विषय «संपादकीय»

संपादकीय

देशनिष्ठा म्हणजे शेजारधर्म
आमचे आजचा सुधारक हे मासिक विवेकवादाचा प्रसार करण्यासाठी जन्माला आलेले आहे हे आपण जाणताच. ते कोणत्याही विषयाचा किंवा मताचा प्रचार करीत नाही. प्रचारक मोठमोठ्याने ओरडतो आणि दुसरी बाजू, विरुद्ध मताचा आवाज, श्रोत्यांपर्यंत पोहचणार नाही असा यत्न करीत असतो आणि प्रसारक शांतपणे आपली बाजू मांडतो, दुसरी बाजू ऐकून घेतो, लोकांना ऐकू देतो. असो.
विवेकवाद म्हणजे काय हे स्पष्ट करण्याची प्रत्येक संधी घेण्याचे आणि त्या निमित्ताने आमच्या प्रतिपादनात पुनरुक्तीचा दोष आला तरी तो स्वीकारण्याचे आम्ही ठरविले आहे. ते करण्यासाठी काही टोकाची अतिरेकी मते मांडून लोकांना डिचवण्याचाही क्रम आम्ही चालविला आहे.

पुढे वाचा

संपादकीय

सारेच श्रद्धालु!
गेल्या महिन्याचे संपादकीय आणि स्फुट लेख वाचून दोन चांगली पत्रे आली. त्यांपैकी ज्या एका पत्रलेखकाला आपले नाव प्रकट करावयाचे नाही त्यांचे पत्र अन्यत्र प्रकाशित करीत आहोत. दुसरे पत्र ह्याच संपादकीयामध्ये पुढे येणार आहे. ह्या दुस-या पत्राच्या निमित्ताने आम्ही आमचे विचार मांडणार आहोत.
आम्ही वेळोवेळी जी संपादकीये आणि स्फुटलेख लिहितो त्यांतून आम्ही आम्हाला कळलेल्या विवेकवादाच्या दृष्टिकोनातून काही घटनांचा परामर्श घेत असतो. अशा आमच्या लेखनावर आमच्या वाचकांपैकी सगळ्यांनी आपली काही ना काही प्रतिक्रिया द्यावी अशी आमची इच्छा असते पण ती नेहमीच पूर्ण होत नाही.

पुढे वाचा

संपादकीया

श्री. ढाकुलकरांनी स्वामी विवेकानंदांच्या वचनांचा उल्लेख करण्यासाठी डॉ. राधाकृष्णन् आणि स्टालिन ह्यांच्यातील संवादाचा आधार घेतला आहे. भाकरी ही परमेश्वराची शक्ती आहे आणि ती त्याच्या कृपेने ह्या जन्मात मिळते असे त्यांनी सूचित केले आहे. परमेश्वराच्या कृपेने मोक्ष मिळतो किंवा भाकरी त्याच्या कृपेशिवाय लाभत नाही असे स्वामी विवेकानंदांना वाटत होते. आम्हाला तसे वाटत नाही. ईश्वर नाही, मोक्ष नाही, आपले सर्व व्यवहार ह्या पृथ्वीतलावर घडतात; त्यांचा जमाखर्च परलोकात कोणीही ठेवत नाहीत असे आम्ही मानतो. मानवाच्या मनावर संस्कार करणा-या अनेक घटना त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत घडत असतात.

पुढे वाचा

संपादकीय

अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गरज
महाराष्ट्राचे परात्पर शासनप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी फेब्रुवारी महिनासुद्धा गाजविला. “आधी २५ लाख रुपये परत करा आणि मग अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गमजा करा” अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी अ. भा. मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षांना उद्देशून केले हा सारा वृतान्त आमच्या वाचकांना माहीत आहेच. प्रश्न केवळ कोण काय बोलले ह्याचा नाही – प्रश्न अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आहे.
ज्यावेळी एखाद्या राजाचे राज्य असे, त्याच्या पदरी असणा-या पंडितांना तो पोसत असे, तेव्हा त्या पंडितांना त्याची भाटगिरी केल्यावाचून गत्यंतर नसे. बलाढ्य, लहरी व उद्दाम अशा नरेशाकडून त्यांचे कधी अपमान झाल्यास ‘अर्थस्य पुरुषो दासः’ असे म्हणून ते स्वतःचे सांत्वन करीत.

