विषय «इतर»

जमिनीचे धूप-नियंत्रण आणि माती-संवर्धन, व्यवस्थापन

गेल्या काही वर्षांत दीड पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना अनुदानाचा दिलासा देऊनही त्यात काही फरक पडल्याचे जाणवत नाही. दुसरीकडे शेतीचे एकरी उत्पादन घटतच आहे. इतर काही पर्याय मिळाल्यास जवळपास ४०% शेतकरी शेती व्यवसाय सोडून देण्यास तयार आहेत. याचा अर्थ असा की कुठेतरी मूलभूत काहीतरी बिनसले आहे. ते शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
कोठच्याही उत्पादक उपक्रमाची (productive activity) सहा प्रमुख अंगे आहेत
१. भांडवली गुंतवणूक – इमारती, यंत्रे इ. २. कच्चा माल ३. कुशल, अकुशल कामगार ४. ऊर्जेचा बंदोबस्त ५. प्रत्यक्ष उत्पादन-क्रिया ६.

पुढे वाचा

मृद संधारण पंधरवडा -गुढीपाडवा विशेष! माती अडवा ! – पाणी जिरवा !!

[चिं.मो.पंडितांच्या लेखासोबत विदर्भात काय चालले आहे तेही पाहा ; प्रा. अविनाश शिर्के (यवतमाळ, भ्रमणध्वनी ९८५०३-४३५२०) यांनी पाठवलेले एक पत्रक —] कास्तकार बंधूंनो…..
सगया शेतकऱ्यायचे गेल्या दहाएक सालात लयच हाल होवून रायलेत. भोगात भोग म्हनून कोरडवाहू वाल्यायचे त लयच म्हंजी लय बेहाल हायेत. कवा बी पुसा, कसा रायला यंदाचा हंगाम ? त एक जबाब हमखास येते… ‘भाऊ एक पानी पायजेल व्हता.. शेवटच्या पान्यानं का चाट देल्ली नसती ना तं… राजेहो!’
असे कित्येक पावसाळे झाल्ले…. हंगाम काय मनाजोगता येत नाय. राजेहो कोरडवाहू कास्तकारी करता करता आपून सोताच कोड्डे होत चाल्लो!

पुढे वाचा

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’: एका दृष्टिकोनातून

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय चित्रपट निर्माण केला. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपट या पहिल्यावहिल्या चित्रपटनिर्मितीची गोष्ट हसतखेळत सांगतो. त्यात फाळक्यांचे झपाटलेपण, आपल्या ध्यासाकरता त्यांनी सोसलेले हाल, निर्मितीत त्यांना आलेल्या अडचणी आणि तरीही या सर्व प्रक्रियेत निर्मिकाला मिळणारा आनंद यांचे प्रभावी चित्रण आहे. याशिवाय एक धागा मोकाशी यांनी आपल्या चित्रपटात सातत्याने मांडला आहे. त्याची दखल घेण्यासाठी आणि इतरांनाही त्याची ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.
मोकाशींना पहिल्या भारतीय चित्रपटाच्या गोष्टीला जोडून आणखी काहीतरी सांगायचे आहे, याची जाणीव अगदी सुरुवातीपासून होते.

पुढे वाचा

‘अमेरिकन शेती’ अंकाविषयी

[कोल्हापूरच्या सुभाष आठल्यांनी अमेरिकन शेतीच्या इतिहासाबाबतचा लेख केंद्रस्थानी ठेवून रचलेल्या जाने, २०१० (अंक XX-१०) या अंकाविषयी एक लेख व पत्र पाठविले आहे. पत्रातील काही भाग असा —
अंक Evidence Based असण्याऐवजी अभिनिवेशजन्य वाटला. न घडलेल्या घटना घडल्या म्हणून रिपोर्ट करणे असे या क्षेत्रांत, विशेषतः जागतिकीकरणाचे परिणाम, सेंद्रिय उत्पादने, जनुकबदल पिके, यांच्या संदर्भात हे घडत आहे. आसुचा दर्जा उच्च राहण्यासाठी संपादकांनी ऋश्रीश ठर्शीींळपस, आधारविरहित दोषारोप यांपासून आसु मधील लेखन शक्य तितके मुक्त राहील याची काळजी घेतली पाहिजे. पुढे आठले म्हणतात — सर्व लेखक समाजकार्यकर्ते, विचारवंत, पत्रकार असे आहेत, स्वतः शेती करणारे कोणीच नाहीत, शेतीशास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञानी कोणीच नाहीत.

