विस्तारणारी क्षितिजे

नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूरमध्ये दृश्यकलेचा एक अभूतपूर्व उत्सव साजरा केला गेला. “विस्तारणारी क्षितिजे’ नावाचे आधुनिक आणि समकालीन भारतीय दृश्यकलेचे एक प्रदर्शन त्या काळात नागपूरमध्ये भरले होते. ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आणि जणुकाही त्याच्या स्वागतासाठी म्हणून नागपुरातील सिस्फा आर्ट गॅलरीने शहरातील लहान-मोठ्या आर्ट गॅलरीजमध्ये अनेक छोटी छोटी प्रदर्शने भरवली होती. आठवडाभर नागपुरातील चित्ररसिकांना कलेची एक मेजवानीच उपभोगायला मिळाली.
विस्तारणारी क्षितिजे’ हे प्रदर्शन प्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन आणि बोधी आर्ट गॅलरी ह्यांच्या अथक प्रयत्नांतून आकारास आले. महानगरातच गोठल्या गेलेल्या समकालीन भारतीय दृश्यकलेची ओळख महाराष्ट्रातील इतर भागातील प्रेक्षकांनाही व्हावी ह्या हेतूने निवडक कलाकारांची चित्रे घेऊन आठ शहरांमध्ये हे प्रदर्शन त्यांनी फिरविले.

पुढे वाचा

‘आधुनिकतावादी’ या संज्ञेत प्रस्तुत लेखकास काय अभिप्रेत आहे? (नवपार्थहृद्गत ह्या पुस्तकामधील प्रास्ताविक विभागः चार)

खरे तर नवपार्थाने आत्मसात् केलेला आधुनिकतावाद, ही गोष्ट, ज्या भावनांनी तो गीतासंहितेला अनुसाद/प्रतिसाद देतो, त्या भावनांच्या अभिव्यक्तीतून वाचकांना जाणवल्याखेरीज राहणार नाही. किंबहुना हृद्गत-वाचनाच्या अनुभवातून आधुनिकतावादही उमगणे हे जास्त समृद्ध करणारे आहे. अगोदरच कोरडी व्याख्या देण्याने काहीसा रसभंगच पत्करावा लागेल. ज्या वाचकांना संज्ञेपेक्षा भाव जवळचा वाटतो त्यांनी खालील मजकूर आत्ता टाळून हृद्गतवाचनानंतर तो वाचण्यात त्यांना लाभ आहे.
परंतु लेखकास, त्याने काय करायला घेतले आहे याबाबत पारदर्शक राहण्याचे, कर्तव्यही बजावायला हवेच. म्हणूनच उपशीर्षकापासून वापरलेल्या ‘आधुनिकतावाद’ या संज्ञेची सूत्रमय, संक्षिप्त व पारिभाषिक संज्ञांनी संपृक्त अशी रूपरेषा येथे देत आहे.

पुढे वाचा

एका वैज्ञानिकाचा विवेकवाद

या संदर्भात फाईनमन या वैज्ञानिकाचे महत्त्वाचे वचन आठवणीतून उद्धृत करतो. “कुठल्याही वैज्ञानिक सिद्धान्ताच्या सत्यतेचा अंतिम निकष म्हणजे प्रत्यक्ष प्रायोगिक पडताळा. तुमचा सिद्धान्त कितीही तर्कसंगत व सुंदर असेल, पण जर त्याचे निष्कर्ष प्रायोगिक निरीक्षणांशी जुळत नसतील, तर तो सिद्धान्त चुकीचा आहे. मग तुमचे नाव काहीही असो, तुम्ही कितीही बुद्धिमान असा, तुम्हाला कितीही पारितोषिके मिळालेली असोत. तुमचा सिद्धान्त अनुभवांशी जुळत नसेल, तर तो निखळपणे असत्य आहे.’ केवळ विज्ञानातच नाही, तर कोणत्याही वास्तवाकडे बघताना ध्यानात ठेवावा, असा हा सावधगिरीचा इशारा आहे.
तत्त्वज्ञानाविषयी बोलायचे झाले, तर मी वेडेवाकडे वाचन बरेच केले.

