विषय «कविता»

इंडियन ॠतू

अनाहूत आलेल्या वादळाने
उडवून नेलीत काही पत्रे,
तुटून पडले काही पंख..!

सोबतीने आलेला मित्र
शांत थोडीच राहणार…!

जीव तोडून बँकेचे हप्ते भरले जात होते..
समतल केलेल्या जमिनीला बांधलेले बांध मात्र साथ सोडून पळाले
अन् वावरेच धो – धो वाहू लागली!

तुटलेल्या छपराला
चिकटलेले आहेत
फक्त काही कोरडे अश्रू!

एक बैल डोंगर पायथ्याशी मरून पडलाय..
एकमेव दागिना मोडून
गुलाल उधळत आणला होता..
तशा.. बांगड्या बाकी होत्या!

वावरातील पिकांचा
उडालेला हिरवा रंग,
आणि निस्तेज पडलेले
वखर आणि पांभर..
टक लावून बघतायेत
आकाशाकडे..

भुरकट पडलेल्या पिकांना
कोपर्‍यात पडलेल्या औषधांची आता गरज नव्हती…
मरून पडलेल्या बैलाच्या मागे राहिलेल्या दोराला मात्र
हवा होता एक नवा गळा!

पुढे वाचा

काळ बदलत आहे

१.

जेव्हा केव्हा हुकमती राजवटीने मोडू पाहिला लोकशाहीचा कणा
फिरवून टाकल्या सत्तेच्या दिशा
पुसटश्या उजेडालाही झाकोळून टाकण्याच्या वाटल्या खिरापती
तेव्हाही या जुलुमशाहीच्या आखाड्यात कोणीतरी लढत होतंच
आणि आता शेतकरी आहेत…!

२.

तू आहेस म्हणून
काटेरी सत्तेला प्रश्नांनी देता येतात तडे
बेबंदशाहीच्या सिंहासनाची उखडता येतात पाळंमुळं
जेव्हा कधी नाकारला गेला जगण्याचा हक्क
तेव्हा तेव्हा नव्याने पुकारला एल्गार… तू आहेस संघर्षाची अमाप शक्ती

तू आहेस…
बुद्ध.. तुकोबा.. छत्रपती.. ज्योतिबा.. शाहू.. बाबासाहेब…!

३.

अजूनही का नाही सरत रात्र
म्हणून त्याने साऱ्याच खिडक्या उघडून ठेवल्या
दरवाजे कुलूपबंद ठेवून
दिस उजाडाची पाहत होता वाट… सारं करुन सुद्धा कुठे दिसलीच नाही उगवती

हे पाहून…
सोडून त्याचा पदर
भयभीत काळ्याकुट्ट अंधारातही
ती पेटून उठली मशानातून…
उखडून फेकल्या दरवाज्याच्या चौकटी
आणि उजळून टाकल्या मुर्दाड वस्त्या…!

पुढे वाचा

स्वप्न

समाजवादी
धर्मनिरपेक्षलोकशाहीच्या पार्श्वभूमीवर
भेदाभेदाचा उत्कलनांक जाळून टाकतो कित्येकांना

कुणाही सौंदर्यवतीच्या
गालावरचा तीळ
महत्त्वाचा नाहीये
उपयुक्त आहे
आरक्षणाचा बिंदू

प्रेमीजनांचा होकार किंवा नकार,
एकत्रीकरण किंवा अलगीकरण
यापेक्षा खळबळजनक आहे
वाढत जाणारं खाजगीकरण
अर्थात,
संधीच्या समानतेचं विस्थापन

एक स्वप्न पेरू
लोकशाहीच्या छातीवर
मग होईल या मातीवर
मानवतेच्या उदारीकरणाचं उद्घाटन,
धर्मांध आणि जातींचं उच्चाटन
समानतेची व न्यायाची उजळून वात
नव्याने करून घेऊ स्वातंत्र्याचा उपोद्घात

.शिक्षकशिव विद्यालय,चतारीता.पातूर जि.अकोला
(‘इंदुकपिलवस्तु नगर,अकोला )

दाणे

राजस दाणे
भरडलेच जातील का?

काही जात्यात
काही सुपात
काही ओंजळीत
तोंडात टाकण्यासाठी
अलगद
काही जमिनीत
मातीआड
कणीस फळवायला
भरडलेच जातील का
राजस दाणे?

