विषय «इतर»

कसोटीचा दगड —– पाठराखा.

आपले मतभेद आहेतच, कधी तपशिलाचे, कधी तात्त्विक. तसे मतभेद तर असणारच, कारण दोघेही आपापल्या अनुभवांच्या, आकलनाच्या आधाराने मते घडवत आहोत. पण हे मतभेद संवादाला बाधा आणत नाहीत. उलट तपशीलवार संवादातून मतैक्य कुठेकुठे आहे, एकमेकांना पूरक भूमिका आहेत का, हे सारे प्रश्न सोडवता येतील. कृतीच्या पातळीवर ज्यात (भाषणे, लेखन हेही आलेच) तर नक्कीच मतैक्य भेटेल. तर तेवढी कृती एकत्र करु या; आणि ती करत असताना संवादही करत राहू या.
भोळेसर आणि आजचा सुधारक चा छोटेखानी परिवार, यांच्या संबंधांचा पाया वरील परिच्छेदात आहे.

पुढे वाचा

भुकेचा जागतिक व राष्ट्रीय संदर्भ

भुकेचा जागतिक व राष्ट्रीय संदर्भ
९६३ दशलक्ष लोक सध्या जगात तीव्र उपासमारीने ग्रस्त आहेत. २००९ अखेर ही संख्या १०० कोटींवर जाऊ शकते. जगात तीव्र उपासमारीने ज्यांना आवश्यक पोषक आहार मिळत नाही, अशांपैकी दोन तृतीयांश लोक भारत, चीन, काँगो, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि इथिओपिया या देशांत आहेत. जागतिक भूक निर्देशांकानुसार पुरेसा पोषक आहार न मिळणाऱ्या, जगातील ८८, देशांमध्ये भारताचा ६६ वा क्रमांक लागतो. तथापि, संख्येच्या तुलनेत (२०० दशलक्ष) भारताचा पहिला क्रमांक लागतो. आपल्या देशात कुपोषितांची संख्या वाढते आहे.
(संदर्भ: युनोच्या अन्न व कृषी संघटनेच्या ‘जागतिक अन्न असुरक्षिततेची स्थिती २००८’ या अहवालाबाबतचा १७ डिसेंबरचा टाईम्स ऑफ इंडिया चा अग्रलेख)

रेशनचा प्रश्न व चळवळः नवे संदर्भ, नवे डावपेच

रेशनचा प्रश्न खूप महत्त्वाचा व गंभीर आहे, हे खरे. पण तो आता सर्वांचा राहिलेला नाही, हेही खरे. आणि तो सर्वांचा राहिलेला नसला तरी त्याचे गांभीर्य कमी होत नाही, हेही खरे.
वरील तीन विधाने रेशनच्या प्रश्नाच्या स्वरूपासंबंधी आहेत. एखादा प्रश्न सोडवताना त्याच्या स्वरूपाची वस्तुनिष्ठ नोंद घेणे आवश्यक असते, अन्यथा डावपेचांची आखणी फसण्याची शक्यता असते. रेशनच्या प्रश्नाची स्वरूप-निश्चिती व तो सोडवण्याचे डावपेच, यासंबंधीचे काही मुद्दे नमुन्यादाखल मी येथे मांडणार आहे. रेशन चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून आलेल्या अनुभवांच्या आधारे ते मांडणार आहे. अभ्यासकांनी, विचक्षण वाचकांनी त्यात भर घालावी, दुरुस्ती सुचवावी ही अपेक्षा आहेच.

