विषय «उवाच»

बौद्धिक स्वातंत्र्याचे महत्त्व

ज्यांना बौद्धिक स्वातंत्र्य स्वतःकरता महत्त्वाचे वाटते असे लोक समाजात अल्पसंख्येत असतील, पण भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे लोक त्यांच्यामध्ये आहेत. आपण कोपर्निकस, गॅलिलिओ आणि डार्विन यांचे मानवाच्या इतिहासात महत्त्व पाहिले आहे, आणि अशी माणसे भविष्यात निर्माण होणार नाहीत असे मानायचे कारण नाही. जर त्यांना आपले काम करू देण्यापासून प्रतिबंध केला आणि त्याचे परिणाम होऊ दिले नाहीत, तर मानव जातीची प्रगति खुटेल, आणि जसे प्राचीन काळातील उज्ज्वल प्रज्ञेच्या युगानंतर तमोयुग आले तसे एक नवे तमोयुग येईल. नवे सत्य पुष्कळदा विशेषतः अधिकारी वर्गाला कटू असते; तरीसुद्धा क्रौर्य आणि कट्टरता यांच्या दीर्घ इतिहासात ते आपल्या बुद्धिमान, परंतु उनाड मनुष्य जातीचे सर्वात मोठे संपादन आहे.

पुढे वाचा

पुरुषी वर्चस्वाचे दुष्परिणाम

पुरुषी वर्चस्वाचे काही अनिष्ट परिणाम झाले आहेत. मानवी संबंधांपैकी जो अत्यंत जिव्हाळ्याचा – म्हणजे विवाहाचा – त्याला दोन समान भागीदारांतील संबंधाऐवजी स्वामी आणि दास या संबंधाचे रूप त्यामुळे प्राप्त झाले. स्त्रीला आपली पत्नी म्हणून प्राप्त करण्यासाठी तिला सुखविण्याची गरज वाटेनाशी झाली, आणि त्यामुळे प्रियाराधनेचे क्षेत्र विवाहबाह्य संबंध असे ठरले. कुलीन स्त्रियांवर लादल्या गेलेल्या चार भिंतींमधील जीवनामुळे त्यांची बुद्धी आणि मनोहारित्व नाहीसे झाले; आणि मनोहारित्व, साहस हे गुण बहिष्कृत स्त्रियांपुरते सीमित झाले. विवाहसंबंधात समानता नसल्यामुळे पुरुषाची हुकूम गाजविण्याची वृत्ती पक्की झाली. ही स्थिती आता नागरित (civilised) देशांमध्ये बर्‍याच प्रमाणात संपली आहे, परंतु बदललेल्या परिस्थित्यनुरूप आपले आचरण बदलायला खूप कालावधी लागेल.

पुढे वाचा

वैज्ञानिक पद्धतीची सार्वजनिकता

निसर्गविषयक विज्ञानाची दोन वैशिष्ट्ये महत्त्वाची आहेत. ती दोन मिळून जिला ‘वैज्ञानिक पद्धतीची सार्वजनिकता’ म्हणता येईल ती बनते. पहिले वैशिष्ट्य मुक्त टीका. आपल्या उपपत्तीवर आक्षेप घ्यायला जागा नाही अशी वैज्ञानिकाची खात्री असेल; परंतु तिचा त्याच्या सहकारी आणि स्पर्धक वैज्ञानिकांवर काही प्रभाव पडणार नाही, उलट ती त्यांना आव्हान वाटेल. वैज्ञानिक वृत्ती म्हणजे सर्व गोष्टींची परीक्षा घेणे, आणि म्हणून ते अधिकाराने दबत नाहीत. आणि दुसरे वैशिष्ट्य असे की वैज्ञानिक परस्परांना समजतील असेच युक्तिवाद वापरतात. ते वेगवेगळ्या मातृभाषा वापरीत असले तरी एकच भाषा बोलण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

