अमर्त्य सेन यांच्या दुष्काळांच्या विश्लेषणाने जगातील गरिबांच्या स्थितीच्या आकलनाला मूलभूत मदत केली आहे. माल्थसपासूनची परंपरा अशी की अन्नाचे उत्पादन घटल्याने दुष्काळ पडतात. सेन यांनी हे प्रमुख कारण नसल्याचे दाखवून देण्यासाठी बंगाल, इथिओपिया, चीन व आयर्लंड येथील दुष्काळ तपासले. सामाजिक व राजकीय व्यवस्थांचे अपयश हे दुष्काळाचे प्रमुख कारण असल्याचे सेनना आढळले. खुली प्रसारमाध्यमे व तसल्या इतर लोकशाही यंत्रणांचा दुष्काळाच्या शक्यता कमी करण्यातील सहभागही स्पष्ट झाला. अन्नोत्पादन किंवा अन्नपुरवठा करण्याचे इतर मार्गही कमकुवत लोकशाह्यांना दुष्काळापासून वाचवू शकत नाहीत. सेन नोंदतात, “कार्यक्षम बहुपक्षीय लोकशाही असलेल्या एकाही देशात दुष्काळ पडलेला नाही.”
विषय «इतर»
महानगराची वाढ = झोपडपट्टीची वाढ
नागरीकरणामध्ये दोन त-हेच्या नगरांची वाढ लक्षात घेणे आवश्यक आहे. एक म्हणजे मुंबईसारखी महानगरे ज्याला metropolitan cities म्हणतात. महाराष्ट्रात अशी मोठी महानगरे इतर नाहीत. मुंबईसारख्या नगरांची रोगिष्ट वाढ ४० ४५ वर्षांपूर्वीच लक्षात येऊन मुंबईची अधिक वाढ थांबविण्यासाठी बरेच उपाय केले जात होते. त्यात मुख्य म्हणजे उद्योगधंद्याचे विकेन्द्रीकरण करण्याकडे लक्ष दिले जात होते. त्यामुळेच पुणे, नाशिक, अहमदनगर, नारायणगाव किंवा इतर बरीच नगरे आज महाराष्ट्रात दिसतात व त्यात उद्योगधंदे वाढून ग्रामीण भागातील लोकांना कामधंदा मिळण्याची सोय नक्कीच झालेली आहे. त्यांचा अभ्यास वेगळ्या त-हेने करणे आवश्यक आहे.
मोठ्या गाड्यांचे व्यसन
मोटर-कारचा शोध लागण्याआधीचे आयुष्य कल्पनेत आणा. आज गरीब देशांमध्ये जसे मर्यादित हालचालीचे आयुष्य असते, तसेच तेव्हा श्रीमंत राष्ट्रांतही असायचे. कुटुंब, फार तर मोहल्ला-पेठ-वेटाळ या सीमेतच ते बांधले जायचे. मग खनिज तेलाचा व्यापारी वापर करू देणारे तंत्रज्ञान आले आणि सीमा विस्तारून ‘मुक्ती’ मिळाली. जेव्हा हे तंत्रज्ञान पंखांशीही जोडले गेले तेव्हा तर जग झपाट्याने लहान झाले. माझे आईवडील कधी विमानात बसले नाहीत माझी मुले दोन वर्षांची व्हायच्या आतच त्यांचे ५०,००० हवाई किलोमीटर झाले होते.
पण ११ सप्टेंबर २००१ ला जगाला खनिज तेलही धोकादायक असल्याची आठवण झाली.
दगडविटांवर नको तेवढा: माणसांवर अपुरा!
पूर्व व पश्चिम जर्मनी जेव्हा एकत्र झाले तेव्हा चॅन्सेलर हेल्मुट कोल यांनी उत्साहाने पूर्व जर्मनीच्या पुनरुत्थानाच्या घोषणा केल्या. “बहरणारी क्षेत्रे काम करण्याला आणि जगण्याला सार्थ ठरवतील’, असे पूर्व जर्मनीला आश्वासन दिले गेले. वचनपूर्तीसाठी पश्चिम जर्मनीने मानवी इतिहासातील सर्वांत मोठा संपत्तीचा ओघ पूर्वेकडे वळवला. सुमारे दीड हजार अब्ज डॉलर्स (सुमारे सत्तर हजार अब्ज रुपये) गेल्या चौदा वर्षांत पश्चिमेतून पूर्वेकडे गेले आहेत. जीवनमान सुधारणे आणि अजस्र सार्वजनिक कामे (रस्ते, धरणे, वीजकेंद्रे) उभारणे यांसाठी हे पैसे वापरले गेले. महामार्गांचे जाळे, हे एक महत्त्वाचे अंग होते.
विवेकवाद – भाग ८-अ : अध्यात्म आणि विज्ञान (प्रथम प्रकाशन नोव्हेंबर १९९० अंक १.८, लेखक – दि. य. देशपांडे)
याच अंकात अन्यत्र वाचकांच्या पत्रव्यवहारात प्रा. श्याम कुळकर्णी यांचे एक पत्र छापले आहे. ते पत्र विवेकवादावर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांचे प्रातिनिधिक मानायला हरकत नाही. प्रा. कुळकर्णी म्हणतात की जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्माची सुरुवात होते. प्रा. कुळकर्णी विज्ञानाचे प्राध्यापक आहेत, आणि म्हणून त्यांनी विज्ञानाचे अधिकार आणि त्याच्या मर्यादा यांविषयी व्यक्त केलेल्या मताला वजन आहे असे मानले जाणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या पत्राला काहीसे सविस्तर उत्तर देण्याचे ठरविले आहे. जिथे विज्ञानाचे क्षेत्र संपते तिथे अध्यात्माच्या क्षेत्राची सुरुवात होते म्हणजे नेमके काय ? या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता आधी अध्यात्म म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय हे काहीशा विस्ताराने सांगावे लागेल.
