विषय «इतर»

नागरी (मराठी) लिपीत काही सुधारणा निकडीच्या

नागरी लिपी अनेक दृष्टींनी अतिशय समर्थ आणि सोयीची लिपी आहे यात संशय नाही. पण अन्य भाषांतील काही उच्चार मराठीत नसल्याने त्यांचे नागरीत बिनचूक लिप्यंतरकरता येत नाही, आणि लिप्यंतर चुकीचे झाल्याने मूळ उच्चारांहून वेगळे चुकीचे उच्चार मराठी भाषी लोकात रूढ होतात, एवढेच नव्हे तर मूळ उच्चार कसे होते याही बाबतीतआपण अज्ञ राहतो.
– १ –
संस्कृत व्याकरणानुसार वर्णाचे उच्चारणस्थानानुसार पाच वर्गात विभाजन केले जाते. कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ्य. मराठीत मात्र काही वर्ण दंत्यतालव्यही आहेत. उदा. च, छ, ज, झ ह्या वर्णाचा उच्चार मराठीत दोन तन्हांनी केला जातो.

पुढे वाचा

लोकशाही तत्त्वाचा उद्देश

लोकशाही तत्त्वाचा उद्देश जुलूमशाही टाळण्याकरिता राजकीय संस्थांची निर्मिती, विकास आणि रक्षण करणे हा आहे. याचा अर्थ असा नव्हे की आपण या प्रकारच्या निर्दोष किंवा अभ्रंश्य संस्था कधी काळी निर्मू शकू, किंवा त्या संस्था अशी शाश्वती देऊ शकतील की लोकशाही शासनाने घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर, चांगला किंवा शहाणपणाचाच असेल. पण त्या तत्त्वाच्या स्वीकारात असे नक्कीच व्यंजित आहे की लोकशाहीत स्वीकारलेली वाईट धोरणेही (जोपर्यंत शांततेच्या मार्गांनी ती बदलून घेण्याकरिता आपण प्रयत्न करू शकतो तोपर्यंत) शुभंकर आणि शहाण्या जुलूमशाहीपुढे मान तुकविण्यापेक्षा श्रेयस्कर असतात. या दृष्टीने पाहता बहुमताचे शासन असावे हे लोकशाहीचे तत्त्व नाही असे म्हणता येईल.

पुढे वाचा

भक्ती हे मूल्य आहे काय?

आपल्या तत्त्वज्ञांनी आणि संतांनी भक्तीला एक श्रेष्ठ स्थान दिले आहे. गीतेत मोक्षाच्या सर्व मार्गात भक्तिमार्ग श्रेष्ठ मानला आहे. एखादा मनुष्य भगवद्भक्त आहे असे म्हणणे म्हणजे त्याची अत्युच्च स्तुती करणे आहे असे आपण समजतो.
भक्तीला एवढे माहात्म्य कशामुळे प्राप्त झाले?भक्तीविषयीचे हे जे सार्वत्रिक मत आहे ते बरोबर आहे काय?असा प्रश्न कोणी विचारल्यास त्याला आपण काय उत्तर देऊ शकू?
भक्तीचा उचित विषय म्हणजे परमेश्वर. तसे इतरही अनेक विषय मानले गेले आहेत. पिता, माता, गुरू, पती आणि स्वामी यांचे माहात्म्य आपल्या धर्मग्रंथांतून केलेले आपण पाहतो.

पुढे वाचा

दिवाळीतील ओळखी

टिळकांनी लिहिलेः ग्रंथ हे आमचे गुरू होत, आणि पुढे बजावले, छापण्याची कला आल्यापासून ग्रंथनिर्मितीला सुमार राहिलेला नाही. त्यामुळे निवड करून चांगले तेवढेच वाचा. आयुष्य थोडे आहे.
महाराष्ट्रात मासिकांची – नियतकालिकांची दिवाळी येते तेव्हा तर हा उपदेश फारच आठवतो.
आणखी एक, फडक्यांनी (ना. सी.) एका सुंदर गुजगोष्टीत हितोपदेश केला, तो मार्मिक आहे. आयुष्य कसे घालवावे, आपले काय काय चुकले, ते कसे टाळता आले असते इत्यादी गोष्टींचे ज्ञान माणसाला होते त्यावेळी त्याच्या आयुष्याची संध्याकाळ झालेली असते. आता उमजले तसे जगायला आयुष्य फारसे उरलेले नसते.