पुढे वाचा

अमेरिकेचे दहशतवादाविरुद्धचे ‘प्रत्युत्तर’ चुकीचे का होते

मूळ लेखक: पी. साईनाथ

मुंबईमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १८०हून अधिक लोक ठार झाल्यानंतर दहशतवादाला रोखण्यासाठी जे अनेक प्रकारचे युक्तिवाद केले जात आहेत, त्यांपैकी सर्वांत चुकीचा व घातक युक्तिवाद आहे तो असाः
अशा प्रकारच्या दहशतवादास कसे प्रत्युत्तर (response) द्यायचे याचे धडे अमेरिकेकडून भारताने घेतले पाहिजेत. “जरा अमेरिकेकडे पहा- सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेत एकही दहशतवादी हल्ला झाला का?”
अशा प्रकारचा युक्तिवाद अनेक जणांकडून ऐकायला मिळतो. थोडक्यात त्यांचे म्हणणे असे असते की त्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या बुश प्रशासनाने जे उपाय केले त्यांमुळे पुन्हा दहशतवादी हल्ला करायचे धाडस कुणीही केलेले नाही.

पुढे वाचा

सैनिक आणि सेनापती

सैनिक आणि सेनापती हे एकाच एककातले उपप्रकार असतात ड्ड एक मुळातला आणि दुसरा परिवर्तित रूपातला. पण त्यांचा सुटा विचार करता येतच नाही. एकेकटे पाहता त्यांना ना संदर्भ असतात ना उपयुक्तता. हे समाजातही असते ड्र सैनिक आणि त्याचा सेनापती हे समाजाचेच लहानसे चित्र असते. सैनिकाची क्षमता आणि अस्तित्वही सेनापतीवरच अवलंबून असते. सेनापतीच सैनिकाला त्याची ओळख व त्याचे स्थान देत असतो. चांगले सेनापती कमकुवत सैनिकांपासून चांगले सैनिक घडवताना दिसतात. दुसऱ्या दिशेने चांगले सैनिक कमकुवत सेनापतींनाही पुढे नेतात. सक्षम सेनापती नेहेमीच चांगले सैनिक घडवतात.

पुढे वाचा

एक क्रान्तीः दोन वाद (भाग २)

[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. अँडम स्मिथ, जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल् यांच्या विचारांनुसार इंग्लंडात भांडवलवादी अर्थव्यवस्था कशी रुजली ते आपण पाहिले. आता त्यापुढे-]

परदेशगमन!
औद्योगिक क्रांतीनंतरच्या बदलाचा मागोवा घेताना वेगवेगळ्या प्रक्रियांच्या विकासाचे टप्पे ठरवताना काही अडचणी येतात. प्रत्येक भाष्यकार सोईनुसार टप्पे पाडत आहे असे वाटते. एका बाबतीत मात्र ढोबळमानाने एकमत आहे. इस१७७६ ते इस १९१४, म्हणजे अमेरिका स्वतंत्र होण्यापासून पहिल्या महायुद्धाचा काळ, यात भांडवली व्यवस्थेचा बराचसा अनिर्बंध असा विकास झाला.