सुपातल्या दाण्यानं हसू नये
जात्यातल्या दाण्याला
ओंजळीतल्यांनी
भिऊ नये दातांना
मातृत्वाचे पोवाडे गात
जमिनीत गाडून घ्यायलाही
नसावं आसुसलेलं दाण्यांनी
ओंजळीत पडून
कुण्या लाचाराची
भरू नये झोळी

दाण्यांना फुटावेत डोळे
स्वतःचे टपोरेपण
पाहण्यासाठी
दाण्याना फुटावेत पंख
वाऱ्यासवे उडण्यासाठी

घालू नये जन्माला कणीस
दाण्यांनी
भागवू नये कुणाची भूक
दाण्यांनी थांबवावं
फिरतं जातं
कणखर होऊन

बर्बादीचा माहामार्ग

{प्रस्तुत फोटो हे आभासी तथा इंन्स्टाग्राम/गुगलवरून घेतलेले नसून आमच्या शेत-शिवारातले जिवंत फोटो आहेत.}

स्वातंत्र्याच्या पाऊणशे वर्षांनंतरही…
वावरात हातभर लांबीच्या बंडीभर काकड्या,
नारळाएवढाले सीताफळं निरानाम सडू घातलेले.
पान्यामुळं बाबडलेला मुंग, वांझोटा भुईमुंग,
काळंवडलेल्या तीळाची मती गुंग
घरी आनाचं कसं एकाएकी गर्भपात झालेलं सुयाबीन ?

वावराजौळचे असे  दूरदूर चिखलप्रेस समृद्ध हायवे
ऐन हंगामावर अभाळाले हैजा झालेला
रस्त्यानं आपलाच जीव आपल्याले भारी
कुठून इथं जल्म घेतला इच्यामारी !

खालून चिक्कट चिखलगाळ
अन् वरतून ओरबाडणाऱ्या चिल्हाट्या-बोराट्या!
चालता चालताच जातेत सरनावर तुऱ्हाट्या.

बैलबंड्या फसतेत,
वाटसरू घसरून मोडतेत
कोनाचा हेंगडते पाय
कुठं नुसतीच रुतून बसते पान्हावली गाय
अवंदा दुरूस्तीसाठी कास्तकारांजवळ  नाई दमडं
ज्याच्याजौळ लुगडं, थेच पडलं उघडं !!

पुढे वाचा

त्या कृष्णसागरावरती

त्या कृष्णसागरावरती
विश्वाच्या लाटा येती
गंगांचे फेस उधळती
बुडबुडे ग्रहांचे उठती |

त्यातील नील गोलाला
म्हणतात आपली धरती
धरणीच्या पायघड्यांतून
या पर्वतमाला घडती |

अन् सप्तसमुद्रांवरती
जलदांच्या राशी झुलती
वाऱ्यावर लहरत जाता
अचलांवर करती वृष्टी |

की हरित जटा शंभूच्या
वृक्षावली दाट उगवती
फेसाळत उंच कड्यांतून
ओघांच्या सरिता बनती |

वेळूवनातून जाता
वाऱ्याची गीते होती
पकडून सूर्यकिरणाांना
जलबिंदू रंग पसरती |

जलचर वनचर पक्षी
अन् मानव रांगत येती
ते उभे राहती आता
भाषेची कळते युक्ती |

जे दिसे जाणवे ते ते
जाणिवेपार जे लपले
कल्पना विहंगम होता
ते ऋचा अर्पुनी गेले |

वनकुहरे सोडून केली
सरितातीरावर वस्ती
जोडिली, उराशी जपली
ती स्थावर, जंगम, नाती |

वडवानल होते उर्जा
बेटांची कमळे फुलती
कधी त्सुनामी होऊन लाटा
भातुकली मोडून जाती |

शावके, फुले अन् बाळे
हास्याची उधळण करती
काळाचे हस्तक केव्हा
सुह्रदांना ओढून नेती |

हे चलनवलन सृष्टीचे
शाश्वती एक बदलाची
बुडबुडे, फेस अन् लाटा
कृष्णातच विरती स्फुरती |

मज हव्यात लाटा
नीलबिलोरी
वेळावत, फुस्कारत, धसमुसणाऱ्या,
अन् तरंग अस्फुट लव पाण्यावर
लवलवणारी |

मज हवा फेस तो
लाटांवर फसफसणारा
मज हवे बुडबुडे, घुमट जणू काचेचे
जे गिरकी घेता, रंगांचे नर्तन होते |

घुमटात सखे त्या
हाती गुंफू हात
या क्षणात लपला
आहे काळ अनंत |

सूर्याने उजाडलंच पाहिजे…!

