“गुजरातचा प्रयोग हा अत्यंत यशस्वी प्रयोग असून आम्हाला त्याची पुनरावृत्ती भारतभर करावयाची आहे”, अशा आशयाचे उद्गार विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष श्री. अशोक सिंघल यांनी काढल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. (इंडियन एक्सप्रेस/५ सप्टें. ०२) यावेळी ते पुढे म्हणाले की, “गेल्या एक हजार वर्षांच्या इतिहासात हिंदूंनी दिलेली ही पहिली सकारात्मक प्रतिक्रिया आहे. २७ तारखेला गोध्रा घडले आणि दुसऱ्या दिवशी ५० लाख हिंदू रस्त्यावर होते.” गुजरातमधील गावागावांतून मुस्लिमांना हाकलून त्यांना शरणार्थी शिबिरात दाखल करण्यात आले, याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. केंद्रामध्ये भाजपचे सरकार नसते तर गुजरातमधील अमानुष हत्याकांडाचा गौरव करण्याचे धैर्य अशोक सिंघल यांनी दाखवले असते असे वाटत नाही.
एका सम्राज्ञीचा मृत्यू
अखेर ज्याची भीती होती तेच झाले. नागपूरची सव्वाशे वर्षे जुनी एम्प्रेस कापड गिरणी बंद पडली. एका फटक्यात २८०० नोकऱ्या रद्द झाल्या. तोट्यातील कापड गिरण्या बंद करायचे राज्य सरकारने ठरवले आहे. वस्त्रोद्योग महामंडळाच्या म्हणजे सरकारच्या मालकीच्या एकूण ९ पैकी ५ गिरण्या सरकारने आतापर्यंत बंद केल्या असून कामगारांचे हिशोबही केले आहेत. बंद होणारी एम्प्रेस ही सहावी गिरणी. एम्प्रेसची केस वेगळी आहे. एखादा उद्योग कुणी बंद करायला निघाले तर आंदोलन होते, वातावरण तापते. कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण होते. पण इथे असे काहीही झाले नाही.
ग्रंथपरिचय
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात सामाजिक स्वास्थ्य आणि रोगप्रतिबंध याकडे अधिक लक्ष दिले गेले व वर्षानुवर्षे या कार्यासाठी अधिकाधिक आर्थिक व्यवस्था करण्यात आली. कुटुंबनियोजन तसेच देवी निर्मूलन, मलेरिया, हत्तीपाय, कॉलरा, पोलिओ, कुष्ठरोग यासारख्या घातक संक्रामक रोगांविरुद्ध विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. क्षयरोग, हिपॅटायटिस, एड्स यांसारख्या रोगांविरुद्ध प्रतिबंधात्मक योजना आणि जनमत जागृतीचे कार्यही चालू आहेच. हे सर्व झाले शासकीय स्तरावरील प्रयत्न. परंतु याचसोबत सामान्य जनतेतही मंद गतीने का होईना, आरोग्यविषयी जागृती होत आहे. स्वच्छ व शुद्ध पेयजल, भेसळरहित अन्न, समतोल आहार, व्यायामाचे महत्त्व, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, रोगप्रतिबंधात्मक उपाय याविषयी मुख्यतः नागर आणि शिक्षित जनतेची जाणीव वाढीस लागली आहे.
तळागाळातील घबाड
शीतयुद्ध संपून एका सोव्हिएत संघाची अनेक राष्ट्रे झाली. दक्षिण अमेरिकन देश, भारत, चीन, सारे बुरखे फाडून उदार आर्थिक धोरणे राबवू लागले. ह्या सर्व देशांमधील अनेक कोटींचा मध्यमवर्ग आता आपल्या कक्षेत आला, आणि आता आपली उलाढाल आणि आपले नफे दिवसा दुप्पट, रात्री चौपट होऊ लागणार; असा बहु राष्ट्रीय कंपन्यांचा ( MNC, ‘बराकं’) समज झाला. प्रत्यक्षात मात्र आर्थिक अरिष्टे येतच राहिली आणि ‘बराकं’ होत्या तेथेच घुटमळत राहिल्या. अखेर गेल्या अकरा सप्टेंबरला दहशतवादाने जागतिक व्यापार केंद्र प्रतीकात्मक रीत्याही जमीनदोस्त केले.
आता ‘बराकं’नी आपली व्यापारी गणिते नव्याने सोडवायला हवी आहेत.
शिक्षणात बदल : गोरगरिबांच्या शिक्षणावर गदा
भारतात आता बदलत्या शिक्षणाच्या धोरणामुळे गरिबांचे शिक्षणच बंद होणार असे श्री. अरविंद वैद्य यांनी त्यांच्या लेखात (आ. सु., जुलै-ऑगस्ट, २००२) सांगून वाचकांचे डोळे उघडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आता भारतात समाजपरिवर्तन हा शिक्षणाचा हेतू राहिला नसून, भांडवली विषमतेची रचना मजबूत करणे हाच शिक्षणाचा हेतू होऊ लागला आहे, हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे. पण हा हेतू आजचाच नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाच्या उच्चवर्णीय श्रीमंत नेत्यांनी गोरगरिबांच्या शिक्षणाकडे खुल्या मनाने लक्ष दिलेच नव्हते आणि आता नव्या धोरणाने गरिबांच्या शिक्षणावर ते गदाच आणणार हे वाचून वाईट वाटते.
तंट्याच्या पत्राबाबत
‘तंट्या’ या बाबा भांडांच्या कादंबरीत (साकेत, २०००) कधीतरी १८७९ मध्ये तंट्या भिल्लाने निमाडच्या डेप्युटी कमिशनरला लिहिलेले एक पत्र भेटले.