पुढे वाचा

संपादकीय

मागच्या अंकात पुष्कळ पत्रे प्रकाशित झाली. त्यांपैकी काही पत्रांना उत्तरे देण्याची गरज आहे. बारीकसारीक सूचनांचा अगोदर परामर्श घेऊ आणि गंभीर सूचनांचा मागाहून. श्री. मनोज करमरकर ह्यांनी मुखपृष्ठावर कॅप्टन ब्रीज यांचा उतारा छापून काय साधले असा प्रश्न उपस्थित केला आहे आणि श्री. मधुकर कांबळे ह्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या लेखातील उतारे आवर्जून प्रकाशित करावे अशी आम्हाला विनंती केली. ही दोन्ही पत्रे आम्ही कोणता मजकूर पुनःप्रकाशित करतो वा करावा ह्यासंबंधी आहेत. तरी त्या संबंधीचे धोरण पुन्हा एकदा स्पष्ट करतो.
आमच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर एखाद्या जुन्या अथवा अल्पपरिचित पुस्तकातील जो भाग आम्हाला स्वतःला अंतर्मुख करतो, विचार करायला लावतो, अशा मजकुरातला एक अंश प्रकाशित करण्याचा आमचा प्रघात आहे.

पुढे वाचा

संपादकीय

सप्टेंबरचा अंक प्रकाशित झाल्यानंतर जातिभेद कसा घालवावा ह्या विषयासंबंधी आणि आजचा सुधारक हे मासिक महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लोकांना हा आपला सुधारक आहे असे कशामुळे वाटेल ह्याविषयी आणखी काही पत्रे आली. ती वाचून असे जाणवले की हा विषय येथेच थांबविणे इष्ट होणार नाही. जातिभेद नाहीसा व्हावा ह्याविषयी जरी सगळ्यांचे एकमत असले तरी आमच्या विचारसरणीवर इतिहासाचा पगडा आहेच. जातींच्या संबंधीचे वास्तव अतिशय दाहक आहे, उग्रभीषण आहे. ते वास्तव बदलण्यासाठी जे काय थातुरमातुर उपाय आम्ही सुचविले ते सद्य:स्थितीत उपयोगी नाहीत असा सूर आम्हाला ऐकू येत आहे.

पुढे वाचा

संपादकीय

एका वेगळ्या प्रकारची परिस्थितिशरणता
आपल्या देशामध्ये, ह्या भारतभूमीत असे पुष्कळ लोक आहेत की जे आपल्यापुरतेच पाहत नाहीत, आपल्या शेजारपाजारच्यांची त्यांना आठवण असते. त्यांच्या वाट्याला आलेल्या संपत्तीचा एकट्याने उपभोग घेण्याचा त्यांना संकोच होतो. महात्मा गांधींनी तर त्या बाबतीत आपणा सर्वांना आदर्शच घालून दिला. दरिद्रनारायणाला जे मिळत नाही ते वापरण्याला त्यांनी आपल्या उत्तरायुष्यात नेहमीच नकार दिला. सर्वसाधारण भारतीयाइतकेच आपले जीवनमान राखण्याचा त्यांचा कटाक्ष होता. राहण्यासाठी मोठमोठे वाडे त्यांना मिळू शकत असताना त्यांनी झोपडीचा आश्रय केला. अशी दीनदयाळु, सुमनस्, दयार्द्र किंवा करुणाकर मंडळी भारतात बहुसंख्य नसली तरी पुष्कळ मोठ्या संख्येने आहेत.

