विषय «उवाच»

अपत्यांनी मातापितरांचे कृतज्ञ राहावे?

पुष्कळ अविचारी आईबापे आपणास प्रतिपाल न करण्याइतकी संताने अस्तित्वात आणतात आणि उपजल्यापासून मरे तोपर्यंत त्यांचे जीवित शुद्ध दुःखभार करून ठेवतात ……अशा आईवापांच्या अंतःकरणात खरे अपत्यवात्सल्य असते तर त्यांनी असली संतती जगात आणलीच नसती. कित्येक लोक असे म्हणतात की मुले होणे ही काही कोणाच्या हातची गोष्ट नाही. नसेल बापडी! पण आम्हांस येवढे ठाऊक आहे की जरी प्रत्येक लग्न अपत्यावह होतेच असे नाही, तरी लग्नावाचून, म्हणजे स्त्रीपुरुषांच्या संयोगावाचून अपत्योत्पत्ती होते असे नाही. पावसाप्रमाणे मुले आकाशातून पडत असती….तर आईबापांचे निःसीम आणि निर्व्याज प्रेम आणि त्याबद्दल मुलांची कृतज्ञता यांचे खरे महत्त्व कोणाच्याही मनात बरोबर उतरले असते.

पुढे वाचा

आपण काय करावे?

आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि जगाकडे ताठ मानेने पाहिले पाहिजे. जगातील चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, त्यातील सौंदर्य आणि कुरूपता- या सर्व जशा आहेत तशा निर्भयपणे आपण स्वीकारल्या पाहिजेत. जग बुद्धीने जिंकायचे आहे, त्यातील भयप्रद गोष्टींनी गुलामांप्रमाणे पराभूत होऊन नव्हे. परमेश्वराची सबंध कल्पना पूर्वेकडील सर्वशक्तिमान हुकूमशहांच्या अनुभवातून निर्माण झालेली असून ती स्वतंत्र मनुष्याला मुळीच शोभणारी नाही. जेव्हा माणसे चर्चमध्ये स्वतःला दीन पापी म्हणून लोळण घेतात, तेव्हा ते तिरस्करणीय, स्वाभिमानी मनुष्याला न शोभणारे असते. आपण ताठ उभे राहून जगाकडे निर्भयपणे पाहू या, जगाचा पुरेपूर उपयोग करू या; आणि ते जर आपल्याला कुठे उणे वाटले तर ती उणीव दूर करू या.

पुढे वाचा

ऐहिक सुख

आपण ज्या जगात जन्मलो, त्याची स्थिती सर्वांना शक्य तितकी सुखदायक व्हावी, अशीच खटपट सर्वांनी केली पाहिजे, व त्यांत ऐहिक सुखाचा विचार झाला पाहिजे, ही बुद्धिवाद्यांची भूमिका आहे. आज हिंदुस्थानाला आध्यात्मिक आढ्यतेने ग्रासले आहे. आम्ही सर्व जगाला धडे देऊ ही भूमिका केवळ घमेंडीची आहे, तींत बिलकुल तथ्य नाही. जेथे आम्हांलाच काही येत नाही, तेथे आम्ही लोकांना काय शिकवणार?शास्त्रीय ज्ञानांत आघाडी मारली तरच लोकांना काही शिकवता येईल, एरवी नाही. अध्यात्म हा कल्पनेचा खेळ आहे, त्याचा व्यावहारिक उपयोग बिलकुल नाही. प्रजोत्पत्तीच्या बाबतीत सर्व जगाने संयुक्त धोरण आंखणे जरूर आहे, त्यात आपल्यापुरताच विचार कोणीही करता नये.

