विषय «शहरीकरण»

नागरी भारतः अंधश्रद्धा आणि वास्तव

अंधश्रद्धा १:
भारतामधील नागरीकरणाचा वेग सातत्याने वाढतो आहे. वास्तव : नागरीकरणाचा वेग विसाव्या शतकात वाढला हे खरे आहे. स्वातंत्र्यानंतर तर ही प्रक्रिया अधिकच जोमदार झाली होती. १९५१ साली १३.३१ टक्के भारतीय शहरात राहत होते. १९७१ साली हेच प्रमाण २४.२० टक्के झाले. परंतु त्यानंतर मात्र भारतातील नागरीकरणाचा वेग कमी कमी होत आहे. २००१ साली हे प्रमाण २७.८० झाले आहे.

अंधश्रद्धा २:
येत्या १०-२० वर्षांत भारतामधील ५० टक्के लोकसंख्या शहरांत राहत असेल. वास्तव : नागरी लोकसंख्यावाढीचा दशवार्षिक वेग केवळ ३ टक्के आहे. हा दर स्थिर राहिला तरी पुढील काही दशकांत तरी नागरी लोकसंख्या ५० टक्के होणे शक्य नाही.

पुढे वाचा

माहितीचा स्फोट, संपर्क साधनांचे जंजाळ आणि मानवी वस्त्या, समूह

१) माणसांना एकमेकांना धरून समूहाने राहायला आवडते. यात सुरक्षितता तर असतेच पण परस्परावलंबन, मानसिक धीर सापडतो. एकलेपण टाळले जाते. अगदी रानावनात राहणाऱ्या आदिवासींच्या वाड्यावस्त्या-पाडे ते आजच्या उत्तुंग इमारती असलेल्या महानगरातील माणसांचे असेच असते. शेतीचा शोध लागला आणि माणूस स्थिरावला. अतिरिक्त उत्पादनाला सुरुवात झाली. स्वास्थ्य आले आणि माणूस कायम वस्ती करून राहू लागला. ग्रामीण संस्कृती जन्माला आली. अनेक शतके अशीच गेली. थोड्याफार प्रमाणावर श्रमविभागणी आली. शारीरिक आणि बौद्धिक श्रमांचीही विभागणी झाली. गवंडी, सुतार, लोहार असे व्यवसाय उभे राहिले. पशुपालनाची आणि त्यांच्या श्रमशक्तीचीही जोड मिळाली.

पुढे वाचा

आटपाट नगर?

चेंबूर-ट्रॉबेच्या वस्त्यांमधून प्रौढसाक्षरता प्रसाराच्या निमित्ताने सुरू झालेल्या कामामध्ये मी १९८९ पासून सहभागी आहे. ‘कोरो साक्षरता समिती’ हे आमच्या संघटनेचे नाव. ह्या कामात मी अधिकाधिक गुंतत चालले त्यावेळी माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांनी भेटून, फोनवर माझ्याबद्दल, कामाबद्दल चौकशी केली, अगदी आस्थेने चौकशी केली. “काम कसं चाललंय?”, “कसं वाटतं’ ?, “झोपडपट्टीतली लोक कामाला प्रतिसाद देतात का?” अशा उत्सुक प्रश्नांबरोबर “सुरक्षित आहेस ना? काळजी घे,’ “यांना हाकलून द्यायला पाहिजे. यांनी मुंबई बकाल केली. तू यांना जाऊन कशाला शिकवतेस?’, “कसे राहतात ग हे लोक?’, असेही प्रश्न होते.

पुढे वाचा

ग्राम-नागरी संबंध आणि विकासाची परस्परावलंबी प्रक्रिया (भाग १)

