अनौरस मुलांचा कैवार घ्यावयाचा म्हणून त्यांना बापाचे नाव लावता येत नाही म्हणून कोणीच ते लावले नाही म्हणजे प्रश्न सुटला असे डॉ. संजीवनी केळकरांना वाटत असावे. मला मात्र वेगळे वाटते. मला त्या निरागस मुलांच्या मातांचा कैवार घेण्याची गरज वाटते. त्यांच्याकडे क्षमाशील दृष्टीने पाहावेसे वाटते. त्यांचे आचरण मला निंद्य वाटत नाही. त्या मातांचे आचरण सध्याच्या तथाकथित उच्चवर्णीयांच्या मूल्यव्यवस्थेच्या विरुद्ध आहे एवढाच त्यांचा अपराध मला वाटतो. मला सध्याची मूल्यव्यवस्था मान्य नाही. ती कायमची नष्ट केली पाहिजे असे विचार अलीकडे माझ्या मनात येत आहेत.
आजची मूल्यव्यवस्था – स्त्रीपुरुषविषयक नीती – ही पुरुषांना झुकते माप देणारी आहे.