मासिक संग्रह: जुलै, १९९७

पुस्तकपरिचय

श्रद्धांजली
लेखक : विजय हर्डीकर, प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, मूल्य : १७५
‘जनांचा प्रवाहो चालिला’ या पुस्तकाचे लेखक म्हणून आपल्याला परिचित असलेल्या श्री. विनय हर्डीकरांचे श्रद्धांजली हे नवे पुस्तक. यात आपले जीवन श्रीमंत करणार्याल चौदा व्यक्तींच्या कर्तृत्वाचे आलेख आहेत असे ते म्हणतात. पण पुस्तक वाचून होताच वाचकाच्या मनावर ठसते ते पंधरा व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व. कारण या चौदा जणांच्या कार्याची ओळख करून देत असताना अभावितपणे लेखकाचीही ओळख पक्की होत जाते. या पुस्तकातून हर्डीकर लेखक कमी आणि कार्यकर्ते जास्त असे दिसून येतात. लेखकाचे जीवन समृद्ध करणार्याय या महानुभावांची व्यक्तिवैशिष्ट्ये चितारताना त्यांनी जागोजागी स्वानुभवाचे अस्तर लावलेले आहे.

पुढे वाचा

मी नास्तिक का आहे?

एखादी गोष्ट अस्तित्वात आहे की नाही, हा ज्ञानक्षेत्राशी निगडित प्रश्न आहे. आणि त्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण किंवा अनुमान हे ज्ञानसाधन आहे. ईश्वराविषयी जेव्हा पुरावा मागितला जातो तेव्हा हा श्रद्धेचा प्रश्न आहे, असे आस्तिक म्हणतात. श्रद्धा ही ज्ञानसाधन होऊ शकते काय?ज्याचा पुरावा देता येत नाही त्यावर विश्वास म्हणजे श्रद्धा. ही श्रद्धा ज्ञानसाधन कशी काय होऊ शकते?
ज्याप्रमाणे आस्तिक ईश्वर हे अंतिम तत्त्व मानतात त्याप्रमाणे सांख्य तत्वज्ञानात पुरुष आणि प्रकृती ही अंतिम तत्त्वे मानली जातात. तर अनेकेश्वरवादात अनेक ईश्वर मानले जातात. श्रद्धा हे ज्ञानसाधन असेल तर या विश्वाच्या, सृष्टीच्या मागचे अंतिम तत्त्व काय, या प्रश्नाचे उत्तर सारखे असले पाहिजे, हे उघड आहे.

पुढे वाचा

यांचा सेक्युलरिझम् म्हणजे केवळ हिंदुद्वेष!

बंगलोरला येत असताना, नागपूर ते मद्रास या प्रवासात आजचा सुधारकचा मे १९९७ चा अंक वाचला. या अंकात श्री अविनाश भडकमकर नावाच्या सद्गृहस्थाचा ‘‘धर्मनिरपेक्षतेला आव्हान’ या शीर्षकाचा लेख आहे. लेखकाचा आव तात्त्विक चर्चा करण्याचा असला, तरी त्यांचा खरा हेतु भारतीय जनता पार्टीला झोडपून काढण्याचा दिसून येतो. तत्त्वचिंतन कमी आणि पूर्वग्रह अधिक अशा लेखाला तात्त्विक म्हणावे किंवा नाही, असा प्रश्न कुणाच्या मनात उत्पन्न झाला, तर त्याला त्याबद्दल दोष देता येणार नाही. तथापि, श्री भडकमकर यांच्या या लेखाच्या संदर्भात,विशेषतः त्यांच्यासाठी आणि सामान्यतः सर्व तथाकथित सेक्युलरिस्टांसाठी मी काही मुद्दे प्रस्तुतकरीत आहे.