विधवा असणं….
खडक फोडून पाणी काढल्यासारखं
पाण्याचा मागमूस नाही
उभं पीक डोळ्यांदेखत जळावं
नुसतं जळत जावं
सदाहरित वृक्ष दुष्काळात करपणं
करपल्यालं खोडंही ओरबाडून टाकणं

विधवा असणं….
म्हणजे आतल्या आत सोलत जाणं
कुठेच थांबा नाही
शेवटचं ठिकाणही नाही
मनसोक्त आनंद लुटावा असा कॅनव्हासही नाही
कोरड्या बारवमध्ये पोहत सुटायचं
पाण्याचा गंधही नाही…

विधवा म्हणजे….
असतो एकटीचा प्रवास
माघार नाहीच नाही
पुढेही अंधार पाचविला पुजलेला
भयाण स्वप्नांचं घर असते विधवा…
तिला दार नाही
खिडक्या तर मुळीच नाहीत
गावातील शेवटचं घर हाच कायमचा पत्ता
ओंजळीत मावेल एवढं हसू नाही
रुजावं कुठे तर सुपीक माती नाही
चालतात आतल्या आत कित्येक महायुद्ध
ज्याला अंत नाही…

विधवा असणं नेमकं काय?

पुढे वाचा

मन मेलं आहे… आणि हातावरच्या रेषा

मन मेलं आहे…

आता दुःख करणंही सोडलं आहे,
सुन्न होणं दूरच
आता 
हळहळ करणंही सोडून दिलं आहे.

निर्भया बलात्कारानंतर वाटलेला
क्रोआक्रोश आटला आहे.
कशासाठी कोणासाठी मेणबत्त्या लावायच्या?
अन्याय होतो, पण न्यायासाठी व्यक्ती मात्र या जगातही नाही.

दगडाला सुद्धा जिथे पाझर फुटतो असं म्हणतात,
तिथे आता हृदयाला पाझर फुटणं कठीण झालं आहे.
मुद्दामच, कळूनही, माणसाने स्वत:तील माणुसकी
कुठे तरी संपवून टाकली आहे
.
जिथे असे नरभक्षक, वासनांध जन्माला येतात, निर्माण होतात,
ज्यांना कोणाचं भान रहात नाही,
तिथे आता स्व
तःची कीव करावीशी वाटते.

पुढे वाचा

रेषा आणि कविता…!

अंधारात भविष्य शोधताना
मी मेंदूला ठेवत असतो कोंडून
मनगटातील बळ विसरून 
दाखवत फिरतो हाताच्या रेषा 
वाळूचे कण रगडण्याचे सोडून 
दिसरात जपतो दगडाचे नाव 
घाम गाळायच्या ऐवजी 
देत असतो ग्रह-ताऱ्यांना दूषणं 
तरीही,
निघाला नाही कुठलाच प्रश्न निकाली…!

सीमेवर शत्रू उभे ठाकले असताना 
राजा शांतपणे करत होता यज्ञ 
शत्रू महालाजवळ आले असतानाही 
राजा करत राहिला मंत्रांचा जाप 
पराभवाची फिकीर सोडून 
तो देत राहिला जांभई 
शेवटी बंदिस्त झाल्यावर, 
“छाटण्यात यावे माझे हात” 
अशी याचना करत राहिला…!

उघड्या डोळ्यांनी
मी नाकारू शकत नाही सत्य म्हणून
ते दाखवत असतात भीती 
माझी लायकी ठरवून 
ते घट्ट ठेवतात पाय बांधून 
देत राहतात धडे मानसिक गुलामीचे 
सांगू लागतात नशीब हाताच्या आरशात 
अवघं विश्वच बांधून ठेवतात आडव्या उभ्या रेषेत 
काळाच्या पुढचं सांगून मिचकवतात डोळे 
त्यांचं पोट भरल्यावर 
मी मात्र पहात राहतो काळ्याशार आभाळात…!

पुढे वाचा

काही कविता

(१) येणारा काळ कठीण असेल

चक्रमांची पैदास जाणूनबुजून केली जातेय
एक एक मेंढरू, कळपात सापळा लावून ओढलं जातंय
टाळ्या वाजवायच्या हाळ्या देऊन
उपकाराची फेड केली जातेय,
हात टाळ्यांत गुंतल्याने, करायचे काम बाजूला पडतंय.

दिवे लावा, दिवे मालवा म्हणत
देशाला जागं केलं जातंय
अंधाराची अफू देऊन 
प्रकाशाला दूर पळवलं जातंय

कित्येक अडकलेले, 
दूर कोठे घरापासून
आपली माणसं, आपलं गाव
पाहिलं नाही डोळे भरून.

अशांचा काही विचार हवा
भरीव रोकडे धोरण आखा.

येणारा काळ, काळ ठरेल 
अशी आजची परिस्थिती आहे.
भविष्यात पोट भरायचं कसं,
हा रोकडा सवाल आहे.

पुढे वाचा