पुढे वाचा

इंग्लंडमधील कौटुंबिक जीवन

इंग्लंडमधील कौटुंबिक जीवनाचा शोध घेणे परदेशी पर्यटकाला शक्य नाही. परंतु त्याचे पडसाद त्यांच्या वृत्तपत्रात सतत ठळकपणे उमटत असतात. आमच्या मराठी वृत्तपत्रातच काय, आमच्या इतर सर्व भाषांतील वृत्तपत्रांत राजकीय पुढारी, त्यांचे राजकारण यावर जास्त भर असतो. ‘बड्या लोकांची गुप्त कृत्ये छापण्यास आमचे पत्रकार धजत नाहीत. ही ‘गुप्त कृत्ये उजेडात आणण्यासाठी परदेशी वृत्तपत्रांचे बातमीदार आणि त्या पत्रांचे संपादक आणि मालक राजी नसतात. पण दी टाइम्स, दी इंडिपेंडन्ट, डेली मेल, डेली एक्सप्रेस, गार्डीयन आदी वृत्तपत्रात सामाजिक आणि सांस्कृतिक घटनांना प्राधान्य दिले जाते.
मध्यमवर्गीय इंग्रज कुटुंब, तसेच आमचे भारतीय वृत्तपत्रे विकत घेत नाहीत.

पुढे वाचा

श्री दिवाकर मोहनींच्या स्त्री-पुरुष संबंधाच्या भ्रामक कल्पना

आजचा सुधारकच्या काही अंकातून दिवाकर मोहनी यांनी स्त्रीपुरुषांमधील स्वातंत्र्याचा विचार मांडताना स्त्रीपुरुषात स्वैर लैंगिक स्वातंत्र्य असावे असे म्हटले आहे. त्याना एकपतीपत्नीव्रताची कल्पना मान्य नाही. बहुपतिक किंवा बहुपत्नीक कुटुंब असल्यास हरकत नाही असे त्याना वाटते. त्यांच्या एकूण विचारावरच लैंगिक स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य असून इतर मूल्ये दुय्यम स्वरुपाची आहेत असे त्यांचे मत असावे असे वाटते. त्यांनीह्या प्रश्नाच्या सर्व अंगाचा विचार केला आहे असे दिसत नाही.
ह्या प्रश्नाचा विचार करताना प्राचीन भारतीयानी काम व अर्थ यांच्यापेक्षा धर्म आणि मोक्ष (स्वातंत्र्य) यांना अधिक महत्त्व दिले होते.

पुढे वाचा

चर्चा -खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?

ऑगस्ट ९४ च्या सुधारकातील “खरी स्त्रीमुक्ती कशात आहे” या लेखाद्वारे स्त्रीमुक्तीच्या संदर्भातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावरील चर्चेस सुरुवात केल्याबद्दल दिवाकर मोहनी यांना धन्यवाद.
या लेखात व्यक्त करण्यात आलेली काही मते अधिक स्पष्ट व्हावयास हवी होती, असे वाटते. उदा.
मोहनींनी स्त्रीपुरुष संबंधाच्या संदर्भात पुढील दोन मुद्दे मांडले आहेत –
(अ) स्त्रीपुरुषांना लैंगिक संबंधाचे स्वातंत्र्य असावे,
(ब) एकपतिपत्नीव्रत ही आदर्श व्यवस्था नव्हे; अर्थात् बहुपत्नीक किंवा बहुपतिक कुटुंबे असण्यास हरकत नसावी.
एकाच पतिपत्नीचे कुटुंब असून प्रसंगी त्या स्त्रीपुरुषांनी इतरही पुरुष-स्त्रियांबरोबर लैंगिक संबंध ठेवल्यास हरकत नसावी, ही एक गोष्ट झाली.

