विषय «इतर»

लेखनाच्या अराजकासंबंधाने (३)

माझ्या शुद्धलेखनविषयक प्रतिपादनास विरोध करणारी ३-४ पत्रे आली आहेत आणि २ लेख अन्यत्र प्रकाशित झाले आहेत. त्यांचा येथे परामर्श घेण्याचा प्रयत्न करतो. या सर्व पत्रलेखकांचा आणि माझा मतभेद मुख्यतः एकाच ठिकाणी आहे. त्यांना उच्चाराप्रमाणे लेखन पाहिजे आणि मला त्याची गरज वाटत नाही. लेखन हे कधीच उच्चाराप्रमाणे नसते. ते वाचकांना पूर्वपरिचित असलेल्या उच्चाराची आठवण करून देणारे असतें ही एक गोष्ट ; आणि लेखनापासून अर्थबोध होण्यासाठी त्याचा उच्चार मनांतदेखील करण्याची गरज नाही, तसा उच्चार करून पाहण्यांत वाचकाचा कालापव्यय होतो; आणि आपल्याला जरी तशा संवयी लागलेल्या असल्या तरी त्या संवयी प्रयत्नपूर्वक मोडायला हव्या ही दुसरी गोष्ट.

पुढे वाचा

नगरांचे आधुनिकत्व आणि राष्ट्रीय वैभव टिकविण्याची शक्यता

महानगरातील म्हणजे विशेषतः मुंबईतील नागरीकरणाच्या चर्चेत पूर्वीच्या काही लेखांत झोपडपट्ट्यांचीच चर्चा झाली. त्याला कारण १९९८-९९ च्या काही पाहण्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर मुंबईतील झोपडपट्ट्यांबाबत हरत-हेची माहिती मिळाली. ती दुर्लक्षिण्यासारखी नव्हती. परंतु हे विसरून चालणार नाही की नागरीकरण हे राष्ट्राचे वैभव आहे. त्यात अनेक हव्याहव्याशा गोष्टी होत असतात. उदाहरणार्थ मुंबईचीच गोष्ट घ्या. मुंबई शहराला एके काळी ‘मोहमयी’ म्हणत. ह्या शहरातील रुंद, स्वच्छ, राजरस्ते, वैभवशाली व कल्पनारम्य इमारती, त्याचा आकार, जागोजागची मनोहारी उद्याने, वस्तुसंग्रहालये, कलादालने, हरत-हेची वाहने, रेल्वेची स्वस्त, वेगवान, व अत्यंत नियमित सोय, उड्डाणपुलांच्या सहाय्याने गर्दीला तोंड देण्याची व्यवस्था, राहण्याच्या सोयीसाठी आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच उंच इमारती, प्लॅनेटोरियम किंवा तसले शास्त्राधारित मनोरंजनाचे विविध मार्ग, समुद्रकिनाऱ्याचे संपन्न सौंदर्य, समुद्र हटवून केलेली मनस्वी व्यवस्था, व्हिक्टोरिया गार्डनसारखी प्राणिसंग्रहालये, अशी सर्व डोळे दिपवून टाकणारी स्थळे महानगराशिवाय कोणाला परवडतील ?

पुढे वाचा

भारतातील वीजक्षेत्र आणि स्पर्धेतील धोके

‘डिस्कशन ग्रूप’ तर्फे आयोजित डॉ. माधव गोडबोले ह्यांच्या डॉ. हरिभाऊ परांजपे स्मृती व्याख्यानाचा गोषवारा ‘वीजक्षेत्र व लोकानुनयाचे राजकारण’ ह्या शीर्षकाखाली (साधना, १२-५-०५ च्या अंकात) वाचण्यात आला. त्या गोषवाऱ्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांची अधिक चर्चा व्हावी म्हणून हे टिपण. त्या लेखातील गोडबोलेंच्या शब्दप्रणालीचाच येथे उपयोग केला आहे.
लोकानुनयाचे राजकारण करू नये व धनिकांना अर्थसाहाय्य देऊन त्याचा बोजा राज्य सरकारांच्या तिजोरीवर टाकला जाऊ नये हा त्यांचा मुद्दा योग्यच आहे. लोकांना जेवढे फुकटात मिळेल तेवढे हवेच असते. पंजाब-हरयाणाचे शेतकरी सधन असूनही तेथे निवडणुकीच्या वेळी ‘बिजली-पानी मुफ्त’चे राजकारण चालते.

