कर्मकांड, बुवाबाजी, देवदेवस्कीच्या अंधश्रद्धांत सर्वाधिक बळी जाते ती स्त्री. मात्र समाज व्यवस्थेने-कुटुंबाने लादलेलं परंपरेचं जोखड स्त्रिया आता झुगारून देत आहेत. सारासार विवेकबुद्धी बाजूला ठेवून भावनिक पेचामध्ये अडकलेल्या अनेकजणी अंधश्रद्धेची ही पाचर मोकळी करू पाहत आहेत… बदलाची नांदी सुरू झालीय!
‘बयो हाती घे आता शब्दविचारांची पाटी,
सवाष्णेसंग आता भर एकल्या सखीचीबी ओटी…’
चंद्रपूरच्या ताराबाई आपल्या पहाडी आवाजात नवरा गेलेल्या बाईलाही मान द्यायला सांगतात. भाकरी थापणाऱ्या हातामध्ये पाटी-पुस्तक-अक्षर घ्या, असं मधाळपणे समजावतात. तेव्हा समोर जमलेल्या वस्त्यांमधल्या, पाड्यांमधल्या बायांमध्ये दबकी खुसफूस होते. पोरी-बाया एकमेकींना कोपरानं ढोसतात.