पुढे वाचा

संपादकीय

जुनें जाउं द्या मरणालागुनि
जातीयतेमुळे निर्माण होणारी उच्चनीचता ही विषमतेमध्येच मोडत असल्याकारणाने तिच्याविरुद्धचा म्हणजेच विषमतेविरुद्धचा लढा पुढे चालविण्यास आजचा सुधारकला आपल्या वाचकांचे साहाय्य हवे आहे. गेल्या दोनतीनशे वर्षांपासून न सुटलेला हा प्रश्न आम्ही सोडवावयास घेतला आहे. दोनतीनशे वर्षांपूर्वी विषमता नव्हती असा ह्याचा अर्थ नव्हे; पण ती हटविण्यासाठी यत्न सुरू झाले नव्हते, ते त्या सुमारास सुरू झाले. आजवर केल्या गेलेल्या प्रयत्नांना यश आलेले नाही हे जाणून ह्या अत्यन्त जटिल प्रश्नाचे उत्तर आपणास चर्चेमधून काढावयाचे आहे. ही समस्या एकट्या संपादकांनी सोडवावयाची नाही. ती एकट्यादुकट्याला सुटण्यासारखीच नाही.

पुढे वाचा

संपादकीय

(१) आमची संस्कृती आणि परिस्थितिशरणता
(पुढे चालू)
मागच्या लेखात आम्ही परिस्थितिशरणतेचा उल्लेख करताना ही शरणता फक्त ऋणकोची असते असे नाही, ती धनकोचीदेखील तितकीच असते असे विधान केले आहे. आम्हाला असे म्हणावयाचे आहे की धनकोच्या कल्पनाविश्वांत-मनोविश्वात दुस-या कोणत्याही शक्यतेचा, वेगळ्या परिस्थितीचा विचार डोकावत नसल्यामुळे, त्यापेक्षा निराळी परिस्थिती त्याने स्वप्नातदेखील पाहिलेली नसते त्यामुळे; इतकेच नाही तर ऋणकोची ही दुःस्थिती त्याच्या पूर्वजन्मीच्या दुष्कृतांमुळे आणि आपली स्वतःची सुस्थिती आपल्या बापजाद्यांच्या शेवटल्या जन्मातल्या आणि आपल्या पूर्वजन्मातल्या सुकृतामुळेच आपल्या वाट्याला आली आहे अशी त्याची बालंबाल खात्री असल्यामुळे धनकोच्या मनाला अन्यायाची टोचणी लागत नाही.

पुढे वाचा

संपादकीय

आमची संस्कृती आणि परिस्थितिशरणता
आपल्या आचरणामध्ये श्रद्धामूलक वा संस्कारजन्य परिस्थितिशरणता आहे. विवेकाला परिस्थितिशरणतेचे वावडे आहे. विवेकवाद्यांचे कोणत्याही व्यक्तीशी भांडण नसून श्रद्धेशी आहे, संस्कारांशी आहे त्याचप्रमाणे श्रद्धा, संस्कार आणि आप्तवाक्यप्रामाण्य ह्यांत फरक नाही ह्याचा उल्लेख मागच्या अंकात केला होता. समाजातील विषमता काही व्यक्तींवर अतिशय अन्याय करणारी असल्यामुळे आणि विवेकवाद्यांना तिच्याशी लढा द्यावयाचा असल्यामुळे विषमतेची काही बटबटीत उदाहरणे ह्या स्तंभातून देण्याचा मानस आहे. त्यायोगे विषमता का नको ते पुन्हा स्पष्ट होईल आणि तीवर उपाय शोधणे शक्य होईल. अन्यायकत्र्या व्यक्तींना उपदेश केल्याने, त्यांना घेराव, मारहाण किंवा त्यांचे प्राण-हरण केल्याने प्रश्न सुटणार नाहीत तर अविवेकी लोकांच्या मनांत विवेकाचा उदय झाल्यासच ते सुटतील आणि शंभर टक्के लोक विवेकी झाले नाहीत तरी पंचावन्न टक्के होऊ शकतील, विवेकी नेहमीसाठी अल्पसंख्य राहणार नाहीत, असा विवेकवाद्यांचा विश्वास आहे.

पुढे वाचा