प्रास्ताविक:
आजपर्यंत विकासासंबंधीच्या सैद्धान्तिक आणि धोरणात्मक विचारांचा रोख एकतर ग्रामीण विभाग नाहीतर नागरी विभाग असतो. ग्राम-नागरी परस्परावलंबी संबंधांचा विचार क्वचितच केला जातो. याउलट प्रत्यक्ष अभ्यासांमधून मात्र ग्राम-नागरी विभागांमधील लोकांचे स्थलांतर, सामानाची, मालाची देवाणघेवाण, आणि भांडवलाची हालचाल (शिाशपी) या प्रक्रिया महत्त्वाच्या असलेल्या दिसतात. या दोन्ही भौगोलिक वस्त्यांमध्ये सामाजिक देवाणघेवाण महत्त्वाची असते, ज्यायोगे ग्रामीण आणि नागरी विभागांमधील संबंध सतत बदलत असताना दिसतात. अर्थव्यवस्थांचा विचार करता अनेक नागरी उत्पादनांचे ग्राहक हे ग्रामीण भागात असतात. या उलट नागरी ग्राहकांना अन्नधान्य, शेतीमधील कच्चा माल, तसेच नागरी सेवांचा पुरवठा करण्यासाठी ग्रामीण शेतीक्षेत्राची गरज असते.

पुढे वाचा

नागरी-जैविक विविधता (भाग १)

१. प्रस्तावना:
जगाची ५० टक्के लोकसंख्या आता नगरांमध्ये राहते. पुढील तीस वर्षांत हे प्रमाण ६१ टक्के होईल. (युनो अहवाल १९९७). विकसित देशांमधील ८० टक्के लोक नागरी विभागात राहतात. असे असूनही एकविसाव्या शतकात मात्र सर्वांत मोठी लोकसंख्येची नगरे विकसनशील देशांमध्येच असतील. गेल्या शतकात नगरांचे आकारमान प्रचंड वाढले. ३०० नगरांत १० लाखांपेक्षा, तर १६ नगरांत १ कोटीपेक्षा जास्त लोक राहतात. मानवी समाजाच्या/लोकसंख्येच्या रेट्यामुळे जगाच्या भूगोलाची रचनाच बदलून गेली आहे.

नागरीकरणाचे पर्यावरणावर मोठे परिणाम होतात. नागरी जमीनक्षेत्र जगाच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ २ टक्के आहे.

पुढे वाचा

नागरी प्रश्नांचे स्वरूप

“सर्व प्रकारच्या कृतींसारखेच विचार करण्याचेही डावपेच असतात. प्रश्नांच्या प्रकारानुरूप विचार करूनच त्यांची उत्तरे मिळू शकतात. आपल्याला कसा विचार करायला आवडेल यापेक्षा विषयाचे स्वरूप काय आहे त्यावरच विचारांची, उत्तरे शोधण्याची पद्धत ठरत असते.
विसाव्या शतकातल्या अनेक क्रांतिकारक बदलांमध्ये जगाच्या तपासासाठी वापरायच्या विचारपद्धतींमध्ये खूप महत्त्वाचे बदल झाले.

विश्लेषणाच्या आणि विचारांच्या नवनव्या धोरणांचा शोध मुख्यतः वैज्ञानिक पद्धतींमधून घेतला गेला. या जागृतीचे परिणाम इतरही क्षेत्रांत पसरले. पूर्वी नाठाळ वाटणारे प्रश्न नवनव्या दिशांनी सुटण्याजोगे वाटू लागले. तर काही प्रश्न आधी वाटले होते तसे नाहीतच असे आढळून आले.

पुढे वाचा

तीन स्वप्निल आदर्शवादी आणि त्यांची आदर्श नगरे

एबक्झर हॉवर्ड
व्यवसायाने कारकून असणारे एबक्झर हॉवर्ड हे तसे सामान्य गृहस्थ, पण त्यांच्या ‘गार्डन सिटी’ या आदर्शवादी नगररचनेच्या संकल्पनेच्या सहाय्याने त्यांनी खरे तर जगाचाच चेहरा-मोहरा बदलून टाकला. त्यांच्या या उद्याननगराच्या कल्पनेला सामाजिक सुधारकांच्या गटाने तर उचलून धरलेच, पण त्यामुळे नागरी नियोजनाचे आयामच मुळी बदलून गेले. औद्योगिक शहरांच्या गर्दी, गोंधळ, काजळी ह्यांनी भरलेल्या १९ या शतकातील लंडनच्या अनुभवावर उमटलेली ती तीव्र प्रतिक्रिया होती. त्या काळातील स्वप्निल समाजसुधारकांच्या विचारांचे प्रतिबिंब त्यात पडले होते. मोठ्या नगरांना पर्याय म्हणून तीस हजार वस्तीच्या लहान लहान उद्याननगरांची साखळी-रचना हॉवर्ड यांनी कल्पिली.