गाडगीळ-गुहा यांचे ‘धिस फिशर्ड लँड’ पुस्तक नोंदते की इंग्रजांपूर्वीचे राजे जंगलांकडे बहुतांशी दुर्लक्षच करत असत आणि ही स्थिती इंग्रजांच्या आगमनानंतर बदलली. तंट्याचे पत्र नेमका हाच मुद्दा नोंदते, म्हणून भांडांना पत्र पाठवून पत्राची जास्त माहिती विचारली. त्यांच्या उत्तराचा संलग्न भाग असा —- “तंट्यासंबंधीचे मूळ दस्तावेज धुंडाळीत असताना निमाडच्या असिस्टंट डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट ऑफ पोलिसची टिपणी सापडली आहे. ती एच. पी. स्किपटन् यांनी तंट्यासंबंधीची माहिती जमवून तयार केली होती.
धिस फिशर्ड लँड : लेख ६
जाती आणि निसर्गाचे दोहन
भारताच्या सर्वच भागांमध्ये संकलक जीवनशैलीला ‘संपवून’ स्थिर शेतीची शैली घडली नाही. गंगेच्या तीरावर पुरांचा धोका, पूर्व घाट आणि सह्याद्रीच्या आसपास समतल जमिनीचा अभाव, तराई भाग डासांनी आणि दलदलींनी ग्रस्त, काही क्षेत्रांत पाऊस बिनभरवशाचा, अशा अनेक अडचणींमुळे या ‘कठिण’ क्षेत्रांमध्ये संकलन-पशुपालन करणारे समाज तगून राहिले. इतर भागांत मात्र शेती स्थिरावली.
शेतीचा प्रसार होत असताना संसाधनांच्या वापरात ‘शहाणपण’ खूपसे ‘वरून’ येत असे. जैन आणि बौद्ध धर्मांच्या अहिंसेला राजाश्रय मिळत होता. नव्याने संकलनाकडून शेतीत येणाऱ्यांना निसर्गावर आघात न करता जगण्याची सवय होतीच.
तंट्या भिल्लाचे इंग्रजांस पत्र
मे. हुजूर जनाब डिप्टी कमिशनर साहेब, निमाड इलाका,खंडवा.
अर्जदार तंट्या वलद भावसिंग भील, रा. पोखर, जि. निमाड सरकार चरणी अर्ज पेश करतो, की सरकार आम्हा गरिबाच्या जिवावर उठले आहे. जंगलातल्या लोकांना हुसकावून लावण्याचा सरकारचा इरादा चांगला नाही. आतापर्यंत कोणत्याही मायबाप सरकारनी डोंगरातल्या आम्हा लोकांना हात लावला नाही, की त्यांची खोड काढली नाही. होळकर सरकार, असीरगड–बु-हाणपूरच्या सरकार आणि इतर रियासतीने या जंगलातल्या माणसाला सांभाळून घेतले आहे. मग गोऱ्या सरकारलाच ह्या जंगलाच्या वाट्याला का जावे वाटले? आतापर्यंत पाटील, पटवारी, सावकारांनी ह्या आम्हा लोकांना पिळले–लुबाडले; पण अडचणीच्या वेळी त्यांनीच मदतही केली आहे; परंतु आता तुमच्या हुकुमावरून त्यांनी जास्ती पिळवणूक सुरू केली आहे.
पत्रसंवाद
केशवराव जोशी, तत्त्वबोध, हायवे क्र. ३५, नेरळ — ४१० १०१
मध्यंतरी मी नेरळच्या चौकात दहावीच्या प्रश्नपत्रिकेतील उतारा लावला होता. लगेचच भा.ज.पा.च्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा नेऊन मला दंड- प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४९ प्रमाणे नोटिस द्यावयास लावली. सदरहू नोटिसीत ‘बोर्ड लावून लोकांच्या भावना भडकावून जातीय व धार्मिक तणाव निर्माण झाला’; असे । म्हटले आहे.
वास्तविक सदरहू उताऱ्यात ‘दगडाच्या मूर्तीपुढे मोदक, लाडू, लोणी हे न ठेवता ते गरिबाला द्या’ असा उपदेश होता. असाच उपदेश तुकाराम, रामदास आणि एकनाथ यांनीसुद्धा केला आहे.
संपादकीय असुरक्षित एकाकी भाव—-आणि उतारा
भारताच्या इतिहासात सामान्य जनतेने युद्धांमध्ये किंवा मोठ्या राजकीय चळवळींमध्ये भाग घेण्याची उदाहरणे फारशी नाहीत. कौरवपांडवांचे युद्ध होत असताना म्हणे आसपासचे शेतकरी दिवसाभराची कामे आटपून युद्ध ‘पाहायला’ येऊन उभे राहत. यात ‘धर्मयुद्धा’मुळे बघ्यांना भीती वाटत नसण्याचा भाग असेलही, पण जास्त महत्त्वाचे हे की कोण जिंकणार, या प्रश्नाचे उत्तर शेतकऱ्यांना नांगरण-डवरण-रोपणी-कापणीपेक्षा महत्त्वाचे वाटत नसे. अठराशे सत्तावनच्या लढायांबाबतही अशाच नोंदी आहेत. लढाईच्या क्षेत्रात, लढाईच्या काळापुरती शेतीची कामे बंद पडत. एकदा का लढाई संपली की पुन्हा कामे सुरू होत. अगदी शिवकालातही कवींनी कितीही “बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था” असे सांगितले तरी शेतीच्या हंगामात सैन्ये उभारता येत नसत.