गृहिणी —- प्रवास चालू (दांपत्यजीवन)

“कुटुंबकेंद्रित समाज आणि स्त्रीकेंद्रितकुटुंब’ या विषयाचा मी मागोवा घेण्याचा प्रयत्न करतोय. मी काही तात्त्विक चर्चा करायला बसलेलो नाही तर या विषयात निरनिराळ्या ठिकाणाहून आत शिरण्याचा प्रयत्न करतो आहे. एक गृहिणी म्हणून तिच्या विविध प्रकारच्या कामांचा अगदी थोडक्यात मी आढावा मांडला होता. तेथे गृहिणी ही ‘कर्ती’ होती. विचार आला की या कर्तीचे पुढे होते काय?
खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. माझे दोन मित्र गप्पा मारत होते. एक म्हणाला —-अरे, वैजू म्हणते आहे, आठपंधरा दिवस माहेरी जाते. तिच्या आईला जरा बरं नाहीयं वाटतं.

पुढे वाचा

विवेकवादावरील आव्हानांस उत्तर

प्राध्यापक रेगे यांचे तत्त्वज्ञान या ग्रथांतील डॉ. सुनीति देव यांच्या ‘विवेकवाद आणि त्याच्यापुढील आव्हाने’ या लेखाला प्रा. रेग्यांनी दीर्घ उत्तर दिले आहे. त्यांच्या सर्वच लिखाणाप्रमाणे हे उत्तरही गंभीर विचाराने परिप्लुत आणि अतिशय व्यवस्थित झाले आहे. त्यातील काही युक्तिवादांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
१. आरंभी प्रा. रेगे यांनी देवांच्या लेखातील ढोबळ चुका म्हणून दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे विज्ञानाच्या औपन्यासिक-निगामी रीतीत (hypothetico-deduction method) एक अवैध अंश आहे ही. विज्ञानाची रीत औपन्यासिक-निगामी आहे हे खरेच आहे; पण तिच्यातील अवैध अंशामुळे तिचे निष्कर्ष सिद्ध होत नाहीत असे रेगे म्हणतात.

पुढे वाचा

आबा

. . . ती तरुण मुले वेडावली होती. ती कोणत्याही सार्वजनिक नळावर पाणी पीत हुंदडत होती. मार खात होती. स्पृश्य जगाच्या कपाळावरील आठ्यांकडे उपहासाने पाहात होती. कोणत्याही देवळात शिरत होती, आणि डोक्यावर घाव घेत होती. देवाच्या मायेची पाखर घेऊन, बेडरपणे स्पृश्य जगाच्या नरड्याशी झोंबू पाहणाऱ्या रागीट नजरांशी नजर भिडवीत होती. पण अखेरीस त्या देवदर्शनाने त्यांची पोटे भरली नाहीत. त्या स्पृश्यांच्या नळावर पाणी पिऊन त्यांचे समाधान झाले नाही. मग ती समाधानासाठी माणसांकडे पाहू लागली. त्यांना तीनच माणसे माहीत होती. गांधीबाबा, दादा आणि आबा.

पुढे वाचा

पत्रसंवाद

शशिकांत हुमणे, १२, राजीव सह-गृहनिर्माण संघटना, बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई — ४०० ०५१
एप्रिल महिन्यात १४ तारखेला डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस येतो. त्यानिमित्त एक जुने शुभेच्छापत्र पाठवीत आहे, ज्यात डॉ. आंबेडकरांचे मौलिक विचार आहेत. हे विचार एप्रिलच्या अंकाच्या मुख्यपृष्ठावर छापावे, तसेच नोबेल प्राईझविजेता इलियास कॅनेटी याचे त्याच पत्रातील विचार मे च्या अंकाच्या मुख-पृष्ठावर छापावे.

