: एक प्रकट चिंतन
आपल्या नोव्हेंबर २०००च्या अंकात खादी एका तत्त्वप्रणालीमधली कडी राहिली नसून तिचे आता फडके झाले आहे असे वाचले. पण त्यात संपादक नवीन काही सांगत नाहीत. खादीचे फडके कधीचेच झाले आहे. त्या गोष्टीला ५० वर्षे उलटून गेली आहेत. रिबेटची कुबडी ज्या दिवशी खादीने स्वीकारली त्या दिवशी किंवा त्या अगोदरच खादी निष्प्राण झाली होती. खादीचे फडके झाले आहे ही गोष्ट सर्व वरिष्ठ खादीवाल्यांना माहीत होती. अण्णासाहेब सहस्रबुद्धे खादीच्या क्षेत्रातले एक श्रेष्ठ कार्यकर्ते. त्यांना फार पूर्वीपासून निराशा आलेली होती आणि ‘खादी अ-सरकारी केल्याशिवाय ती असर-कारी होणार नाही’ असे मत विनोबाजी त्यांच्या लिष्ट शैलीत मांडत असत.