीच्या आधारे ठरविणे सयुक्तिक आहे का?
भोळे यांचे परीक्षण निराशाजनक
सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास या ग्रंथावरील श्री. भा. ल. भोळे यांचे परीक्षण उत्सुकतेने वाचायला घेतले. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका काहीशा दुर्लक्षित पैलूवर प्रकाश टाकणारा, स्वतंत्र दृष्टीने लिहिलेला हा संशोधनग्रंथ, आणि तोही एका ताज्या दमाच्या व नवोदित अभ्यासकाने लिहिलेला; त्यामुळे ही उत्सुकता वाटत होती. शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे प्रा. भोळे यांनी साधार खंडन केलेले असेल, ग्रंथातील निष्कर्षांचीही साक्षेपी समीक्षा त्यांनी मांडलेली असेल, असे वाटले होते. पण परीक्षण वाचून साफ निराशा झाली, आणि आश्चर्यही वाटले.
मोर्यांलच्या या संशोधनग्रंथाचा गाभा जाणून घेऊन तो वाचकांपुढे ठेवण्याऐवजी, लेखकाच्या आक्रमक भाषाशैलीचीच चर्चा यात अधिक आहे.
चर्चा- विवेकवादी नीतीविचाराचे शिथिल समर्थन
प्रा. दि. य. देशपांडे यांनी आजचा सुधारकच्या सप्टेंबर आणि आक्टोबर १९९२ च्या अंकांतून क्रमशः विवेकवादातील नीतिविचाराच्या त्यांच्या मांडणीवर घेतलेल्या आक्षेपांची उत्तरे देण्याची बरीच खटपट केली आहे. त्या उत्तरांवरून विवेकवादाच्या नावाने पर चात्त्य विचारांनी भारलेल्या भारतीय विद्वानांनी भारतीय नीतिविचारांना उपहसत जे तर्क कौशल्य दाखविण्याची धडपड चालविली आहे, ते मुळात किती कच्चे, अपुरे आणि भ्रामक आहे याची साक्ष पटते. एक गोष्ट प्रथम नमूद करतो की प्रा. दि. य. देशपांडे यांची त्यांनी केलेल्या नीतिविचारांच्या मांडणीचा प्रस्तुत लेखकाने आपल्या मूळ लेखात जो संक्षेप दिला आहे त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.
तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ३)
विधानांचे समर्थन तत्त्वज्ञानाच्या दोन प्रमुख कार्यापैकी पहिले कार्य म्हणजे विधानांचे समर्थन करण्याच्या प्रक्रियेची चिकित्सा. आपल्यासमोर येणार्याक कोणत्याही विधानाविषयी ते खरे आहे कशावरून?’ हा पहिला प्रश्न आपल्या मनात उद्भवतो. या प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे त्या विधानाचे समर्थन करणे.
एखाद्या विधानाचे समर्थन द्यायचे म्हणजे ते अन्य एका किंवा अनेक विधानांवरून अपरिहार्यपणे निष्पन्न होते असे दाखविणे. ती अन्य विधाने जर आपल्याला मान्य असतील आणि त्यावरून पहिले विधान निष्कर्ष म्हणून अपरिहार्यपणे निष्पन्न होते हेही आपल्याला मान्य असेल, तर ते विधान सिद्ध झाले असे आपण म्हणतो.
स्त्री असुरक्षित आहे
हिंदू समाजात स्त्रीरक्षण – पुरुषाच्या कामवासनेपासून स्वसंरक्षण- हा महत्त्वाचा उद्योग स्त्रीला पुरातन काळापासून असावा, कारण त्या वासनेला संयम शिकविण्याचे प्रयत्न हिंदू संस्कृतीने केलेले नाहीत. ब्रह्मचर्याचा, तपस्येचा बडिवार करीत, वेश्याव्यवसाय हाच कुळधर्म असणाच्या कळवंत, नायक इत्यादी जाती हिंदू धर्माने निर्माण केल्या, इतकेच नव्हे तर कुळवंतांच्या पोरी देवदासींच्या स्वरूपात मंदिरामधून पोचविल्या व देवद्वाराचाही कुंटणखाना बनवून टाकला. घरच्या स्त्रियांवर देवादिकही पापी दृष्टी ठेवीत, असे आपली पुराणे सांगतात. कामसूत्रात कुलीन स्त्रीला वश करण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. बहुपत्नीकत्व होतेच, पण त्या स्त्रियांचे भरणपोषणही न करता चैन करण्याचा मार्ग बंगालच्या ‘कुलीन भूदेवांनी शोधून काढला.
