विषय «इतर»

तंट्या भिल्लाचे इंग्रजांस पत्र

मे. हुजूर जनाब डिप्टी कमिशनर साहेब, निमाड इलाका,खंडवा.
अर्जदार तंट्या वलद भावसिंग भील, रा. पोखर, जि. निमाड सरकार चरणी अर्ज पेश करतो, की सरकार आम्हा गरिबाच्या जिवावर उठले आहे. जंगलातल्या लोकांना हुसकावून लावण्याचा सरकारचा इरादा चांगला नाही. आतापर्यंत कोणत्याही मायबाप सरकारनी डोंगरातल्या आम्हा लोकांना हात लावला नाही, की त्यांची खोड काढली नाही. होळकर सरकार, असीरगड–बु-हाणपूरच्या सरकार आणि इतर रियासतीने या जंगलातल्या माणसाला सांभाळून घेतले आहे. मग गोऱ्या सरकारलाच ह्या जंगलाच्या वाट्याला का जावे वाटले? आतापर्यंत पाटील, पटवारी, सावकारांनी ह्या आम्हा लोकांना पिळले–लुबाडले; पण अडचणीच्या वेळी त्यांनीच मदतही केली आहे; परंतु आता तुमच्या हुकुमावरून त्यांनी जास्ती पिळवणूक सुरू केली आहे.

पुढे वाचा

तंट्याच्या पत्राबाबत

‘तंट्या’ या बाबा भांडांच्या कादंबरीत (साकेत, २०००) कधीतरी १८७९ मध्ये तंट्या भिल्लाने निमाडच्या डेप्युटी कमिशनरला लिहिलेले एक पत्र भेटले.
गाडगीळ-गुहा यांचे ‘धिस फिशर्ड लँड’ पुस्तक नोंदते की इंग्रजांपूर्वीचे राजे जंगलांकडे बहुतांशी दुर्लक्षच करत असत आणि ही स्थिती इंग्रजांच्या आगमनानंतर बदलली. तंट्याचे पत्र नेमका हाच मुद्दा नोंदते, म्हणून भांडांना पत्र पाठवून पत्राची जास्त माहिती विचारली. त्यांच्या उत्तराचा संलग्न भाग असा —- “तंट्यासंबंधीचे मूळ दस्तावेज धुंडाळीत असताना निमाडच्या असिस्टंट डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट ऑफ पोलिसची टिपणी सापडली आहे. ती एच. पी. स्किपटन् यांनी तंट्यासंबंधीची माहिती जमवून तयार केली होती.

पुढे वाचा

शिक्षणात बदल : गोरगरिबांच्या शिक्षणावर गदा

भारतात आता बदलत्या शिक्षणाच्या धोरणामुळे गरिबांचे शिक्षणच बंद होणार असे श्री. अरविंद वैद्य यांनी त्यांच्या लेखात (आ. सु., जुलै-ऑगस्ट, २००२) सांगून वाचकांचे डोळे उघडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आता भारतात समाजपरिवर्तन हा शिक्षणाचा हेतू राहिला नसून, भांडवली विषमतेची रचना मजबूत करणे हाच शिक्षणाचा हेतू होऊ लागला आहे, हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे. पण हा हेतू आजचाच नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाच्या उच्चवर्णीय श्रीमंत नेत्यांनी गोरगरिबांच्या शिक्षणाकडे खुल्या मनाने लक्ष दिलेच नव्हते आणि आता नव्या धोरणाने गरिबांच्या शिक्षणावर ते गदाच आणणार हे वाचून वाईट वाटते.