पुढे वाचा

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळींचा वेध

भाग तीनः कार्यकर्ते : व्यक्ती व संघटना
१९६७ ते १९८० दरम्यान आर्थिक, राजकीय घडामोडींना वेग आला होता. तरुणांची आंदोलने होत होती. नक्षलवादी चळवळीचा उगम, बिहार व गुजरातमधील आंदोलने याच काळातली. महाराष्ट्रात अशा अस्वस्थतेबरोबर, तरुण दलितांची चळवळ दलित पँथर, सामाजिक बदलाची चळवळ युक्रांद यांचे वारे वाहत होते. १९७४ मध्ये वरळीत दलित-सवर्ण दंगा झाला, यापुढे काहीच महिन्यांत दलित युवकांनी मराठवाड्यात सरकारी यंत्रणेविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. विविध पुरोगामी चळवळी यावेळी कार्यरत होत्या. ज्यांतील काही नावे पुढीलप्रमाणे : रॉयिस्ट, राष्ट्र सेवा दल, सर्वोदयी, सत्यशोधक समाज, आंबेडकरांचे अनुयायी, भूमिसेना, ग्रामस्वराज्य समिती, मागोवा, शहादा तळोदा गट, छात्र युवा संघर्ष वाहिनी, यूथ ऑर्गनायझेशन, क्रांतिकारी महिला संघटना.

पुढे वाचा

जोतीराव फुले यांचे अंधश्रद्धा-निर्मूलन कार्य

जोतीराव फुले यांनी विश्वमानवाच्या मुक्तीसाठी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या दोन निष्ठावंत अग्रणींच्या आयुष्यातील दोन प्रसंग प्रारंभीच नमूद केल्यास अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात त्या चळवळीने संपादन केलेल्या यशाचा प्रत्यय येऊ शकेल. पहिला प्रसंग ना. भास्करराव जाधवांच्या आयुष्यातला आहे. वेदोक्त प्रकरणी दुखावलेल्या शाहू महाराजांनी जेव्हा क्षात्र जगद्गुरूची प्रतिष्ठापना केली तेव्हा भास्कररावांनी त्या कल्पनेस विरोध केला होता. एवढेच नव्हे तर महाराजांसह सर्व श्रेष्ठींनी क्षात्रजगद्गुरूंना अभिवादन केले तेव्हा, आपण सत्यशोधक असल्यामुळे कोणत्याही धर्मपीठापुढे नतमस्तक होणे आपल्या विचारांत बसत नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. सत्यशोधकी विचार केवळ ब्राह्मणी जगद्गुरूंनाच नकार देत नसून संपूर्ण पुरोहितशाही आणि जन्मनिष्ठ विषमतेवर आधारित वर्णव्यवस्था यांनाच नाकारतो.

पुढे वाचा

गाडगे महाराजांचे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य

गाडगे महाराजांना संत का म्हटले गेले हेच कोडे आहे. रूढार्थाने आपण ज्यांना संत म्हणतो, त्या संतांसारखी एखादीही कृती गाडगेबाबांनी केली नाही. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसाला आपण ‘बाबा’ म्हणतो या अर्थाने खेडुतांनी, गोरगरिबांनी त्यांना बाबा म्हटले आणि ते त्यांनी सहर्ष स्वीकारले असावे. पण महाराज ? हे काय प्रकरण आहे? कुणी आपल्या सोयीसाठी त्यांना महाराज बनविले ? कारण त्यांनी स्वतःच अनेक वेळा सांगितले आहे ‘मी कोनाचा गुरु नाही अन् माझे कोनी शिष्यई नाहीत-‘ आपल्या भोवतीच्या सामाजिक दुःस्थितीचे अवलोकन करीत, त्यातून मार्ग शोधीत गाडगेबाबांचे लोकोत्तर आणि इहवादी तत्त्वज्ञान आकारले आहे, हे कुणी लक्षातच घेत नाही.

