मासिक संग्रह: सप्टेंबर, १९९८

संपादकीय

जुनें जाउं द्या मरणालागुनि
जातीयतेमुळे निर्माण होणारी उच्चनीचता ही विषमतेमध्येच मोडत असल्याकारणाने तिच्याविरुद्धचा म्हणजेच विषमतेविरुद्धचा लढा पुढे चालविण्यास आजचा सुधारकला आपल्या वाचकांचे साहाय्य हवे आहे. गेल्या दोनतीनशे वर्षांपासून न सुटलेला हा प्रश्न आम्ही सोडवावयास घेतला आहे. दोनतीनशे वर्षांपूर्वी विषमता नव्हती असा ह्याचा अर्थ नव्हे; पण ती हटविण्यासाठी यत्न सुरू झाले नव्हते, ते त्या सुमारास सुरू झाले. आजवर केल्या गेलेल्या प्रयत्नांना यश आलेले नाही हे जाणून ह्या अत्यन्त जटिल प्रश्नाचे उत्तर आपणास चर्चेमधून काढावयाचे आहे. ही समस्या एकट्या संपादकांनी सोडवावयाची नाही. ती एकट्यादुकट्याला सुटण्यासारखीच नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

ब्राह्मणेतर समाजवर्ग व आजचा सुधारक – एक प्रतिक्रिया
आजचा सुधारकच्या ऑगस्ट १९९८ च्या अंकात प्रभाकर नानावटी व टी.बी. खिलारे ह्या दोघांनी मिळून लिहिलेला पत्रस्वरूपाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. आजचा सुधारकची एक वाचक म्हणून (संपादक मंडळातील एक म्हणून नव्हे !) मला ह्या लेखकद्वयासमोर काही मुद्दे विचारार्थ मांडावेसे वाटतात म्हणून हा पत्रप्रपंच!
आजचा सुधारकचे वाचक ‘ह्या’ दृष्टिकोनातून अंक वाचतात ह्याचा खेद झाला. एकीकडे आठ वर्षांची वाटचाल पूर्ण केली ह्याबद्दल अभिनंदन करून तसेच त्यातील लेखन ‘रूढ अर्थाने ब्राह्मणीवृत्तीला पोषक आहे असा आरोप कोणीही करण्यास धजवणार नाही’ असा निर्वाळा देऊन दुसरीकडे मात्र आजचा सुधारक ह्या मासिकात लिहिणारे व ते वाचणारे केवळ उच्चजातीय आहेत’ हा अर्थ काढायचा ह्या वृत्तीचे आश्चर्य वाटले.

पुढे वाचा

स्फुट लेख – गांधीजींचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य

‘मी नथुराम गोडसे बोलतोय्…’ ह्या नाटकावर बंदी घालणा-यांवर सध्या टीकेची झोड उठली आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची बाजू बळकट करण्यासाठी चढाओढ लागली आहे. प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य असावयालाच हवे असे मानणारे आम्हीही आहोत, पण तेवढ्यामुळेच आम्हाला नथुरामची बाजू घेता येत नाही.
नथुरामने दोन गुन्हे केले आहेत असे आमचे मत आहे. त्याने गांधीजींचे प्राण घेतले म्हणजे गांधीजींचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेतले हा पहिला गुन्हा आणि त्यासाठी कायदा हातांत घेतला हा दुसरा गुन्हा. गांधींचे बोलणे बंद करणे ह्या एकमेव हेतूने त्याने त्यांना मारून टाकले. गांधींनी त्याचे एकट्याचे कोठलेही नुकसान केलेले नव्हते.

पुढे वाचा

प्रो. बा.वि. ठोसर – एक संस्मरण

आजचा सुधारकचे एक लेखक आणि या मासिकाबद्दल विशेष आस्था बाळगणारे प्रोफेसर बा.वि. ठोसर यांचे नुकतेच निधन झाले. नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षे त्यांनी त्याच महाविद्यालयात अध्यापन केले. नंतर ते बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे सर सी.व्ही. रामन यांचेकडे संशोधन करण्यासाठी गेले. इंग्लंडमधून पीएच.डी. मिळविल्यानंतर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च या ख्यातकीर्त संस्थेत ३० वर्षे संशोधन केले आणि न्यूक्लीअर स्पेक्ट्रॉस्कोपी, मोसबॉअर परिणाम, आयन इंप्लांटेशन, पॉझिट्रॉन भौतिकी इत्यादि विषयांच्या संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली. जवळजवळ सात वर्षे त्यांनी भौतिकीचे अधिष्ठाता (dean) या उच्च पदावर काम केले.

पुढे वाचा

कार्यक्षम लोकशाही: ब्रिटिशांचा अमेरिकेकडे एक मत्सरग्रस्त कटाक्ष

मागच्या आठवड्यात अमेरिकन लोकांनी आमच्यापासून त्यांना स्वातंत्र्य मिळाले त्याचा उत्सव साजरा केला. त्या उत्सवाप्रीत्यर्थ ते गेल्या ४ जुलैला मिटक्या मारत बियर प्याले, त्यांनी कबाबांवर ताव मारत नयनरम्य आतिषबाजीचे खेळ पाहिले; आणि हे सारे करीत असताना ब्रिटनपासून मुक्तता मिळविल्याबद्दल स्वतःच्या धैर्याची आणि हिंमतीची आठवण करीत जल्लोष केला.
आणि आम्ही काय केले? आमच्या वसाहतींवरील आमचा ताबा सोडून दिल्याबद्दल आम्ही मेजवान्या दिल्या नाहीत. कारण दोन शतकानंतर सर्वच उलथापालथ झाली आहे. पारडे इतके उलटले आहे की जणू काय तेच मालक आणि आम्ही दास अशी स्थिती प्राप्त झाली आहे.