पुढे वाचा

जाहिरातबाजीचे संकट

जपानमध्ये तुमचा स्वतःचा उद्योग होता, इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ. तुमच्या उत्पादनांमध्ये दोष दाखवायला जागा नव्हती. मग तुमच्या देशावर एक खोटेपणाची लाट येऊन आदळली, व्यापार म्हणजे व्यापारच आणि इमानदारी म्हणजे फक्त एक चांगले धोरण, असे मानणाऱ्या प्रदेशातून ही लाट आली. शहरी क्षेत्रे काबीज करून आता इमानदारीने मेहेनत करणाऱ्या क्षेत्रावर हल्ला करणाऱ्या खोट्या आणि अतिशयोक्त जाहिरातींकडे स्वागत करणाऱ्या गिरिशिखरांवरही आता हल्ला होतो आहे. आपल्या कुरूप आणि रानवट सजावटींमधून घेणारा हा वाणिज्यवाद सर्व मानवजातीवर महा-अरिष्ट आणतो आहे, कारण कौशल्यावर तो ताकदीचे ‘आदर्श’ कलम करतो आहे.

पुढे वाचा

विवेकवाद Reason आणि श्रद्धा

विवेकवादाचा अर्थ, गेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे कदाचित त्याचा प्रधान अर्थ, कोणतेही विधान निर्णायक पुराव्यावाचून खरे न मानणे, आणि पुराव्याच्या प्रमाणात त्याच्यावर वि वास ठेवणे; निर्णायक पुरावा असेल तर विधान पूर्णपणे स्वीकारणे आणि नसेल तर जो पुरावा असेल त्याच्या प्रमाणात स्वीकारणे. अनेक वाचकांच्या दृष्टीने हे म्हणणे बरोबर नाही; ते म्हणतील की विधान स्वीकारण्याची ही अट अवश्य विधाने सोडल्यास इतर कोणत्याही विधानाचा पुरावा निर्णायक असू शकत नाही. परलोक, ईश्वर, मरणोत्तर अस्तित्व इत्यादि विषयांचा पुरावा देण्यासारखा नसतो, ती विधाने आपण श्रद्धेने स्वीकारतो.

पण हा आक्षेप घेणाऱ्या लोकांना विवेकवादाचा अर्थ समजलाच नाही असे म्हणणे भाग आहे.

पुढे वाचा

(पुरुषकार्याची चढती शिडी)

“पुरुष हा शेवटी पुरुष आहे आणि स्त्री ही स्त्रीच आहे. मग ते कितीही शिकोत, काहीही करोत.” “स्त्रिय चरित्रं पुरुषस्य भाग्यं, देवो न जानाति कुतो मनुष्यः””लिंगभेद सोडला तर बाकी सर्व बाबतीत स्त्रिया का नाही पुरुषांची बरोबरी करू शकणार?””स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता
असते, आणि पुरुष? पुरुष अनंतकाळचा प्रियकर आणि क्षणाचाच पिता असतो?” “Men are from Mars & Women are from Venus.”
प्रत्येकजण म्हणतो, स्त्री आणि पुरुष यांचे वागणे जन्मजातच वेगळे असते. ते का वेगळे असते आणि कोणकोणत्या बाबतींत वेगळे असते हे मात्र नीटपणे कुणी सांगू शकत नाही.

पुढे वाचा

नवधर्मस्थापनेतून सामाजिक पुनर्रचना होऊ शकेल?

महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह.साळुखे यांनी मराठा सेवा संघाच्या वतीने नव्या धर्माची स्थापना करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असल्याची बातमी वर्तमानपत्रांतून काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाली आणि त्यावर उलटसुलट चर्चाही तेव्हापासून सुरू आहे. हे कार्य तसे प्रचंड मोठे आणि आव्हानात्मक आहे. धर्माचे तत्त्वज्ञानात्मक अधिष्ठान, पूजापद्धती वगैरे कृतिरूप अभिव्यक्ती आणि रीतिरिवाज, दंडक, नीतितत्त्वे, यमनियम, आदर्श, मर्यादा, सामाजिक संबंध वगैरेच्या स्वरूपातील समाजनियमनात्मक प्रणाली–अशा तिन्ही बाजूंनी उभारणी धर्मस्थापनेसाठी आवश्यक असते. डॉ. साळुखे यांचा अधिकार आणि अनुभव ध्यानात घेता ते एकटाकी पद्धतीनेही हे आव्हान पेलू शकतील याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.