पुढे वाचा

अन्न-अधिकार-कायदा – योजनेपासून हक्कापर्यंत

गेल्या दोन दशकांत भारताची एकूण आर्थिक प्रगती वेगात सुरू आहे. तरी आजही मोठी लोकसंख्या गरिबीच्या वर्गात मोडते. त्यामुळे या गरीब जनतेची अन्नासारख्या मूलभूत गरजेची पूर्तता होणे, कल्याणकारी राज्यरचना स्वीकारलेल्या आपल्या देशात अगत्याचे ठरते. याच उद्देशाने रेशनव्यवस्था सुरू करण्यात आली. मात्र, रेशनव्यवस्था सुरू करण्यात आली तो काळ आणि आजचा काळ याचे संदर्भ खूप वेगळे आहेत. गरिबांचा विकास या सेवाधिष्ठित कल्याणकारी भूमिकेसोबतच गरिबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार हा हक्काधारित दृष्टिकोण गेल्या काही वर्षांमध्ये पुढे येत आहे. त्यातूनच शिक्षण, आरोग्य, रोजगार यांकडे केवळ कल्याणकारी योजनांच्या भूमिकेतून नाही, तर त्यापलीकडे जाऊन घटनात्मक अधिकार म्हणून पाहिले जात आहे.

पुढे वाचा

रेशनव्यवस्थेचे पूर्ववत सार्वत्रिकीकरण हवेच

गेल्या दीड ते दोन दशकांत भारतामध्ये गरीब, कष्टकरी समूहांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी, संरक्षणाच्या योजना कोसळू लागल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, रेशन या तीन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांतील योजनांचा समावेश आहे.
या कोसळण्याच्या घटनांबरोबरच आणखीही काही गोष्टी त्याच वेळी घडत आहेत. त्यांमधला संबंध व तर्कसंगती लक्षात घेत त्यामागचे डाव समजून घ्यायला हवेत. * गेल्या दशकात विविध सार्वजनिक योजनांचे खाजगीकरण झपाट्याने सुरू झाले. अथवा खाजगीकरणाची टांगती तलवार ठेवून त्या त्या विभागाचे केंद्रीकरण (विशेषतः निधीची तरतूद व निर्णयप्रक्रियेच्या स्तरावर) वाढवण्यात आले. * रेशनसारख्या योजनेची अर्थसंकल्पीय तरतूद वाढली, पण प्रत्यक्षात रेशनच्या ग्राहकासाठी दर कमी झाले नाहीत, व रेशनची गरज असणारा मोठा समूह रेशनव्यवस्थेच्या बाहेर फेकला गेला.

पुढे वाचा

गरिबांसाठीचा निधी श्रीमंतांच्या घशात का घालत आहात?

सध्या आपल्या देशात जी स्वस्त धान्य योजना आहे ती वार्षिक एक लाख रु. किंवा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांसाठीच लागू आहे. दारिद्र्यविषयक वाद हा वार्षिक १२ हजार रु. की ३६ हजार रु. असा आहे. (अगदी अर्जुन सेनगुप्ताप्रणीत दारिद्रयरेषा मानली तरी ती वार्षिक ३६००० रु.च येते). तेव्हा एक लाख मर्यादेमुळे कोणी गरीब या योजनेपासून वंचित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे असूनही ही योजना सर्वच नागरिकांसाठी (अंबानींसकट) लागू करा अशी समतावाद्यांची मागणी आहे. ही योजना गटलक्ष्यी (टारगेटेड) न ठेवता सार्विक (युनिव्हर्सल) करावी यासाठी समतावादी मंडळी जी समर्थने देतात त्यांचा समाचार आपण नंतर घेऊच.

पुढे वाचा

भ्रष्ट, अकार्यक्षम रेशनव्यवस्थेला ठोस पर्याय

दारिद्र्यनिर्मूलन हा या देशापुढील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे असे जर आपण मानणार असू तर देशातील गरीब ग्राहक व गरीब शेतकरी यांच्या हितसंबंधांची परस्परपूरक अशी सांगड घालण्याचा प्रश्न देशापुढील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न ठरेल. आजची व्यवस्था दुर्दैवाने नेमके याच्या उलट करते. आजची रेशनव्यवस्था गरीब ग्राहक व गरीब शेतकरी यांना परस्परांविरुद्ध उभे करते. गरीब ग्राहकाची अन्नसुरक्षा साधण्याच्या नावाखाली गरीब धान्योत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करून ग्रामीण दारिद्रयनिर्मूलनाच्या प्रक्रियेत अडथळा आणते आणि दुसरीकडे प्रत्यक्षात गरीब ग्राहकाची अन्नसुरक्षा तर साधली जात नाहीच. उलट महागाईच्या दुष्टचक्रात देशातील गरीब ग्राहक अक्षरशः भरडून निघत आहेत.