पुढे वाचा

विवेकवाद-भाग ९(अ) : नीतिविचार धर्मविचाराहून निराळा (प्रथम प्रकाशन डिसेंबर १९९० – जानेवारी १९९१ अंक १.९-१०, लेखक: दि. य. देशपांडे)

नवा सुधारक च्या ऑक्टोबर अंकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या आगरकरांच्या उताऱ्याचे शीर्षक आहे, ‘नीतिविचार धर्मविचाराहून निराळा’. या विषयावर स्पष्टीकरणात्मक असे काही लिहावयाचा आज विचार आहे.
आजपर्यंत ‘विवेकवाद’ या शीर्षकाचे जे आठ लेख प्रसिद्ध झाले आहेत त्यांसंबंधाने काही चमत्कारिक विचारणा आमच्याकडे केल्या गेल्या आहेत. एक वाचक म्हणाले की तुमच्या विवेकवादात भावनांना काहीच स्थान नाही काय ? तुमच्या लेखांवरून आमचा असा समज झाला आहे की तुम्हाला फक्त तर्ककर्कश गोष्टीच मान्य दिसतात. तुमच्या व्यवस्थेत भावनेला काहीच स्थान दिसत नाही. दुसरे एक वाचक म्हणाले की तुम्ही धर्मांवर असे तुटून पडला आहात की तुमच्या विवेकवादात केवळ सुखप्राप्तीलाच तेवढे स्थान आहे.

पुढे वाचा

सायकल आणि कार (पूर्वार्ध)

विल्यम वॅगस्टाफ ह्या ९१ वर्षीय माणसाचे नुकतेच लंडन येथे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्याने आपली वैशिष्ट्यपूर्ण सायकल लंडन येथील ट्रान्सपोर्ट म्युझियमला भेट दिली. ह्या सायकलचे वैशिष्ट्य म्हणजे वॅगस्टाफने ती ७५ वर्षे वापरली. वयाच्या २० व्यावर्षी बचत करून १९२९ साली ही सायकल त्याने विकत घेतली होती. केवळ शेवटची दोन वर्षे आजारी असल्यामुळे सायकलचा वापर त्याला करता आला नाही. वयाच्या नव्वदीनंतरही आठवड्यातून २ ते ३ वेळा तो सायकल चालवत असे. इंजिनिअर म्हणून टेलिफोन खात्यात काम करीत असताना त्याचे दररोज २० किमी सायकलिंग होत असे.

पुढे वाचा

वर्तमानकाळ आणि भूतकाळ

एखादी प्रतिमा एखाद्या कलाकृतीत कशी सादर केली जाते यातून पाहणाऱ्यांच्या कलाक्षेत्राबद्दलच्या अनेक समजुती घडत असतात. सौंदर्य, सत्य, ‘विलक्षण’ कलाकार, संस्कृती, आकार (रूप), सामाजिक स्थिती, अभिरुची अशांबाबतच्या समजुती प्रतिमांच्या आधारे घडतात. जुन्या कलाकृती आज पाहणाऱ्यांच्या समजुती कलाकृती घडतानाच्या समजुतींपेक्षा वेगळ्या झालेल्या असतात. पूर्वीचे जग कसे होते याबद्दलच्या आजच्या समजुती भूतकाळाला स्पष्ट करण्याऐवजी ‘गूढ’ करतात.
आपल्याकडे पाहणाऱ्याला आपण नेमके दिसावे अशा रूपात भूतकाळ पाहणाऱ्याची वाट पाहत बसलेला नसतो. इतिहास हा नेहमीच वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांच्या संबंधाच्या रूपात असतो. आजची भीती, आजच्या आस्था नेहमीच भूतकाळाला धूसर करत असतात.

पुढे वाचा

भारताचे जलभविष्य

एखाद्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार कसे? जी.एन.पी. ठोकळ राष्ट्रीय उत्पादन, दरडोई उत्पन्न या आकड्यांवरून ? की सामान्य माणसांच्या परिस्थितीवरून? ठोकळ राष्ट्रीय उत्पादन पाहून देशातील माणसांची स्थिती लक्षात येत नही. देशातील माणसांच्या विकासाचा निर्देशांक महत्त्वाचा आहे. शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, जळण, पर्यावरण यांचा विचार करून विख्यात अर्थवेत्ते डॉ. मेहबूब उल हक यांनी मनुष्य विकास निर्देशांक तयार केला. त्याच धर्तीवर जलदारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना मांडली जात आहे. उपलब्ध जलसंपदा, पाण्यापर्यंत पोच, पाणी खरेदी करण्याची क्षमता, पाणीवापराची कार्यक्षमता आणि पर्यावरण या पाच निकषांवरून भागाचा जलनिर्देशांक ठरविला जातो.

