आज ‘धर्म’ ह्या शब्दानं अत्यंत शक्तिशाली अशा स्फोटकाची जागा घेतली आहे. हिंदू, मुसलमान, ज्यू, ख्रिश्चन…. हे शब्दोच्चारही मनात दहशत निर्माण करताहेत. धर्माच्या नावाखाली जगभर चाललेला उच्छाद केवळ उद्विग्न करणारा आहे.
घरापासून रस्त्यापर्यंत चाललेल्या हिंसेला धर्मच जबाबदार ठरावा…. धर्माचं आपलं आकलन इतकं तोकडं असावं……. बिनदिक्कतपणे गलिच्छ राजकारणासाठी….. सत्ताप्राप्तीसाठी…. स्त्रीच्या उपभोगासाठी…. दलितांच्या खच्चीकरणासाठी तो वापरला जावा…. आणि आपण फक्त हतबलतेनं बघत राहावं! धर्म अशी राखरांगोळी करून टाकतो का माणसाची? की धर्माची ढाल करत वेगळंच काही राजकारण जगभरात चालू आहे? ह्या सगळ्या विध्वंसामागे सत्तालालसेची प्रेरणा कार्यरत आहे का?