पुढे वाचा

सभ्यता आणि राज्यशास्त्र

सभ्यता आणि राज्यशास्त्र
क्रिस्टफर डी. कुक
सभ्यता (civilizaton) म्हणजे जे नगरांत घडते ते; आणि नगरे अन्नोत्पादकाकडे गरजेपेक्षा जास्त अन्न असण्यावर अवंलबून असतात. ते ज्यादा अन्न उत्पादकाकडून घेणारी संस्थाही असावी लागते. या ज्यादा अन्नातून ती राजकीय संस्था राजांची पोटे भरते ……. सैन्याची, वास्तुशिल्पींची आणि बिल्डरांचीही पोटे भरते. आणि यांतून नगर जन्माला येते. अन्नोत्पादकापासून त्याचे ज्यादा उत्पन्न फारसा काही मोबदला न देता कसे घ्यावे, हे राज्यशास्त्राचे सर्वांत प्राचीन रूपातले ज्ञान आहे.
[चार्ल्स वॉल्टर्स, ज्यूनियरच्या अँग्री टेस्टामेंट (१९६९) मधले हे अवतरण, क्रिस्टफर डी. कुकच्या डायट फॉर अ डेड प्लॅनेट (२००४)मध्ये उद्धृत केलेले.

पुढे वाचा

अमेरिकन शेती

[क्रिस्टफर डी. कुकच्या डायट फॉर अ डेड प्लॅनेट या पुस्तकाच्या आधाराने अमेरिकन शेतीचा खालील इतिहास रेखला आहे.
अश्विन परांजपे (वय वर्षे ३५) हा भारतात B.Sc. (Agri.) शिकून व अमेरिकेत फलोद्यानशास्त्रात M.S. करून आज पुण्याजवळ शेतीक्षेत्रात अनेक प्रयोग करत आहे. त्याने लेखात जागोजागी त्याची निरीक्षणे नोंदली आहेत…]
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे राष्ट्र १७७६ साली जन्माला आले. गेल्या दोन-अडीच शतकांत ते जगातील सर्वांत प्रबळ व श्रीमंत राष्ट्र झाले आहे. आज अमेरिका म्हणजे केवळ हे राष्ट्र असे लिहिले-बोलले जाते. भौगोलिक संदर्भ द्यायचे झाले तर मात्र उत्तर अमेरिका खंड, असे म्हणावे-लिहावे लागते.

पुढे वाचा

भारतीय शेतीचे काय करायचे?

अमेरिकेत सरकारने १८६० ते १९०० या काळात ५० कोटी एकर जमीन आठ कोटी शेतकऱ्यांना विकली असा एक उल्लेख आहे. (क्रिस्टफर डी. कुक : डायेट फॉर दी डेड प्लॅनेट). प्रत्यक्ष लागवडीखालील शेतजमीन ५० कोटी एकर किंवा थोडी कमी जास्त असावी. ट्रॅक्टर्सची संख्या १९११ ते १९२० या काळात चार हजारांवरून अडीच लाखांवर गेली.
भारतातील महत्त्वाच्या पिकांखाली २००३-०४ साली ३८ कोटी एकर जमीन होती. १९९९-२००४ या काळात दरवर्षी सरासरी २.३३ लाख ट्रॅक्टर्सची विक्री झाली होती. देशातील एकूण ट्रॅक्टर्स (वापरातील) संख्या भारत सरकारच्या २००४-०५ च्या वा नंतरच्या वार्षिक आर्थिक समीक्षेत दिलेली नाही.

पुढे वाचा