पुढे वाचा

वैज्ञानिक व आस्तिकता

वैज्ञानिक व आस्तिकता यांविषयी गेल्या तीन महिन्यात ‘आजचा सुधारक’मध्ये वेगवेगळी मते मांडण्यात आली. ह्याच चर्चेचा धागा पकडून काही माहिती देत आहे. अत्याधुनिक ज्ञानाच्या क्षेत्रात पुढारलेल्या व सर्व प्रकारचे ऐहिक सुख भोगत असलेल्या अमेरिकन वैज्ञानिकांना ईश्वर व अमरत्व (life after death) यांविषयी काय वाटते याबद्दलची एक चाचणी नुकतीच घेण्यात आली. ३ एप्रिल १९९७ च्या ‘नेचर’च्या अंकात याविषयीचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. जॉर्जिया विद्यापीठाचे एड्वर्ड लार्सन व लॅरी विथम यांनी १९९६ मध्ये यथातथाच निवडलेल्या १००० वैज्ञानिकांची चाचणी घेण्यात आली. अशीच वैज्ञानिकांची चाचणी यापूर्वी १९१६ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व संशोधक जेम्स ल्यूबा यांनी घेतली होती.

पुढे वाचा

वैज्ञानिक रीत

डॉ. हेमंत आडारकर यांच्या पत्राच्या (आ. सु., ८:२, ५९-६१) संदर्भात थोडे विवेचन.
आपल्या पत्रातील पहिल्याच परिच्छेदात डॉ. आडारकरांनी आम्ही आमच्या लेखात (आ. सु., ८:१, २४-२५) वर्णन केलेल्या भस्मधारी तथाकथित वैज्ञानकांच्या वर्णनाची पुष्टीच केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.

विज्ञान हे गृहीतकांपासूनच सुरू होते हे खरेच. सर्वप्रथम कोणा एका वैज्ञानिकाच्या (अथवा सामान्यजनांच्याही!) तल्लख डोक्यात एखाद्या भन्नाट कल्पनेचा (idea) उगम होतो. त्यानंतर, ती व्यक्ती वैज्ञानिक असली तर, अशी कल्पना उपलब्ध ज्ञानावर तपासली जाते व ती अगदीच निराधार (म्हणजे पाण्यापासून पेट्रोल सारखी) नसेल तर ती कल्पना तपासून पाहण्यासाठी (test करण्यासाठी) प्रयोगांची आणखी केली जाते व त्यानुसार प्रयोग वारंवार (हे महत्त्वाचे) केले जातात.

पुढे वाचा

‘सद्गुरुमाय कुंटीण झाली माझी’

उडत्या तबकड्यांमधून परग्रहांवरले जीव पृथ्वीवर येतात. इथल्या जीवजातींचे नमुने गोळा करून अभ्यासासाठी न्यायच्या हेतूने ही मोहीम असते. कुत्रे, झाडे वगैरेंना पकडून नेण्यात येते, तसेच माणसांनाही. पण त्या ‘परक्यांना इथल्या व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करायची नसते, म्हणून सर्व ‘नमुन्यांच्या तपासण्या झाल्यावर त्यांना परत स्वगृही पोचवले जाते. मांजरे, गुलाबाची रोपे वगैरेंना या प्रकारांचे स्मरण राहत नाही, व ते जीव आपल्या भाईबंदांना सावध करू शकत नाहीत. माणसांना मात्र स्मरण राहते व ती इतर माणसांना सजग करण्यासाठी अशा अनुभवांची वर्णन करतात. कधीकधी या घटनांचे स्मरण सहजपणे मनाच्या पृष्ठभागावर येत नाही.

