मासिक संग्रह: जानेवारी, १९९६

पत्रव्यवहार

आजच्या सुधारकच्या ऑक्टोबर १९९५ च्या अंकात श्री. घनश्याम कमलाकर वाईकर यांचे पत्र वाचले. त्यातील विचार सर्वसाधारणपणे योग्य आहेत. मला तर असे वाटते की बुद्धिवादी आजचा सुधारक मध्ये कोणत्याही धर्मावर कोणत्याही कारणाने ठाम श्रद्धा ठेवणाच्या व्यक्तीचे अवतरण मुखपृष्ठावर किंवा मलपृष्ठावर, व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व मान्य करूनही, एक तत्त्व म्हणून प्रसिद्ध केले जाऊ नये.
मात्र ‘मग बाई ह्या ख्रिस्ती स्मारकात चोर दरवाजाने कशा शिरल्या?’ असा प्रश्न विचारणे हे पंडिता रमाबाईंवर अन्याय करणारे आहे असे मला वाटते. कारण मुळात एका धर्माने केलेल्या अन्यायाचे निराकरण दुसर्यार धर्मात जाऊन म्हणजे धर्मांतर करून होते हा विचारच अपुरा ठरतो आहे.

पुढे वाचा

दिवाळीतील आनंद – (२)

अनिल अवचटांची भेट हे दिवाळी अंकांचे एक आकर्षण असते. यावर्षी ‘मौजेत ते ‘तेंदूपानांच्या प्रश्नावर काय म्हणतात हे वाचायची उत्सुकता होती. त्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी त्यांच्या ज्या चकरा झाल्या त्यात एकदा ते आ. सुधारकच्या कार्यालयात येऊन गेले होते. अवचट संशोधक अधिक, कार्यकर्ते अधिक की लेखक अधिक असा प्रश्न पडतो. त्यांचे लिखाण वाचल्यावर विवेकशील मानवता हे जे मानवी जीवनाचे साध्य ते त्यांच्या शब्दाशब्दांतून दिसते.
बिडी उद्योगावर लाखो गरीब लोक पोट भरतात. चाळीस लाख नुसते विड्या वळणारे आहेत. विडीचे वेष्टण तेंदूपान असते. ते गोळा करणारे लाखो.

पुढे वाचा

मराठी बाणा (एड्सग्रस्त महाटी भाषा)

मराठी अस्मिता उर्फ मराठी बाणा नामक एकेकाळी पालखीतून वाजत गाजत मिरवणारी चीज आता दुर्मिळ झाली असून, मराठी भाक्किांना वेळीच जाग आली नाही तर ती नामशेष होईल, याबद्दल विचारवंतांत तरी एकमत दिसते. प्रश्न असा की जरूर पडेल तेव्हा अमृतातें जिंकण्याची पैज मारणारी, सुबत्तेच्या काळात नूपुरात रंगणारी, प्रसंग ओळखून डफ तुणतुण्याची वीरश्रीने साथ करणारी मराठी भाषा आजच अशी मृतप्राय का व्हावी? सात कोटी लोकांच्या मुखी, निदान घरात तरी, असणार्याा या भाषेला स्वतःचे सरकार आहे. म्हणजेच ती केवळ लोकभाषा नसून राजभाषाही आहे. मग आजच तिला अशी घरघर का लागावी?

पुढे वाचा

बुद्धि उपयुक्त, की भावना?

अति शहाणा, त्याचा बैल रिकामा” अशी एक जुनी म्हण प्रचलित आहे. या म्हणीची पाश्र्वभूमी ग्रामीण महाराष्ट्र ही असली तरी तिचा वापर ग्रामीण तसेच नागरी संदर्भात होत आलेला आहे. एक शेतकरी फार बुद्धिमान होता व आपण आपल्या शेतीची दैनंदिन कामे फार हुशारीने करतो अशी त्याची समजूत होती. शेतीच्या मशागतीसाठी त्याच्याजवळ एक बैल होता. पण इतर सामान्य शेतकर्‍यांप्रमाणे औताला बैल जुंपण्यापूर्वी हा बुद्धिमान शेतकरी खूप सूक्ष्म विचार करी. त्यामुळे रोज त्याचे काम लांबणीवर पडत जाई व बैल रिकामाच राही. असे होता होता शेतीच्या कामाची वेळ टळल्याने या बुद्धिमान शेतकर्याकची अतोनात हानी झाली आणि बैल मात्र सदैव रिकामाच राहिला!

पुढे वाचा

कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग ३)

आपल्या भारतीय नागरित समाजामध्ये कुटुंबाची किंवा कुटुंबप्रमुखाची मुख्य जबाबदारी त्रिविध आहे हे आपण जाणतो. ती म्हणजे (१) मुलांचे आणि नातवंडांचे शिक्षण करणे, (२) त्यांना नोकरी लावून देणे व (३) त्यांची शक्य तितक्या थाटामाटात लग्ने लावून देणे ही होय. बाकीच्या सगळ्या जबाबदार्या( ह्यांच्यापुढे गौण किंवा तुच्छ मानल्या जातात. त्या जबाबदार्यांसमुळे पर्यायाने त्यांसाठी बसविलेल्या आपल्या समाजाच्या घडीमुळे आपल्या शिक्षणक्षेत्रावर जे अनेक परिणाम होतात त्यांपैकी काही आपण आतापर्यंत पाहिले. तसेच ते मुलांना नोकरी लावून देण्याच्या आणि त्यांची लग्ने लावून देण्याच्या बाबतींतही अधिक सविस्तरपणे पाहता येतील, पण मला त्याची गरज वाटत नाही.