पुढे वाचा

पत्रसंवाद

टी.बी. खिलारे यांनी चर्चेला दिलेले उत्तर काही बाबतीत चांगले व पटणारे आहे. पण तीन बाबतीत ते पटणारे नाही, तिथे त्यांचा युक्तिवाद तोकडा आहे. दि. य. देशपांडे आ.सु.चे संपादक असताना कित्येक विषयांवर मनमोकळ्या चर्चा झाल्या होत्या. विरोधकांची ग्राम्य भाषेकडे झुकणारी पत्रेही त्यांनी छापली होती. ‘आम्ही श्रद्धेची चिलखते काढून टाकली आहेत, त्यामुळे आम्हाला कुठलाही बाण वर्ण्य नाही’ असा तो बाणा होता. त्यामुळे केवळ विवेकवादी मजकूर हे आ.सु.च्या तत्त्वात बसणारे नाही तर अविवेकी विचार व त्याला दिलेले मुद्देसूद उत्तर हेही त्या तत्त्वात समाविष्ट असते.

पुढे वाचा

संपादकीय

एकोणीसशे पन्नास-साठच्या दशकात वादविवेचनमाला नावाची एक ग्रंथमाला काही घरांमध्ये दिसत असे. जॉर्ज बर्नार्ड शॉचे अॅन इंटेलिजंट वुमन्स गाईड टु कॅपिटॅलिझम, सोशलिझम एट् सेटरा (नेमके नाव जरा वेगळेही असेल!) हे पुस्तकही इंग्रजी वाचणाऱ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात ओळखीचे असे. नंतर मात्र विनय हर्डीकरांच्या शब्दांत ‘सुमारांची सद्दी’ सुरू झाली. अभ्यास थांबला आणि अडाणी अतिसुलभीकरणे वापरात आली.
कॅपिटॅलिझम म्हणजे मुक्त बाजारपेठ किंवा पाशवी पिळवणूक, समाजवाद म्हणजे भोंगळ सद्भाव (मृणाल गोरे, डॉ लोहिया) किंवा बनेल अवसरवाद (अमरसिंग-मुलायमसिंग!), साम्यवाद म्हणजे श्रमिकांचा स्वर्ग किंवा आडमुठे लालभाई, अशी सुलभीकरणे आज वापरात आहेत.

पुढे वाचा

पत्रचर्चा –

घारपांडेना मिळालेल्या इंटरनेटवरील प्रतिक्रिया विकास देशपांडे, बोस्टन
“परमसखा मृत्यू: किती आळवावा….” लेख वाचताना मला पटकन आठवले ते भा. रा. तांब्यांचे आणि लताच्या आवाजात स्वरबद्ध झालेले सुप्रसिद्ध गीत: “नववधू प्रिया मी बावरते, लाजते पुढे सरते, फिरते. कळे मला तू प्राणसखा जरि, कळे तूच आधार सुखा जरि, तुजवाचून संसार फुका जरि… मन जवळ यावया गांगरतें”.
शाळेत या गाण्याचा अर्थ समजला की तांबे ही कविता साक्षात् मृत्यूस आपला नवरदेव आणि स्वतःस त्याची नववधू म्हणत मृत्यूस एकीकडे कवटाळण्यासाठी आतुर तर दुसरीकडे थोडे लांबूनच… अशी अवस्था वर्णन करीत आहेत.

पुढे वाचा

ब्रेन डेड् की हार्ट डेड् ?

मृत्यूची बदलती व्याख्या
मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात क्यूबा येथे शेकडो नसतज्ज्ञ, वैज्ञानिक व तत्त्वज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. त्या परिषदेतील चर्चेचा मुख्य विषय होता, ‘मृत्यूची व्याख्या’. जीवन व मरण यांच्यातील सीमारेषा दिवसेंदिवस अस्पष्ट व धूसर होत असल्यामुळे आता तो गंभीर चर्चेचा विषय होऊ पाहात आहे, व ती सीमा आखणे ही एक मोठी समस्या मानली जात आहे. या समस्येचा उदय सुमारे ४० वर्षांपूर्वी झालेला असून मेंदू पूर्णपणे निकामी वा मृतवत् झाल्यानंतरसुद्धा कृत्रिमपणे श्वासोच्छ्वास व हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या व्हेंटिलेटर्सचा शोध या समस्येला कारणीभूत ठरला आहे.

पुढे वाचा