पुढे वाचा

वैज्ञानिक रीत

आपल्या समजुतींतील सत्याची मात्रा वाढविण्याचे उपाय प्रसिद्ध आहेत. त्यांत कोठल्याही गोष्टीच्या सर्व बाजू लक्षात घेणे, सर्व संबद्ध वास्तवे निश्चित करण्याचा प्रयत्न करणे, आपले पूर्वग्रह विरुद्ध पूर्वग्रह असणार्‍या लोकांशी चर्चा करून दुरुस्त करणे, आणि अपुरा सिद्ध झालेल्या कोणत्याही उपन्यासाचा (hypothesis) त्याग करण्याची तयारी जोपासणे – यांचा त्यांत समावेश होतो. या रीतींचा वापर विज्ञानात केला जातो, आणि त्यांच्या साह्याने विज्ञानाचे भांडार जमविले गेले आहे. कोणत्याही काळी जे विज्ञान म्हणून स्वीकारले जाते. त्याचा नव्या शोधांमुळे त्याग करावा लागणे अटळ आहे ही गोष्ट शुद्ध वैज्ञानिक दृष्टी असलेला कोणताही वैज्ञानिक मान्य करायला तयार असतो.

पुढे वाचा

सहजप्रवृत्तीचे प्रशिक्षण

आपल्या स्वाभाविक प्रवृत्ती चांगल्याही नसतात आणि वाईटही नसतात; नैतिकदृष्ट्या त्या उदासीन असतात. त्यांना इष्ट वळण देणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असावे. जुनी ख्रिस्ती लोकांना प्रिय असणारी पद्धत सहजप्रवृत्तींना प्रतिबंध करण्याची होती, परंतु नची पद्धत त्यांना प्रशिक्षित करण्याची आहे. उदाहरणार्थ सत्तेची इच्छा घ्या. ख्रिस्ती नम्रता (humility) शिकविणे व्यर्थ आहे; त्यामुळे ती प्रवृत्ती दांभिक रूपे धारण करते एवढाच तिच्यामुळे फरक पडतो. तिला प्रकट होण्याच्या हितकर वाटा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. मूळची सहजप्रवृत्ती हजार प्रकारांनी शांत होऊ शकते-परपीडन, राजकारण, व्यापार, कला, विज्ञान- या सर्व गोष्टी जर यशस्वीपणे हाताळल्या गेल्या तर ती शांत होते.

पुढे वाचा

शिक्षणातील स्वातंत्र्य

शिक्षणातील स्वातंत्र्याला अनेक बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे शिकावे की न शिकावे ह्याचे स्वातंत्र्य. नंतर काय शिकावे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य. आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणात मताचे स्वातंत्र्य. शिकावे की न शिकावे ह्याचे स्वातंत्र्य बाल्यावस्थेत अंशतःच देता येईल. जे मूढमती नाहीत अशा सर्वांना लिहितावाचता आले पाहिजे. हे केवळ संधी दिल्याने कितपत साध्य होईल हे अनुभवानेच कळेल; परंतु केवळ संधी दिल्यानेच भागते असे दिसले तरी संधी मुलांवर लादाव्या लागतील; कारण बहुतेक मुले खेळणेच पसंत करतील आणि त्यात त्या संधी असणार नाहीत. त्यानंतरच्या जीवनात काय करायचे, उदा.

पुढे वाचा

निसर्गाकडे परत चला!