“ते” आणि “आपण’ हे हिंदुधर्मातील संपूर्ण जातीजमातींचे नाजुक दुखणे आहे. जातीशिवाय हिंदू किंवा हिंदुधर्म नाही. आणि हिंदूंशिवाय जगात इतरत्र कुठेही जाती-वेडेपणा व जाती-मत्सर उपलब्ध नाही. जातीच्या संसर्गरोगाची लागण मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांनाही झाली असल्यास नवल नाही, परंतु या पापाचे धनी सुद्धा हिंदू आणि हिंदुधर्मच आहेत असे खेदाने म्हणावे लागते.

पुढे वाचा

मनाचिये गुंती

आधुनिक युगात स्थलकालाबाधित अशी जर कोणती गोष्ट असेल, जी प्रत्येक मनुष्यप्राण्याला कमीजास्त प्रमाणांत छळत असते, ती म्हणजे काळजी किंवा चिंता. Anxiety (चिंता) हा जर एखाद्या व्यक्तीचा स्थायीभाव झाला तर, तिचे दूरगामी शारीरिक व मानसिक दुष्परिणाम, अनेक व्याधींचा उद्भव करून त्या व्यक्तीचे जीवन यातनामय करून टाकू शकतात. ‘जी चित्ताला जाळते ती चिंता’ हे सर्वश्रुत आहेच. सामान्य माणसाचे सामान्य जीवन जगणेही मुष्कील करून टाकणारी ही चिंता (anxiety) दूर करण्यासाठी व किंचित काल तरी तीपासून सुटका करणारी अशी उपाययोजना मग माणसे शोधू लागतात. मुक्तीचे हे मार्ग मात्र दुखण्यापेक्षा जालीम ठस्न जास्तच गंभीर अशी दुखणी होऊन बसतात.

पुढे वाचा

‘मेरा घर बेहरामपाडा’

जमातवादाविषयीची प्रभावी चित्रफीत:
नव्वदीच्या दशकात जातीय दंगलींमुळे प्रचंड मनुष्य हानी व वित्तहानी झाल्याचे आपण अनुभवले. बाबरी मशिदीला उद्ध्वस्त करण्यातून जमातवादाला उधाण आले. विविध धर्मसमूहांतील टोकाची धर्मांधताही या दशकात प्रकर्षाने जाणवली. राजकीय नेत्यांनी व त्यांच्या पक्षांनी राजकारणासाठी व सत्तेवर येण्यासाठी धर्मश्रद्धांचा पुरेपूर वापर केल्याचेही अनुभवास आले. आक्रस्ताळी व प्रक्षोभक भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या या राजकीय नेत्यांनी व राजकीय उद्दिष्टे ठेवून धार्मिक नेत्यांनी जमातवादाला खतपाणीच घातले. या जमातवादाचा, जातीय दंगलींचा, समाजातील सर्वसामान्य नागरिकांवर कसा व केवढा परिणाम होतो हे अत्यंत साक्षेपाने दाखवून देणारी ‘मेरा घर बेहरामपाडा’ ही चित्रफीत नुकतीच बघायला मिळाली.

पुढे वाचा

सोन्याची अंडी?

[सुमारे सोळा लाख माणसांना पूर्णवेळ रोजगार देणारा कुक्कुटपालन उद्योग, शेतीला पूरक म्हणून अर्धवेळ ह्या उद्योगात असणारी माणसे वेगळीच. चांगल्या, सुजाण उद्योजकतेतून जगभरात भारतीय कुक्कुटपालनाचा दबदबा निर्माण झालेला, ह्या उद्योगाचे प्रवक्तेही अभ्यासू आणि आपली बाजू सक्षमतेने मांडणारे—-असा हा उद्योग आज जागतिकीकरणाला सामोरा जात आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र टाईम्सच्या एका पुरवणीतून ह्या उद्योगाने आपली स्थिती स्पष्ट केली —- त्याचे हे संकलन.]

संभाव्य परिणाम :
जागतिक व्यापार संघटनेशी झालेल्या करारानुसार १ एप्रिल २००१ पासून कुक्कुटपालन-व्यवसायावरील सगळी संख्यात्मक बंधने मोडीत निघतील आणि भारतीय बाजारपेठ अंडी, मांस, इ.