पुढे वाचा

परंपरा, आधुनिकता व राष्ट्रवाद

आधुनिकतेचा विचार राष्ट्रवादाच्या संदर्भात केला नाही तर तो अपुरा आणि अधांतरी राहतो असे मला वाटते. म्हणून त्या दोहोंचा संबंध तपासण्याचा हेतू मनात धरून हा लेख लिहीत आहे.
मानवतेवर आधारलेला नीतिविचार आणि बुद्धिवाद ही दोन ‘‘आधुनिक’ म्हटली जाणारी मूल्य आहेत. प्र. ब. कुळकर्णीच्या शब्दांत (आ. सु. मार्च १९९७) “विवेकनिष्ठ मानवता हेआधुनिकतेचे बीज आहे.” “मानवता”म्हटले की राष्ट्रवाद बाद होतो. राष्ट्रवाद बाद होणे मला रुचणारे नाही. तेव्हा प्रथम राष्ट्रवादाची गरज मला का वाटते आणि त्याचे स्वरूप काय हे अत्यंत सक्षेपाने सांगून नंतर राष्ट्रवादाचा नीतिविचाराशी व बुद्धिवादाशी कोणत्या प्रकारचा संबंध असू शकतो याचा शोध मी घेणार आहे.

पुढे वाचा

श्री रिसबूड यांना उत्तर

याच अंकात पत्रव्यवहार या सदरात श्री माधव रिसबूड यांचे मला आलेले पत्र छापले आहे. या पत्राचा सूर उघड उघड अनादराचा, अधिक्षेपाचाही आहे. माझी विचारसरणी साचेबंद आहे असा त्यांचा आरोप आहे. ते मला हटवादीही म्हणतात. त्यांच्या सप्टेंबर ९३ च्या पत्राला दिलेल्या उत्तरात मी जाणीव कल्पनेची थट्टा केली आहे, समर्पक उत्तर दिले नाही अशी त्यांची तक्रार आहे. असे जर आहे तर त्यांनी त्याच विषयावरील विचार पुन्हा माझ्यापुढे का मांडावेत? माझ्या साचेबंद हटवादी भूमिकेतून त्यांना हवे ते उत्तर मिळाल्याची आशा नसल्यामुळे या पत्राचे प्रयोजन काय असा प्रश्न मला पडला आहे.

पुढे वाचा

प्लेटोचे आदर्श राज्य

प्लेटोच्या Republicच्या राज्यशास्त्रीय मतांची भल्या लोकांनी प्रशंसा करावी हे वाङ्मयीन भद्रमानी वृत्तीचे (snobbery) चे अत्यंत आश्चर्यकारक उदाहरण आहे. या एकतंत्री हुकूमशाही प्रबंधाविषयीच्या काही गोष्टी पाहा. शिक्षणाचे मुख्य प्रयोजन युद्धात धैर्य निर्माण करणे हे असून अन्य सर्व गोष्टी त्याला साधनीभूत मानल्या पाहिजेत. याकरिता माता आणि आया यांच्याकडून बालकांना सांगितल्या जाणार्यास गोष्टींची कडक तपासणी केली पाहिजे. होमरचे वाचन बंद केले पाहिजे, कारण तो भ्रष्ट लेखक वीरांना रडवतो आणि देवांना हसवतो. नाटकाला मनाई केली पाहिजे, कारण त्यात खलपुरुष आणि स्त्रिया असतात. संगीत काही विशिष्ट प्रकारचेच असले पाहिजे, म्हणजे आजच्या परिभाषेत Rule Britannia सारखे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. दि. य. देशपांडे यांना स. न.
मे ९७ च्या आ. सु. मधील आपल्या लेखावरील माझे विचार कळवितो.
आपण असे म्हटले आहे की श्री आडारकर यांनी त्यांना काय अनुभव आले ते सांगितलेले नाही; ते नेमके काय होते हे कळेपर्यंत त्यांचे महत्त्व निश्चित करणे अशक्य आहे. पण मला असे वाटते की जरी ते अनुभव त्यांनी लिहिले असते तरी आपण बहुधा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असते, कारण आपली जी एक साचेबंद विचारसरणी आहे तिला ते गैरसोयीचे वाटले असते. मी हे म्हणतो त्याला कारण आहे.

पुढे वाचा