आपल्या परिचयाच्या गोष्टी आहेत. परंतु यांत नवीन काही नाही. कन्फ्यूशिअसपूर्वी इ. पू. सहाव्या शतकात होऊन गेलेल्या लाओत्सेनेही आधुनिक यंत्रांनी केलेल्या प्राचीन सौंदर्याच्या नाशाबद्दल रस्किनइतक्याच तळमळीने तक्रारी केल्या आहेत. रस्ते, पूल आणि बोटी या अनैसर्गिक असल्यामुळे त्याला भयावह वाटत. आजचे उच्चभ्रू लोक ज्या भाषेत सिनेमाविषयी बोलतात त्या भाषेत तो संगीताविषयी बोले. आधुनिक जीवनातील घाई चिंतनशील वृत्तीला मारक आहे असे त्याला वाटे. मनुष्याने निसर्गानुसार जगावे असे त्यांचे मत होते. हे मत सर्व युगांत वारंवार व्यक्त झाले आहे; मात्र त्याचा आशय दरवेळी वेगळा असे.

पुढे वाचा

कोणती वैवाहिक नीती अधिक चांगली

कोणत्याही देशांतील बहुसंख्य लोकांची अशी पक्की खात्री असते की आपल्या देशातील विवाहसंस्था सोडून अन्य सर्व विवाहसंस्था अनैतिक आहेत, आणि जे लोक असे मानीत नाहीत त्यांना आपल्या स्वैर जीवनाचे समर्थन करावयाचे असते असे ते समजतात. भारतात विधवांचा पुनर्विवाह ही गोष्ट परंपरेने अत्यंत भयंकर मानली गेली आहे. कॅथलिक देशात घटस्फोट पाप मानला जातो, पण वैवाहिक दुर्वर्तन, निदान पुरुपांचे, काही प्रमाणात क्षम्य मानले जाते. अमेरिकेत घटस्फोट सुलभ आहे, पण विवाहबाह्य संबंध फार मोठा दोष मानतात. मुसलमानांना बहुपत्नीकत्व संमत आहे, पण आपण ते निंद्य समजतो.

पुढे वाचा

ही खरेदीविक्रीची पद्धत किती दिवस चालणार?

लग्न ही सर्वसामान्य प्रत्यही घडणारी गोष्ट आहे. मग ही खरेदीविक्रीची पद्धत अजून का नाही बंद पडत? विशेषतः शाळा कॉलेजांतून जाणाऱ्या मुलींना ‘पाहण्याची’ काय आवश्यकता आहे? आम्ही पडदानशीन थोड्याच आहोत? शाळेत जाता-येता मुलगी अव्यंग आहे की नाही हे सहज अजमावता येईल. घरी येऊन तरी चहापोहे झोडून मुलीला चारदोन मामुली प्रश्न विचारण्यापलीकडे वरपक्ष काय करतो? मुलीचे शील व स्वभाव एका दृष्टिक्षेपात ओळखण्याची कुवत वरपक्ष झाल्याने अंगात येते थोडीच! मग वधूपरीक्षेचा अर्थ तरी काय? पाहून मुलगी केल्यावरही ‘तिला अंधारात उभी केली होती’, ‘ती जरा पाठमोरी बसली होती’ वगैरेसारखी क्षुल्लक कारणे सांगून मुलीला वाईट ठरविण्याचा प्रयत्न नाही का लोक करीत!

पुढे वाचा

विवाह संस्था आणि स्त्री

प्रश्न : विवाहसंस्था नष्ट झाली तर मुलांचा प्रश्न निर्माण होईलही; पण स्त्रियांचा तरी विकास होईल का ?

गीता साने: हो, विवाहसंस्था नष्ट झाली तर स्त्रीवरच्या जबाबदाऱ्या कमी होतील आणि विकास होईल. आज बायकांना हे करावसं वाटतं, ते करावस वाटतं, पण जमत नाही. उर्मी एकदा निघून गेली की गेली! हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. माझ्यासारख्या बाईचं सुद्धा मुलं लहान असताना हेच झालं. पण मुलींची जबाबदारी समाजावर व्यवस्थितपणे सोपवून मगच विवाहसंस्था नष्ट करता येईल. दुसरं असं की, बाईला कुणा पुरुषाचं आकर्षण वाटलं की आज समाज तिला धारेवर धरतो.

पुढे वाचा