पुढे वाचा

कामवासना आणि नीती

जेथे जेथे दोन किंवा अधिक व्यक्तींचा परस्परसंबंध येतो तेथेच नीतीचे प्रश्न उपस्थित होतात, व कामवासना नैसर्गिक रीतीने तृप्त करण्यास प्रत्येकास अन्यलिंगी व्यक्तीची जरूर असते, यामुळे याबाबतीत नीतीचे प्रश्न नेहमीच येतात. अर्थात एवढ्याच दृष्टीने पाहिल्यास असे म्हणता येईल की दोन व्यक्तींची जर संमती असेल, व एकापासून दुसर्‍यास कोणत्याही रोगाचा नकळत संसर्ग होण्याचा संभव नसेल, तर त्यांच्या समागमास हरकत नाही. नकळत म्हणण्याचे कारण कित्येक वेळा दुसर्‍यापासून संसर्गाचा संभव आहे हे माहीत असताही लोक समागमास उद्युक्त होतात, परंतु ते आपले स्वतःचे नुकसान करून घेतात व यात कोणावरही अनीतीचा आरोप करता येणार नाही.

पुढे वाचा

सत्यप्राप्तीचे उपाय

आपल्या मतांपैकी एकही पूर्णपणे सत्य नसते. प्रत्येकाभोवती संदिग्धता आणि भ्रांती यांचे वलय असते. आपल्या मतांतील सत्याची मात्रा वाढविण्याचे उपाय सुविदित आहेत. सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे, आपल्या पूर्वग्रहांविरुद्ध पूर्वग्रह असलेल्या लोकांशी चर्चा करणे, आणि जो उपन्यास (hypothesis) अपर्याप्त सिद्ध होईल त्याचा त्याग करण्याची तयारी ठेवण्याची मनोवृत्ती अंगी बाणवणे – हे ते उपाय होत. या उपायांचा अवलंब विज्ञानात करतात, आणि त्यांच्याच साहाय्याने वैज्ञानिक ज्ञानाची भव्य इमारत उभारली गेली आहे. खरी वैज्ञानिक वृत्ती असलेला प्रत्येक वैज्ञानिक हे कबूल करायला तयार असतो की जे वर्तमान क्षणी विज्ञान म्हणून आपण स्वीकारतो त्यात अधिक शोध लागल्यावर बदल करावा लागणार आहे.

पुढे वाचा

खरी वैज्ञानिक वृत्ती

वैज्ञानिक वृत्तीचे अलीकडच्या काळातील एक अतिशय लक्षणीय उदाहरण म्हणजे सापेक्षतेच्या उपपत्तीचा सबंध जगाकडून झालेला स्वीकार, आइन्स्टाइन नावाच्या एका जर्मन-स्विस्-ज्यू शांततावाद्याची जर्मन शासनाने संशोधक प्राध्यापक म्हणून पहिल्या महायुद्धाच्या आरंभीच्या काळात नेमणूक केली होती. त्याने वर्तविलेलेली भविष्ये युद्धविरामानंतर १९१९ साली झालेल्या ग्रहणाच्या इंग्लिश अभियानाने केलेल्या निरीक्षणांनी खरी ठरली. त्याच्या उपपत्तीने सबंध प्रस्थापित भौतिकीची उलथापालट झाली. डार्विनने बायबलला दिलेल्या धक्क्यासारखा धक्का आइन्स्टाइनने तत्कालीन भौतिकीला दिला होता, असे असूनही पुरावा त्याला अनुकूल आहे हे जेव्हा दिसून आले तेव्हा सर्व जगातील भौतिकशास्त्रज्ञांनी त्याची उपपत्ती बिनतकार स्वीकारली.

पुढे वाचा

सहजप्रवृत्तीला पटेल तेच करावे

मी जे काही थोडे कार्य केले ते हौशीने, मनाच्या उत्साहाने. त्याग, तपश्चर्या, सेवा, दया हे शब्द उगाच माझ्यासाठी खर्च करू नका. त्यांचा मला नाद नाही. मी कुणासाठी म्हणून काही केले नाही. माझ्या स्वतःच्या आनंदाचा मोठा भाग त्यात होता. तशी मी बुद्धिप्रधान आहे. नेम वगैरे मी मानत नाही. शरीराला ज्याची जेवढी गरज आहे तेवढे मी पुरवते. अट्टाहासाने काही सोडत नाही. मनावर लादून काही करत नाही, लौकिकद्रष्ट्या करायची ती व्रतवैकल्ये मला हास्यास्पद वाटतात. परंतु शास्त्रीजींनी सुचवलेल्या सोमवाराचा उपास मी श्रद्धेने करते.

मनातल्या संयमाचे महत्त्व मला फार वाटते.