पुढे वाचा

… आजचा जर्मनी

[आ. सु. च्या ऑगस्ट ९८ च्या अंकात एका जर्मन विचारवंताने स्वतःच्या देशबांधवांना कसे खडसावले त्याचे वर्णन आहे. डेव्हिड हॅल्बरस्टॅम या अमेरिकन वार्ताहर-साहित्यिकाच्या “द नेक्स्ट सेंचुरी” (विल्यम मॉरो, १९९१) या ग्रंथातील जर्मनीसंबंधी एक उतारा या देशाबाबत आणखीही काही माहिती पुरवतो त्याचा हा अनुवाद. संदर्भ आहे, ‘सोविएत युनियनच्या फुटीनंतरचे जग’.]
या सगळ्या बदलांचा, सोविएत युनियन फुटल्याने निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा जर कोणत्या देशाला मिळायचाच असेल, तर तो जर्मनीला मिळेल. इतरांप्रमाणे मलाही वाटते की जर्मनांची शिस्त, त्यांची आर्थिक ‘ऊर्जा’, त्यांच्या अर्थव्यवहाराचे अग्रक्रम, या सा-यांमुळे ते शक्तीची आणि गतिमानतेची नवी उंची गाठतील.

पुढे वाचा

‘ग्लोबलायझेशन’वर उतारा

(१) स्वराज्याचा शोध
कोणत्याही प्रकारची राजेशाही, हुकूमशाही किंवा एकाधिकारशाही नको ही गोष्ट जवळपास सर्वमान्य आहे. लोकप्रतिनिधींच्या संसदीय लोकशाही राज्यव्यवस्थेकडून खूप अपेक्षा बाळगल्या गेल्या, पण अनुभवाअंती भ्रमनिरास होत आहे. आजपासून सुमारे ९० वर्षापूर्वीच ज्याला हे स्पष्टपणे उमगले होते असा एक द्रष्टा माणूस आम्हाला १९०९ साली लिहिलेल्या हिंद-स्वराज्य या छोट्याशा पुस्तिकेतून इशारा देत होता, पण आम्ही त्यालाच वेडा ठरविले. त्याने व अनेक हुतात्म्यांनी ताणलेल्या स्वातंत्र्यांदोलनाच्या कातडीवर संसदीय लोकशाहीच्या शहाणपणाचे नगारे आम्ही बडवीत बसलो व फसलो.
हिंद-स्वराज्य मध्ये ‘इंग्लंडची स्थिती’ या शीर्षकाचे एक प्रकरण आहे.

पुढे वाचा

पुन्हा एकदा नियतिवाद

‘नियति’ म्हणजे केव्हा काय घडणार आहे हे पूर्वीपासूनच ठरलेले आहे असे प्रतिपादणारे मत. हे मत ज्याला Determinism म्हणतात त्यासारखे आहे असे वाटते, पण ते त्याहून वेगळे आहे. नियति म्हणजे जिला इंग्रजीत ‘Fate’ हे नाव आहे ती गोष्ट. नियतिवाद म्हणजे fatalism, या मतानुसार केव्हाही काय घडणार आहे ते पूर्ण तपशिलासह अनादि काळापासून पूर्वनिश्चित आहे. नियतीचे दुसरे नाव आहे भवितव्यता.
या मताहून Determinism भिन्न आहे. त्याला नियतिवाद या नावाऐवजी नियमबद्धतावाद हे नाव अधिक अन्वर्थक होईल. आपल्या सबंध जगाचे मार्गक्रमण अनेक नियमांनी बद्ध असे असून ते सर्व नियम शेवटी कारणाच्या नियमातून उद्भवले आहेत असे
आपण सामान्यपणे मानतो.

पुढे वाचा

पेशवाईअखेरची खानदेशातील जनस्थिति

अगदी साध्या गोष्टीतसुद्धा खरे काय आहे, हे लोकांच्या तोंडून काढून घेण्यास यातायात पडते. लौकर दाद मिळविण्याच्या आशेने ते नेहमी राईचा पर्वत करितात. लांचलुचपती व एकमेकांशी अन्यायाचे वर्तन ह्यांचे प्रमाण इतके वाढले होते की ते सांगू गेल्यास कोणी खरेसुद्धा मानणार नाही. धाकटे घराण्यात अवश्य तितकी धूर्तता आणि रोकड मात्र पाहिजे, की त्याने वडील घराण्याच्या तोंडाला पाने पुसून त्याची मालमत्ता सरकारांतून आपल्याकडे ओढलीच समजा. ह्यामुळे जिकडे-तिकडे गृहकलहाचा वणवा पेटून सरकारी दसरांतसुद्धा बनावट दस्तैवज घुसले, आणि अस्सल खरे दस्तैवज मिळविण्यासाठी मारामारी व ठोकाठोकी माजून राहिली.

पुढे वाचा