पुढे वाचा

दुष्टचक्र

दुष्टचक्र बदलाची स्पष्टता नाही म्हणून उभारी नाही, उभारी नाही म्हणून शिस्त नाही, आणि शिस्त नाही म्हणून बदलाची शक्यता आणखी लांब गेली, असं दुष्टचक्र आहे, आणि ते सगळ्याच बाबतीत आहे. शिक्षणाच्या बाबतीत आहे, रोजगाराच्या बाबतीत आहे, वस्तीतल्या सुविधा मिळवण्याच्या बाबतीत आहे. राजकीय शिस्तीशिवाय उभारी फक्त नेत्यांनाच (स्थानिकही); बाकी जनता ‘गरीब बिचारी कुणी हाका’ अशीच.
दुसरं एक वाटतं. इतिहासाचं ओझं अजूनही वागवणाऱ्या या समाजाला ‘अमुक काम करायला घाण वाटते. त्यामुळे यातून बाहेर पडायला पाहिजे’ अशी ऊर्मी वाटत नाही. श्रमाचं महत्त्व मलाही पटतं, पण एकाच प्रकारचे श्रम एकाच समाजाला सतत करावे लागताना पाहिलं की हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

पुढे वाचा

संघाचा फतवा: राज्यघटनेलाच आव्हान (एक प्रतिक्रिया)

वरील शीर्षकाचा श्री. सत्यरंजन साठे यांचा लेख साधना साप्ताहिकाच्या २७ एप्रिल २००२ च्या अंकातून घेऊन आजचा सुधारक च्या जून २००२ च्या अंकात छापला आहे. लेखातील विचार पाहता तो तथाकथित बुद्धिवादी आणि सेक्युलरवादी लोकांना संघ आणि संघपरिवारासंबंधी जी कायम कावीळ झाली आहे त्याच दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे असे माझे स्पष्ट मत आहे. हजारो वर्षांची जुनी परंपरा आणि प्राचीनता असलेल्या हिंदू जीवनशैलीत सतत सत्य, अहिंसा, सहिष्णुता, विचार, उच्चार आणि आचार-स्वातंत्र्यांचा उद्घोष केलेला आहे. श्री. ज्ञाने वरांच्या पसायदानात ‘जो जे वांछील तो तें लाहो प्राणिजात’ या आधी ‘दुरितांचे तिमिर जावो, वि व स्वधर्मसूर्ये पाहो’ असे म्हटले आहे.

पुढे वाचा

हिंदूंचे हित कशात आहे?

आपल्या देशात गेल्या तीन दशकांत अल्पसंख्य समाजाविरुद्ध योजनाबद्ध हत्याकांड सातत्याने होत आहे. ७० च्या दशकात भिवंडीला, ८० च्या दशकात दिल्लीला, ९० च्या दशकात मुंबईला आणि २००० च्या दशकात गुजराथमध्ये. प्रत्येक नियोजित हत्याकांडात पूर्वीच्या दशकातल्या हत्याकांडापेक्षा जास्त अमानुषता आणि संघटित क्रौर्य झाले. गुजरातमधल्या हत्याकांडात हिडीसपणा, बीभत्सपणा यांचा उच्चांक झाला. त्यातल्या अमानुषतेच्या कहाण्या नाझी अत्याचारांनाही लाजवणाऱ्या आहेत. मुख्यतः हे अत्याचार स्त्रियांवर झाले. २७ फेब्रुवारीला गोध्रा येथे रेल्वेच्या एका डब्याला आग लावून ७८ हिंदू प्रवाशांना जिवंत जाळून मारण्यात आले होते. तीही घटना दुर्दैवी आणि अमानुष होती.

पुढे वाचा