पुढे वाचा

चोम्स्कींचा भाषाविचार

आधुनिक भाषाशास्त्राच्या इतिहासात नोम चोम्स्कीचे स्थान अद्वितीय आहे. सन १९५७ मध्ये प्रकाशित झालेल्या त्याच्या सिन्टॅक्टिक स्ट्रक्चर्स या पुस्तकापासून भाषा-विज्ञानात एका अफलातून क्रांतीची सुरुवात झाली. चोम्स्कीच्या विचारांचा, तत्त्वांचा आणि संकल्पनांचा भाषा-विज्ञानावरच नव्हे तर इतरही अनेक ज्ञानशाखांवर जबरदस्त प्रभाव पडला आहे. चोम्स्कीप्रणीत या क्रांतीच्या पूर्वीही आणि नंतरही असंख्य प्रवाह भाषाशास्त्रात आहेत. परंतु आज भाषाशास्त्रातील विभिन्न प्रवाह चोम्स्कीच्या मांडणीच्या अनुषंगाने आपापली भूमिका मांडत असतात यातच त्याच्या सिद्धान्तांचे महत्त्व दडलले आहे. आपल्या भाषाविषयक संशोधनातून चोम्स्कीने मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, संगणकीय भाषाभ्यास ह्या क्षेत्रांमध्ये मूलभूत योगदान दिले आहेच, पण त्याचबरोबर असंख्य सोपे लेख लिहून, शेकडो भाषणे व चर्चासत्रे घडवून भाषाशास्त्र हा विषय रंजक व लोकप्रिय करण्यास मदत केली आहे.

पुढे वाचा

संमतीचे उत्पादन: प्रसारमाध्यमांचे राजकीय अर्थशास्त्र (उत्तरार्ध)

[मागील अंकात या लेखाच्या पूर्वार्धात हर्मन व चोम्स्की ह्यांनी मांडलेल्या प्रचाराच्या प्रारूपातील पहिल्या चार चाळण्यांचे वर्णन केले होते. (१) आकार, मालकी आणि नफाकेन्द्री माध्यमे, (२) जाहिरात, (३) प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचे स्रोत आणि (४) झोड आणि अंमलदार, अशा या चार चाळण्या. आता पुढे….]

कम्युनिझम-विरोध : एक नियंत्रक यंत्रणा
शेवटचे गाळणे आहे ते कम्युनिझमविरोधाच्या तत्त्वज्ञानाचे. संपत्तिवानांना कम्युनिझम हा निर्वाणीचा शत्रू वाटत राहिला आहे, कारण तो त्यांच्या वर्गीय स्थानाला व उच्च प्रतिष्ठेला धक्का देणारा असतो. सोविएत, क्यूबन व चिनी क्रांत्या पाश्चात्त्य अभिजनांना संकट ठरल्या आहेत.

पुढे वाचा

झोपडपट्ट्या व नागरीकरण

नागरीकरणाची जी व्याख्या आहे तीप्रमाणे जेव्हा मनुष्यवस्ती पाच हजारांपेक्षा जास्त असते व पाऊणपेक्षा जास्त पुरुष बिनशेतीधंद्यात काम करतात तेव्हा त्या वस्तीला नगर (Town) म्हणतात. उरलेल्या वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. जेव्हा ग्रामीण वस्ती लोकसंख्येमुळे व व्यवसायांमुळे नागरी बनते त्या घटनेला नागरीकरण म्हणतात. ह्या घटनेमागे नगरांमध्ये बिनशेतकी व्यवसायाची वाढ असते. हे नागरीकरण वाढत जाऊन लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारते व राहणी गुणात्मकदृष्ट्याही उच्च दर्जाची होते. ह्या गुणात्मक वाढीत शिक्षणाचा दर्जा उंचावणे, संगीत-कलांची वाढ होणे, इतरही अनेक कौशल्यांची वाढ होणे, या गोष्टी अपेक्षित असतात. अशी नगरे मोठमोठी होत जाऊन एक लाखापेक्षाही जास्त वस्तीची होतात तेव्हा त्यांना शहरे (Cities) म्हणतात.

पुढे वाचा