पुढे वाचा

स्त्री-पुरुष समता व स्त्री-मुक्तीसंबंधी सर्वेक्षण प्रश्नावलीचा मसुदा (स्त्रियांसाठी)

[आमचे मित्र डॉ. र. वि. पंडित ह्यांनी स्त्रीपुरुष समता व स्त्रीमुक्ती संबंधी एक सर्वेक्षण opinion poll) करावे अशी सूचना केली आणि त्यांनीच त्यासाठी एका प्रश्नावलीचा मसुदा करून आमच्याकडे पाठविला आहे. तो सोबत देत आहोत. त्यामध्ये काहीफेबदल करावयाचा असल्यास तो आमच्या वाचकांनी सुचवावा आणि त्याला परिपूर्ण स्वरूप प्राप्त करून देण्यास साहाय्य करावे. त्याचप्रमाणे ते प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यास साहाय्य करावे अशी आमची आपणांस विनन्ती आहे.]
(१) आपले नाव व वय (ऐच्छिक)
(२) आपले शिक्षण किती?
(३) घरातील सर्वाचे मिळून एकूण वार्षिक उत्पन्न
(४) नोकरी/व्यवसाय करीत असल्यास स्वतःचे वार्षिक उत्पन्न
(५) कुटुंबातील व्यक्तींची संख्या व प्रत्येकाचे शिक्षण
(६) घरामध्ये वाहन आहे काय?असल्यास

पुढे वाचा

लोकशाही आणि हुकूमशाही

शासनांचे दोन प्रकार करता येतील. पहिल्या प्रकारचे शासन म्हणजे ज्याचा अंत रक्तपातावाचून करता येतो ते, उदा. सार्वत्रिक निवडणुकांनी. अशा व्यवस्थेत ज्यांच्या साह्याने राज्यकर्त्यांना बडतर्फ करता येईल अशा संस्था असतात, आणि त्या संस्थांचा विध्वंस राज्यकर्ते करू शकणार नाहीत इतक्या मजबूत सामाजिक परंपरा असतात. दुसऱ्या् प्रकारात शासनाचा शेवट शासित केवळ यशस्वी क्रांतीनेच करू शकतात, म्हणजे अर्थात् बहुधा नाहीच. पहिल्या प्रकारच्या शासनाला ‘लोकशाही आणि दुसऱ्याक प्रकारच्या शासनाला ‘हुकूमशाही किंवा जुलूमशाही हे शब्द मी सुचवितो. त्या शब्दांच्या पारंपरिक अर्थाशी हा भेद स्थूलमानाने जुळणारा आहे असे मला वाटते.

पुढे वाचा

आधुनिक जैविक तंत्रविद्येचे सामाजिक आयाम

हल्ली विज्ञानातील संशोधनाचा प्रचंड आवाका आणि वेग जगात सार्वत्रिक क्रांती घडवीत असून, मानवी संस्कृतीच्या ५००० वर्षांच्या ज्ञात इतिहासात एवढी मूलगामी स्थित्यंतरे केवळ अभूतपूर्वच म्हटली पाहिजेत. या वैज्ञानिक संशोधनाचा उगम प्रामुख्याने पाश्चात्त्य प्रगत देशात असला तरी पृथ्वीतलावरील कोणताही मानव समाज या स्थित्यंतरापासून अलिप्त राहू शकत नाही. भौतिक शास्त्रांतील संशोधनामुळे मानवाच्या सुखसोयी वाढल्या व मानवी जीवन अधिक सुसह्य आणि गतिशील (dynamic) झाले. परंतु जीवशास्त्रांतील (Life Sciences) आधुनिक संशोधनामुळे मात्र मानवी जीवनाच्या अनेक सांस्कृतिक व सामाजिक परंपरा आणि मान्यता क्षीण होऊ लागलेल्या दिसतात. विशेषतः जैविक तंत्रविद्येच्या (Bio-technology) विकासामुळे तर मानवी जीवनाचे सूर व लय बदलू लागली आहे.

पुढे वाचा