पुढे वाचा

बाबासाहेब आंबेडकर व अंधश्रद्धा निर्मूलन

डॉ. आंबेडकरांच्या अंधश्रद्धानिर्मूलन कार्याचा वेध घेताना त्यांच्या धर्मचिकित्सेचा आणि धर्मांतर चळवळीचा मागोवा घेणे अपरिहार्य ठरते. महाराष्ट्रात अंधश्रद्धानिर्मूलन चळवळीची व्याप्ती प्रामुख्याने बुवाबाजी, चमत्काराचा दावा करणारे स्वामी, साक्षात्कारी असल्याचा प्रचार करणारे महाराज, झपाटणे, भानामती, वशीकरण विद्या, पुनर्जन्म, भावातीत ध्यान इ.च्या संदर्भातील प्रबोधनाची आहे. या सर्व अंधश्रद्धांची मुळे धर्माच्या तात्त्विक वा व्यावहारिक स्वरूपात आहेत. अंधश्रद्धानिर्मूलनाचा कार्यकर्ता मर्यादित उद्दिष्टाने व्यवहारातील उघड व बोचक अंधश्रद्धेच्या विरोधात कृती करीत असतो तर धर्मसुधारक आणि धर्मपरिवर्तक अंधश्रद्धांचे शक्तिसामर्थ्य असलेल्या ईश्वरवाद, आत्मवाद, अवतारवाद, पुनर्जन्मवाद, कर्मवाद या अध्यात्मवादी प्रवृत्तींची मूलगामी चिकित्सा करीत असतो.

पुढे वाचा

भाग चारः सर्वेक्षण श्रद्धांचे सर्वेक्षण

सध्या खूप मोठ्या प्रमाणात लोक श्रद्धाळू झाले आहेत असे म्हणणारे विवेकी, तर लोकांना कसची चाड राहिली नाही असे म्हणणारे धार्मिक आपल्याला भेटत असतात. ही त्यांची मते दिखाऊ श्रद्धा वा अश्रद्धा जाणवल्यावर प्रगट होत असतात. म्हणजे अमक्या मेळ्याला काही लाख माणसे जमली, मोठा अपघात झाला त्यात सर्व यात्रेकरू होते, असे काहीसे ऐकू आले की विवेकी माणसांना समाजातील वाढत्या श्रद्धेची ओळख पटते. तर सणासुदीला सुट्टी घेऊन भ्रमण करणारे पाहिले; लग्न-श्राद्ध-मुंजीतील धार्मिक व्यवहारातील ढिलेपणा पाहिला की धार्मिकांना नेमकी त्याविरुद्ध जाण येते. नेमके काय घडते हे पाहण्यासाठी आजकाल सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो.

पुढे वाचा

भाग एकः संकल्पनात्मक श्रद्धा प्रमाण आहे काय?

ज्ञान म्हणजे वस्तुस्थितीविषयी यथार्थ माहिती. ‘ज्ञान’ या शब्दाचा हा एकमेव अर्थ नाही. कारण संज्ञा किंवा जाणीव या अर्थानेही या शब्दाचा उपयोग होतो. या अर्थी कोणतीही जाणीव ज्ञानच आहे. त्यामुळे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, यथार्थ आणि अयथार्थ, किंवा सत्य आणि मिथ्या ज्ञान असेही म्हणतात. पण या लेखात ‘ज्ञान’ हा शब्द सत्य ज्ञान या अर्थानेच वापरला आहे.
ज्ञानप्राप्तीची अनेक साधने आहेत. त्यांना प्रमाणे म्हणतात. उदा. ज्ञानेंद्रिये ही एक प्रकारची प्रमाणेच आहेत. कारण त्यांनी आपल्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या संवेद्य गुणांचे ज्ञान होते.

पुढे वाचा