उदारीकरणामुळे भारतीय शेतकरी उद्ध्वस्त
भारतासह इतर विकसनशील देशांतील शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक तसेच ब्रिटिश सरकार पुरस्कृत उदारीकरण आणि खाजगीकरणासंबंधीचे धोरणच कारणीभूत असल्याचा छातीठोक आरोप लंडनस्थित एका स्वयंसेवी संस्थेने केला आहे.
भारतात, विशेषतः आंध्र प्रदेशात, घडलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला ब्रिटिश सरकारचेच धोरण जबाबदार असून, उदारीकरण आणि खाजगीकरण ह्यांमुळे भारतासह इतर गरीब देशांतील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाल्याचा ठपकाही या संस्थेने ठेवला आहे. “ख्रिस्तियन एड’ नामक स्वयंसेवी संस्थेने भारतासह इतर विकसनशील देशांतील कोलमडलेल्या शेतीव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवर जळजळीत प्रकाश टाकणारा अहवालच जारी केला आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करण्यास ब्रिटिश सरकारपुरस्कृत विकासात्मक धोरणच कारणीभूत असल्याचेही यात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
व्याख्या
Faith: Belief without evidence in what is told by one who speaks without knowledge, of things without parallel.
श्रद्धाः ज्या गोष्टींना समांतर असे काही नाही, अशा गोष्टींबद्दल ज्याला ज्ञान नाही अशा व्यक्तीच्या सांगण्यावरील विश्वास, ज्याला पुरावा नाही. Rational: Devoid of all delusions save those of observation, experience & reflection.
विवेकीः निरीक्षण, अनुभव आणि विचार यांमधून उद्भवणारे भ्रम सोडून इतर सर्व भ्रम टाळणारे/टाळणारा.
अंब्रोज बिअर्सच्या द डेव्हिल्स डिक्शनरी मधून (डोव्हर, १९७४)
जाणीव आणि विचार, भाषा आणि भाषण
प्राणी शब्द वापरत नाहीत आणि शब्दांवर आधारलेल्या भाषेखेरीज विचार करता येत नाही, यावरून प्राणी विचार करत नाहीत; असे देकार्तचे (Descartes) मत होते. तो तर्कशुद्ध विचारांसाठी ख्यातनाम होता. विसाव्या शतकाच्या बऱ्याच कालखंडात लोकप्रिय असलेला वर्तनवाद (behaviourism) काही प्रमाणात देकार्तच्या मतावर आधारलेला होता. त्या वादाचा दुसरा आधार म्हणजे प्रत्यक्षार्थवाद (positivism). प्रत्यक्षार्थवादाचा पाया हा की निरीक्षणे व मोजमाप याच्या आवाक्यात नसलेल्या कोणत्याच गोष्टीचा विचार करण्यात अर्थ नाही. या दोन मतप्रवाहांच्या प्रभावामुळे वर्तनवाद्यांना प्राणी म्हणजे केवळ यंत्रे वाटत. त्यांच्या मते प्राणी ‘वागतात’, विचार करत नाहीत, आणि ते विचार करतात असे मानणे ही भोंगळ भावनाविवशता आहे.
राष्ट्रवादाचे पुनर्मूल्यांकन
राष्ट्रवादाचा अस्त होतो आहे
मी काही तथाकथित देशभक्त नाही. उलट कधी कधी तर मला माझ्या देशबांधवांच्या काही कृत्यांबद्दल लाजच वाटते. मला असे वाटते की राष्ट्रवाद आणि देशभक्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भारतीय असणे ही काही माझी स्वतःची निवड नव्हती. मी इथे जन्माला आलो आणि म्हणून आपोआप भारतीय ठरलो. मी दुसऱ्या कोणत्या देशात जन्माला आलो असतो तर त्या देशाचा झालो असतो. समजा, मी भारतीय नागरिकत्व नाकारायचे ठरवले तरी ते तितके सहज सोपे नाही. माझा कोणताही विशेष उपयोग नसेल तर दुसरा कोणताही देश मला त्यांचा म्हणून कशाला स्वीकारेल ?
‘कोषबद्धते’ ला थारा नाही!
अमेरिका एका कारमध्ये बसून लांबच्या प्रवासाला निघाली आहे. आतली माणसे एकमेकांच्या जिवावर उठत नाही आहेत कारण प्रत्येकाची खानपानाची व्यवस्था, बसायचे आसन आणि मनोरंजनाची व्यवस्था इतरांपासून सुटी केली गेली आहे. बाबा उपग्रह रेडिओ ऐकताहेत, आईच्या हातात मासिक आहे आणि मुलांसाठी डीव्हीडी, एम्पी-थ्री म्यूझिक सिस्टिम्स आणि व्हिडिओ गेम्स आहेत. वस्तूंचे प्रेम, वस्तूंमध्ये आश्चर्यकारक विविधता उपलब्ध असणे, आणि यांच्या मिश्रणातून प्रत्येकाने स्वतःचे इतरांपासून सुटे असे ‘विश्व’ घडवणे, यामुळे अमेरिका शांत आहे. इथल्या उपभोक्ता संस्कृतीत लोकांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असणे नुसतेच ‘हवेसे’ नाही, तर थेट आवश्यक आहे.