पुढे वाचा

भयमुक्त शिक्षणासाठी

काही दिवसांपूर्वी नागपूरच्या वर्तमानपत्रांमधून दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. ही मुले विद्यार्थी होती आणि शिक्षणाशी संबंधित व्यवहारातून ती आत्महत्येला प्रवृत्त झाली. एका विद्यार्थ्याला कॉपी केल्या-बद्दल शिक्षकांनी बेदम मारहाण केली म्हणून त्याने आत्महत्या केली आणि दुसऱ्याने परीक्षेतील अपयशामुळे नैराश्य येऊन आत्महत्या केली. परीक्षा आणि त्यातील यशापयश ह्याचा आणि पर्यायाने शिक्षणाचाही विचार फार व्यापक पातळीवर करण्याची गरज जास्त जास्त निकडीची होत चालली आहे. ह्या करता कुठलेही पाऊल उचलण्या पूर्वीच पाय मागे ओढण्यासाठी अनेक कारणे तत्परतेने पुढे केली जातील, तरीही व्यावहारिक पातळीवर काय करता येईल ज्यामुळे अशा टोकाच्या, निर्वाणीच्या कृती करायला विद्यार्थी प्रवृत्त होणार नाहीत ह्याचा विचार पालकांनी, शिक्षकांनी, शिक्षण-तज्ज्ञांनी आणि शाळा-चालकांनी करायला हवा.

पुढे वाचा

भारताचे आर्थिक धोरण

आ.सु.च्या मार्च २००१ च्या अंकात भारताच्या आर्थिक परिस्थितीबद्दल संपादकांनी चिंता व्यक्त केली आहे आणि “खऱ्याखुऱ्या’ तज्ज्ञांचे मार्गदर्शन मागितले आहे. त्यांच्या म्हणण्याचा हा दुसरा भाग जरा विचित्र वाटतो. खरे खुरे तज्ज्ञ कोण हे ठरविण्याचे आपल्याजवळ काही साधन नाही. निरनिराळ्या तज्ज्ञांचे म्हणणे आपण ऐकून घेऊन आपणच विषय समजून घ्यायला पाहिजे. विषयाची सर्वसाधारण समज एवढेच सामान्य वाचकाचे ध्येय असू शकते. आ.सु. हे सर्वसाधारण वाचकांचे मासिक असल्यामुळे त्यांना एक सर्वसाधारण समज आणून देणे एवढेच आ.सु.चे कार्य असू शकते. मला असे वाटते की १९९१ साली जे नवीन आर्थिक धोरण (नआधो) अमलात आले व ज्याचा पाठपुरावा पुढे चालू आहे त्यावर तज्ज्ञांनी जी टीका केली आहे ती आपण पाहिली तर आपण या धोरणाकडे समतोलपणे बघू शकू.

पुढे वाचा

खादी (भाग २)

खादी ही जशी एक वस्तू आहे तसा तो एक परिपूर्ण विचार आहे. हा विचार समतेचा, स्वयंपूर्णतेचा तसा ग्रामस्वराज्याचा आहे. समतेचा अशासाठी की खादीमुळे श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होऊन कातणाराला दरिद्रनारायणाशी एकरूप होता येते. स्वयंपूर्णतेचा अशासाठी की त्यामुळे कमीतकमी परावलंबन घडते; आणि ग्रामस्वराज्याचा अशासाठी की त्यामुळे परक्या देशांच्या किंवा शहरवासी भांडवल-दारांच्या शोषणातून ग्रामवासी मुक्त होतो. खेड्यांमधला पैसा खेड्यांतच राहतो. त्याशिवाय ग्रामवासीयाचा रिकामा वेळ त्यामुळे उत्पादक व्यवसायामध्ये कारणी लागू शकतो. त्याची आंशिक बेरोजगारीतून सुटका होऊन स्वकष्टांतून त्याचे जीवनमान वाढू शकते. आपल्यासारख्या भांडवलाची कमतरता असलेल्या कृषिप्रधान देशात वर उल्लेखिलेल्या गुणांमुळे खादी हे वरदान ठरू शकते.

पुढे वाचा