मासिक संग्रह: एप्रिल, १९९०

आगरकर म्हणतात –

धर्ममंदिराची रचना श्रद्धेच्या किंवा विश्वासाच्या पायावर झालेली आहे, असे हिंदू धार्मिकांचेच म्हणणे आहे असे नाही. पृथ्वीवरील कोणत्याही प्रकारच्या धार्मिकांस विश्वासाशिवाय त्राता नाही व थारा नाही, या संबंधात बुद्धिवादाचे नाव काढले की त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो! एखाद्या दिवाळखोर कर्जबाजाऱ्यास ज्याप्रमाणे आपल्या प्राप्तीचा आकडा आपल्या खर्चाच्या आकड्याशी ताडून पाहण्याचे धैर्य होत नाही, किंवा ज्यांची जीविताशा फार प्रबल झाली आहे त्यांना आपल्या रोगाची चिकित्सा सुप्रसिद्ध भिषग्वर्याकडून करवत नाही, त्याप्रमाणे श्रद्धाळू धार्मिकास आपल्या धर्मसमजुती व त्यावर अवलंबणारे आचार यांस बुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाही.

पुढे वाचा

संपादकीय

‘नवा सुधारक’ या नव्या मासिकाचा हा पहिला अंक वाचकांच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सुधारकाचार्य गोपाळ गणेश आगरकर यांनी १८८८ साली ‘सुधारक’ नावाचे साप्ताहिक पत्र सुरू केले, आणि ते त्यांचा अकाली मृत्यू होईपर्यंत, म्हणजे १८९६ पर्यंत, अत्यंत समर्थपणे आणि प्रभावीपणे चालविले. त्यानंतर ९४ वर्षांनी आज सुरू होणाऱ्या ‘नव्या सुधारका’चा आगरकरांच्या ‘सुधारका’शी काय संबंध आहे? आणि नव्या सुधारका’चे प्रयोजन काय आहे? हे प्रश्न सुचणे स्वाभाविक आहे. त्यांची उत्तरे देण्याचा प्रथम प्रयत्न करतो.

पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘नवा सुधारक’ हा जुन्या ‘सुधारका’चा नवा अवतार म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहात आहोत.

पुढे वाचा

प्रा. (श्रीमती) मनू गंगाधर नातू – विवेकवादाची साधना 

३ एप्रिल ९० रोजी श्रीमती मनुताईंच्या मृत्यूला दोन वर्षे होतील. त्यांच्या वाट्याला जे सुमारे ६९ वर्षांचे आयुष्य आले ती एक विवेकवादाची प्रदीर्घ आणि खडतर साधना होती. खडतर अशासाठी म्हणावयाचे की, त्यांच्या जागी दुसरी एखादी स्त्री असती तर तिने विवेकवाद म्हणा किंवा बुद्धिप्रामाण्यवाद म्हणा या विचारसरणीची कास कधीच सोडली असती. एखाद्या चिकट आजारामुळे किंवा अपत्यसुखासारख्या सामान्य कौटुंबिक सुखाला वंचित झाल्यामुळे पुष्कळ उच्चविद्याविभूषित मंडळी मंत्र-तंत्र, व्रतवैकल्य अशा मार्गांकडे वळतात असे आपल्याला दिसते. लग्नाआधीचा ध्येयवाद लग्नानंतर जड ओझ्यासारखा दूर फेकला जातो. आपणही त्यांना दोष देत नाही.

पुढे वाचा

विवेकवाद -१

विवेकवाद ही केवळ एक विचारसरणी नाही, ती एक जीवनपद्धतीही आहे. मनुष्याने आपले सर्व जीवन विवेकाने जगावे, विवेकाने त्याची सर्व अंगोपांगे नियंत्रित व्हावीत असे त्याचे प्रतिपादन आहे. विवेक म्हणजे विवेचक शक्ती किंवा भेद करण्याची शक्ती, सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट, न्याय आणि अन्याय इत्यादींचा भेद ओळखण्याची ती शक्ती आहे. विवेकाच्या व्यापाराची अनेक क्षेत्रे आहेत. त्यांपैकी तूर्त ज्ञानक्षेत्र आणि कार्यक्षेत्र या दोघांचाच उल्लेख केल्यास पुरे होईल. सत्य म्हणजे काय? आणि सत्य ओळखायचे कसे? हे प्रश्न ज्ञानक्षेत्रातील आहेत. या आणि अशाच अन्य प्रश्नांची उत्तरे देणे हे विवेकाचे काम आहे असे म्हणता येईल.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १)

बर्ट्रांड रसेल (१८७२ ते १९७०) हे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ होते असे सामान्यपणे मानले जाते. तत्त्वज्ञानाखेरीज सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादि विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांचे लिखाण नेहमीच अतिशय मूलगामी, सडेतोड, निर्भय आणि विचारप्रवर्तक असे. त्यांचा Marriage and Morals (१९२९) हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध असून तो अत्यंत प्रभावीही ठरला आहे. त्यात रसेल यांनी आपल्या प्रचलित वैवाहिक नीतीची मूलग्राही चर्चा केली असून विवेकवादी वैवाहिक नीती काय असावी याचे दिग्दर्शन केले आहे. प्राध्यापक म. गं. नातूंनी या ग्रंथाचा अनुवाद करावयास घेतला होता.

पुढे वाचा

साम्यवादी जगातील घडामोडी : काही निरीक्षणे

रशियात गोर्बाचेव्ह यांनी गेल्या पाच वर्षांपासून सुरू केलेल्या ग्लासनोस्त व पेरिस्रोयको नामक परिवर्तनपर्वाने आता चांगलेच मूळ धरले असून जगात सर्वत्र खळबळ गाजवली आहे. ‘सर्वत्र’ हा शब्द इथे मुद्दामच वापरला आहे कारण त्याचे परिणाम आता साम्यवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांपुरते मर्यादित राहिलेले नसून कथित लोकशाही व अलिप्ततावादी या सर्वांना आज नव्याने विचार करण्याची गरज भासू लागली आहे. नुकतीच जेव्हा रशियात साम्यवादी पक्षाच्या सामुदायिक नेतृत्वाची परिसमाप्ती होऊन समावेशक सत्तांचा धारक राष्ट्राध्यक्ष म्हणून गोर्बाचेव्हविरोधकांचे पारडे जड होऊन समजा गोर्बाचेव्ह उद्या सत्ताभ्रष्ट झाले तरी एक गोष्ट वादातीत राहील की त्यांनी केलेली कामगिरी युगप्रवर्तक आहे आणि ते या शतकाचे नायक आहेत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक नवा सुधारक यांस स. न. वि. वि.

पुष्कळ दिवसांपासून माझ्या मनात एक प्रश्न घोळत आहे. त्याबाबतीत आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती. आपणांस इष्ट वाटेल तर ह्या प्रश्नांची आपण आपल्या नवीन मासिकातून प्रकट चर्चा करावी. त्यामुळे कदाचित इतर जिज्ञासूंनासुद्धा लाभ होईल. प्रश्न हिन्दू म्हणून माझी कर्तव्ये काय असा आहे.

मी जन्मतः वा परंपरेने हिन्दू आहे. हे हिन्दुत्व मी जसे विधिपूर्वक स्वीकारले नाही तसेच मी त्याचा विधिवत.त्यागही केलेला नाही; तसेच मी केवळ वेदोक्त धर्माचे पालन करणारा स्वामी दयानन्दानुयायी आर्यसमाजीही नाही. त्यामुळे माझ्या मनात जास्त संभ्रम आहे.

पुढे वाचा