पुढे वाचा

नागर क्रांतीचा उगम: दोन प्रवाह

इ.स. पूर्व ४००० च्या सुमारास मेसोपोटेमिया येथे जगातील पहिले नगर उदयाला आल्याचे पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी मांडले. गॉर्डन चाइल्ड यांच्या सिद्धान्तानुसार अश्मयुगाच्या अखेरच्या पर्वात शेतीचा शोध लागला. या कृषिक्रांतीच्या विस्तारासोबत आणि परिणामी भटक्या, अन्नशोधक मनुष्यप्राणी ग्रामीण वस्त्यांमध्ये स्थिरावला. कृषिक्रांतीच्या काळात विपुल होत गेलेल्या अन्नसाठ्यांमुळे काही गावांचे नगरांत रूपांतर होणे सुरू झाले. ह्या नागरी क्रांतीचा पहिला उच्च बिंदू म्हणजे मेसोपोटेमियामधील ऊरूक हे नगर. पुढे ही नागरीकरणाची प्रक्रिया वेगवान होत गेली. जागतिक नागरी क्रांतीचे स्वरूप विसाव्या शतकात अधिक स्पष्ट झाले. ग्रामीण भागातून नागरी प्रदेशांत होणाऱ्या लोकसंख्येच्या जागतिक स्थलांतराचा अनुभव या सिद्धान्ताला पोषक असाच होता.

पुढे वाचा

नगरे आणि आर्थिक विकास

आर्थिक दृष्टीने बघता छोट्या भौगोलिक परिसरात मोठी लोकसंख्या एकवटण्याची प्रक्रिया ही सर्व समाजाकराता फायदेशीर असते. नागरीकरणाची प्रक्रिया आर्थिक कारणांमुळेच घडत असते हे उघड आहे. या प्रक्रियेमुळे संपत्ती निर्माण झाली नसती तर ही प्रक्रिया कधीच वाढली नसती. जेव्हा लोकांची दाटी वाढते तेव्हा उत्पादनही वाढते. या दाटीवाटीमुळे काही लोकांच्या अंगभूत वैशिष्ट्यांना प्रगट व्हायची संधी मिळते. ज्या माणसांकडे काही विशेष कसब असते त्याचा वापर करून त्यांना त्यात प्रावीण्यही मिळवता येते. माणसांच्या आकांक्षापूर्तीसाठी मोठा परिसर उपलब्ध होतो, आणि अशाच ठिकाणी व्यक्तींच्या क्षमता उजेडात येतात. सत्ताधाऱ्यांना व्यापारी नगरांमधून खूप कर मिळतो याची चांगली जाणीव असते.

पुढे वाचा

नागरीकरणः स्वरूप, समस्या आणि धोरण

“भारत खेड्यांत राहतो’ हे महात्मा गांधींचे वचन आपण सर्वांनीच वाचले असेल. ते कोणत्या संदर्भात केले होते हे अर्थातच सर्वसामान्यपणे माहीत नसते. परन्तु ह्या वाक्याचा परिणाम स्वातंत्र्योत्तर कालातील अनेक धोरणांवर नक्कीच झाला. नागरीकरण आणि शहरे यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बऱ्याच अंशी नकारात्मकच आहे. शहरे ही साम्राज्यवादी पिळवणुकीची प्रतीके म्हणून डाव्यांना अप्रिय. शिवाय मार्क्सने असे म्हटलेले आहे की साम्यवादाच्या अंतिम टप्प्यात ग्रामीण व शहरी असा भेदच राहणार नाही. शहरांत पूर्वीपासून राहणाऱ्यांना नव्याने शहरात येणाऱ्या गरीब स्थलांतरितांमुळे होणारी शहरी वाढ अप्रिय. साहित्यप्रेमींना चाल डिकन्सच्या कादंबऱ्यांतील शहरांची वर्णने किंवा १९५० वा १९६० च्या दशकातील मराठी साहित्य वाचूनही शहरांबद्दल अप्रियता, तर खेड्यांबद्दल रोमँटिक ओढ निर्माण झाली होती.

पुढे वाचा