पुढे वाचा

नियमबद्धतानियमाच्या मर्यादा

मला विश्वातील सर्व रचनांची या क्षणीची स्थाने आणि गती सांगा, म्हणजे मी आत्तापासून अनंत काळापर्यंतच्या त्यांच्या (सर्व रचनांच्या) स्थानांचे आणि गतींचे भाकित वर्तवून दाखवीन” – हे लाप्लासचे वाक्य म्हणजे वैज्ञानिक नियमबद्धतावादाचे ब्रीदवाक्य मानले जाते. खरे तर “मानले जात असे” असे म्हणणे जास्त योग्य.
लाप्लासने हे विधान केले तेव्हा न्यूटन नुकताच “होऊन गेला होता. गुरुत्वाकर्षणाने आणि गतीच्या नियमांनी विश्वातील सर्व रचनांबाबतच्या भविष्यकथनांची शक्यता निर्माण झाली, असे भासत होते. एक अंतिम, मूलभूत निसर्ग-नियम सापडला आहे, आणि यापुढे फक्त तपशील भरून काढायचे काम उरले आहे, अशी जबर आत्मविश्वासाची भावना काही वैज्ञानिकांमध्ये बळावली होती.

पुढे वाचा

धर्म, सुधारणा आणि विवेक

हे धर्मसुधारणेचे युग आहे. अनेक शतके स्थाणुवत् अपरिवर्तमान राहिलेल्या हिंदुधर्मामध्ये गेल्या शतकापासून तो आजपर्यंत अनेक सुधारणांचा पुरस्कार करण्यात आला आहे. रानडे, टिळक, गांधी, कर्मवीर शिंदे इत्यादि धर्मसुधारकांनी आपापल्या परींनी ग्रंथनिविष्ट हिंदू धार्मिक परंपरेचे नवीन अर्थ लावले आहेत. सावरकर, गोळवलकर गुरुजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख नवनवीन बदल सुचवीत आहेत. काही बाबतींत तर हिंदुधर्म टाकून वेगळ्या धर्मात एक नवा पंथ स्थापण्यापर्यंत सुधारणेने मजल मारली आहे. या सर्व विविध धर्ममंथनांसंबंधी विचार करू लागल्यावर एक गोष्ट मनात उभी राहते ती ही की धर्मसुधारणा या संकल्पनेत काही तरी विपरीत अभिप्रेत नाही काय ही शंका.

पुढे वाचा

आमचा धर्म

आमचा धर्म इतरांहून श्रेष्ठ आमचा धर्म इतरांच्या धर्माहून श्रेष्ठ आहे, व त्यांचे रहस्य स्पष्टपणे कोणास कधींही कळावयाचे नाही असे म्हणणे म्हणजे कित्येक अशक्य गोष्टी कबूल करण्यासारखे आहे.
सर्व दृश्य विश्वाचे आदिकारण; काल आणि स्थल यांनी मर्यादित होत नाही म्हणून ज्याला अनादि आणि अनंत असे म्हणतात; आपली प्रचंड सूर्यमालासुद्धा ज्याच्या अचिंत्य सामर्थ्याचे अत्यंत सूक्ष्म निदर्शन आहे असे म्हटले तरी चालेल – अशा सर्वव्यापी परब्रह्माने मत्स्य-कूर्म-वराह-नारसिंहादि दशावताराच्या फेर्‍यात सांपडून युगेंच्या युगें भ्रमण करतां करतां एकदां आमच्या कल्याणासाठी गोकुळांतील एका गवळणीच्या पोटीं यावें; शुद्ध शैशवावस्थेत पूतनेसारख्या प्रचंड राक्षसिणीचे, स्तनपानाच्या मिषानें, चैतन्यशोषण करावे, चालता बोलतां येऊ लागलें नाहीं तों लोकांच्या दुभत्यावर दरोडे घालण्यास आरंभ करून आपल्या सहकार्यांस यथेच्छ गोरस चारावे, आणि त्यांसह रानांत गुरे घेऊन जाऊन तेथे पोरकटपणास शोभणारे असे खेळ खेळावे; पुढे तारुण्याचा प्रादुर्भाव झाला नाहीं तों कामवासना प्रज्वलित होऊन कधीं मुरलीच्या मधुर स्वराने वृंदावनांतील तरुणांगनांना वेड्या करून आपापल्या घरांतून काढून आणाव्या आणि त्यांबरोबर रासादि क्रीडा कराव्या, किंवा यमुनेत त्या स्नानास उतरल्या असतांना त्यांचीं वसने कळंबाच्या झाडावर पळवून नेऊन तेथून त्यांशीं बीभत्स विनोद करावा; नंतर सोळा सहस्र गोपींचें पतित्व पत्करून फक्त दोघींसच पट्टराणीत्व द्यावे, पण त्यांतल्या त्यांतही पक्षपात केल्याशिवाय राहूं नये; पराक्रमाचे दिवस आले असतां स्वतः शस्र हातीं न धरतां दुसर्‍याचे सारथ्य स्वीकारून प्रसंगविशेष सल्लामसलत मात्र द्यावी; व घरच्या घरी यादवी माजून राहून कुलक्षय होण्याचा प्रसंग आला असतांही, ब्रह्मज्ञानाचा उपदेश देण्याच्या मिषाने युद्ध करण्यास उत्तेजन द्यावे – हे सारे शक्य, संभवनीय, व विश्वसनीय आहे असे मानिले पाहिजे.

पुढे वाचा