पुढे वाचा

मुस्लिम जातीयवादाचे आव्हान हे आहे

हिंदू-मुस्लिम संघर्ष खरा दोन मनांमधील प्रवृत्तींचा आहे….

मुस्लिम मन हे स्वभावतः विस्तारवादी आहे, कारण ते धर्मविस्तारवादी आहे. हिंदू हा बंधनवादी आहे. सीमा ओलांडावयाच्या नाहीत हा त्याने स्वतःवर घालून घेतलेला नियम….. तेव्हा हिंदू पुरेसा चैतन्यशील होण्यावर हिंदू-मुस्लिम संबंधाचे स्वरूप अवलंबून आहे….
ही चैतन्यशीलता येणे आणि मनाचा समतोलपणा साध्य होणे हे मुस्लिम राजकारणाचे आव्हान स्वीकारण्याचे खरे दोन उपाय आहेत. हिंदू सनातनीपणा कमी कमी होत जाणे, जाती नष्ट होणे, सामाजिक समतेच्या आणि मानवतेच्या मूलभूत कसोटीवर आधारलेल्या समाजाकडे चालू असलेली हिंदूंची वाटचाल अधिक जोराची होणे, हिंदू खऱ्या आधुनिकतेचा स्वीकार करीत असलेला दिसणे हे उपाय आहेत.

पुढे वाचा

आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील?

अलीकडल्या इंग्रज लोकांनी किंवा युरोपातील दुसऱ्या कोणत्याही लोकांनी कितीही शेखी मिरविली तरी ज्या आम्ही इतक्या पुरातन काळी येवढी मोठी सुधारणा करून बसलो त्या आमच्यापुढे त्यांची मात्रा बिलकुल चालावयाची नाही! …. पण या एककल्ली देशाभिमान्यांना आम्ही असे विचारतो की, बाबांनो, तुम्ही अशा प्रकारे गतवैभवाचे गाणे गाऊ लागला म्हणजे तुमच्या पक्षाचे मंडन न होता उलट मुंडण होते! इंग्रज लोक रानटी होते त्या वेळेस जर तुम्ही इतके सुधारलेले होता, तर आताही त्यांच्यापेक्षा अधिक सुधारलेले असायला पाहिजे होता. पण तसे तर तुम्ही खचित नाही! तेव्हा हे सिद्ध आहे की केव्हातरी तुमच्या सुधारणेस खळ पडला असावा; किंबहुना ती मागेच हटू लागली असावी; कारण सुधारणा ही स्थिर वस्तू नाही; ती पुढे चालेल किंवा मागे सरेल, आमची सुधारणा क्षणैक निश्चल होऊन मग तिची पिछेहाट होऊ लागली असावी असे मानल्याखेरीज ज्यांस आम्ही रानटी म्हणत होतो ती राष्ट्रे दोन हजार वर्षांच्या अवकाशात आम्हापुढे इतकी कशी गेली याचा उलगडा होत नाही.

पुढे वाचा

संत आणि चातुर्वण्र्य

चातुर्वण्याविरुद्ध आजवर अनेक बंडे झाली. त्यांत महाराष्ट्रातील भागवतधर्मी साधुसंतांचे बंड़ प्रमुख होय. पण या बंडातील लढा अगदी निराळा होता. मानवी ब्राह्मण श्रेष्ठ की भक्त श्रेष्ठ असा तो लढा होता. ब्राह्मण मानव श्रेष्ठ की शुद्र मानव श्रेष्ठ हा प्रश्न सोडविण्याच्या भरीस साधुसंत पडले नाहीत. या बंडात साधुसंतांचा जय झाला व भक्तांचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांना मान्य करावे लागले. तरीसुद्धा या बंडाचा चातुर्वण्र्यविध्वंसनाच्या दृष्टीने काहीच उपयोग झाला नाही. असे म्हणता येईल की तुमचे चातुर्वण्र्य तुम्ही ठेवा, आम्ही भक्त होऊ व तुमच्यातील श्रेष्ठ गणल्या गेलेल्या ब्राह्मणांना लाजवू, अशी अहंमान्यता धरून संतांनी चातुर्वण्र्याला मुळीच धक्का लावला नाही.

पुढे वाचा