चर्चा- डॉ. के. रा. जोशी यांना उत्तर
डॉ. के. रा. जोशी यांच्या मूळ आक्षेपांना दिलेले माझे उत्तर त्यांना पटलेले नाही. आणि त्यांनी अनेक आक्षेप घेणारा एक लेख पाठविला आहे. त्याला यथामति उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
त्यांचा पहिला आक्षेप असा आहे मी कांट आणि उपयोगितावाद यांची सांगड घालण्याच्या केलेल्या प्रयत्नावर. ते म्हणतात की त्या दोन उपपत्ती तमःप्रकाशवत् परस्परविरुद्ध असून त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा एकही नीतिमीमांसक झाला नाही. हे त्यांचे म्हणणे मान्य केले तरी त्यावरून असा समन्वय कोणाला जमणारच नाही असे सिद्ध होत नाही. निदान त्यांनी माझ्या प्रयत्नात काय दोष आहे ते सांगायला हवे होते.
संपादकीय
डॉ. रूपा कुळकर्णी ह्यांच्या धर्मान्तरामुळे श्रीमती दुर्गा भागवत ह्यांनी आमचे वर्गणीदार न राहण्याचे ठरविले आणि त्यांनी तसे आम्हाला कळविले. त्या निमित्ताने लिहिलेल्या आमच्या संपादकीयामध्ये (नोव्हें.-डिसें.९२) आमची जी इहवादविषयक भूमिका व्यक्त झाली आहे तिच्याबद्दल अधिक खुलासा मागणारी वा मतभेद व्यक्त करणारी जी पत्रे आली त्यांपैकी डॉ. आ.ह. साळुखे व श्रीमती सुनीता देशपांडे ह्यांची वेगळी नोंद घेऊ. त्या पत्रांतील काही मुद्दे अन्तर्मुख करणारे आहेत.
डॉ. आ. ह. साळुखे ह्यांच्या पत्रातील मुद्द्यांबद्दल पहिल्याने लिहितो. ते म्हणतात “डॉ. कुळकर्णी ह्यांना राजीनामा देण्यास सुचविणे अनुचित होते, ह्याची जाणीव आपणास झाली आहे ही गोष्ट समाधानाची असली, तरी आधी तसे सुचविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे, हे आपले कर्तव्य ठरते.”
चर्चा – पण पूर्वग्रह पुराव्यांपेक्षा प्रबळ होऊ नयेत
प्रा. शेषराव मोरे यांनी वाचकांचा त्यांच्याविषयी गैरसमज होऊ नये म्हणून केलेला खुलासा माझे आक्षेपच अधिक बळकट करणारा आहे. माझ्या परीक्षणाचा एकूण रोख जाणीवपूर्वक लक्षात न घेता त्यांनी आत्मसमर्थनार्थ बरीच मखलाशी केली आहे. जाणीवपूर्वक हा शब्द मी मूळ परीक्षणातही मुद्दाम दुहेरी अवतरणचिन्हांत टाकला होता। (आजचा सुधारक – १९९२ पृ. २७६). फडके-पळशीकरादी टीकाकार फक्त सावरकरांची बदनामी करण्यासाठीच किंवा त्यांच्यावर खोटीनाटी टीका करण्यासाठीच लिहितात अशा आशयाची डझनोगणती वाक्ये प्रा. मोरे यांच्या ग्रंथात आहेत. माझा प्रश्न एवढाच की या संशोधकांचे हे हेतू’ एवढ्या ठाम शब्दांत मांडण्याजोगे कोणते पुरावे लेखकापाशी आहेत?
चर्चा -आरोपाची आक्षेपार्हता पुराव्यांवर असते!
ग्रंथावरील परीक्षणात्मक टीकालेख वाचला. (आजचा सुधारक, नोव्हें. डिसे.९२) या ग्रंथाबद्दलचा त्यांचा अभिप्राय जाणून घेण्यास आम्ही अगोदरच उत्सुक असल्यामुळे त्यांच्या या परीक्षणाने आम्हाला साहजिकच आनंद झाला.
परीक्षणकर्त्याने आपल्या ग्रंथाचे कौतुक करावे अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. आमच्यापुरते बोलायचे तर आमच्या ग्रंथावर टीकाकारांनी कठोर टीका करावी असे आम्हाला वाटत असते. ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ या आपल्या १९८८ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथावर अशी कठोर टीका कुणीही केली नाही याचे आम्हाला दुःखच वाटत आले आहे. मोघम कौतुकापेक्षा कठोर टीका विचारप्रवर्तक व म्हणूनच उपयुक्त असते.